मराठी उद्योजकांचा विश्वविस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 06:20 AM2018-10-20T06:20:13+5:302018-10-20T06:20:26+5:30

दुबईतील मॅरियर हॉटेलमध्ये तब्बल ५०० हून अधिक उद्योजकांनी भरलेला तो हॉल पाहिल्यानंतर खरोखर श्रमाचे चीज झाल्याचे जाणवले. गेले चार-पाच ...

Expansion of Marathi Entrepreneurs | मराठी उद्योजकांचा विश्वविस्तार

मराठी उद्योजकांचा विश्वविस्तार

googlenewsNext

दुबईतील मॅरियर हॉटेलमध्ये तब्बल ५०० हून अधिक उद्योजकांनी भरलेला तो हॉल पाहिल्यानंतर खरोखर श्रमाचे चीज झाल्याचे जाणवले. गेले चार-पाच महिने आम्ही ‘महाबीज’ उपक्रम यशस्वी व्हावा म्हणून राबत होतो. त्या श्रमाची परिणती आम्हाला दिसली. गल्फ महाराष्ट्र बिझिनेस फोरम (ॠटइऋ) या नावाच्या संस्थेंतर्गत गेली चार वर्षे आम्ही दुबईत भारतातील आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील उद्योजकांना जागतिक स्तराचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. यंदाच्या वर्षी आम्ही प्रथमच महाराष्ट्रातील दुसऱ्या-तिसºया स्तरावरील शहरापर्यंत पोहोचलो, त्यांच्याशी संवाद साधला. प्रसार माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम आम्हाला चांगला जाणवला. दुबईत यंदा चौथ्यांदा जेव्हा ‘महाबीज’ सोहळा झाला, त्याला उदंड प्रतिसाद मिळाला.
यंदाच्या ‘महाबीज’ला महाराष्ट्र सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, तसेच पर्यटनमंत्री जयकुमार रावल हे स्वत: या वेळी उपस्थित होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी त्यांच्या भाषणातून आखातातील मराठी उद्योजक यशस्वी होत असताना इतर उद्योजकांना पुढे आणण्याचे जे काम करीत आहेत त्याबद्दल कौतुकोद्गार काढले. मराठी उद्योजक देशाबाहेर गेला की यशस्वी होतो हे खरे आहे. त्याला महाराष्ट्राच्या मातीतही यशस्वी करायला हवे. त्यासाठी सरकार निश्चित प्रयत्न करेल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. महाराष्ट्रात देशातील सर्वात मोठी गुंतवणूक होत असल्याने पुढच्या काळात गुंतवणूकदारांसाठी चांगले दिवस असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.
खरे तर ‘ईझ आॅफ डुइंग बिझनेस’ किंवा ‘स्टार्ट अप इंडिया’ यांसारख्या सरकारी उपक्रमांमुळे उद्योजक आता धाडसाने पुढे येत आहेत. तरीही त्यांची क्षितिजे विस्तारण्याची गरज आहे. केवळ राज्यापुरता किंवा देशापुरता विचार न करता उद्योजकांनी प्रादेशिकतेच्या सीमा ओलांडून काम करायला हवे. याच भावनेतून आम्ही ‘जी.एम.बी.एफ’ची १४ वर्षांपूर्वी स्थापना केली. या मंडळातले अनेक सदस्य मोठे उद्योजक, व्यावसायिक आहेत. त्यांचा व्यवसाय सांभाळून ते हे काम करतात. आखातामधील अनेक देशांमध्ये गेली २५-३० वर्षे काम करणारी काही मराठी मंडळी एकत्र येऊन हा फोरम चालवत आहेत. केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी आखातात नाव कमावले आहे. कितीही नाव, पद, प्रतिष्ठा कमावली असली तरी इथल्या मराठी उद्योजकांनी महाराष्ट्राशी असलेले नाते तोडलेले नाही. दिवाळी असो, गणपती असो अथवा गुढीपाडवा. आम्ही तितक्याच मनापासून येथेही साजरा करतो. एकट्या दुबईत यंदा तब्बल साडेतीन हजार ठिकाणी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. महाराष्ट्र हीच आमची ओळख आम्ही कायम ठेवली आहे. त्याच भावनेतून गल्फ फोरम चालवतो. यंदाचा महाबीज सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा मानस आम्ही आधीच व्यक्त केला होता. आमच्या फोरमचे सचिव राहुल तुळपुळे, विवेक कोल्हटकर, चिरंतन जोशी, ओरेन हेन्रीक, अशोक सावंत, दिलीप खेडेकर, नितीन सास्तेकर, महेश शुक्ला, दिलवर दलवाई, शिरीष पटवर्धन, बी. राऊत यांच्यासह इतर अनेकांनी नियोजनात सहभाग घेतला. महाराष्ट्रासह आफ्रिकी देशातील उद्योजकांनाही सहभागी करून घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यानुसार युगांडा, नायजेरिया देशातील उद्योजकांनी सहभागही घेतला. महाराष्ट्रातील जवळपास ३०० हून अधिक उद्योजकांनी नोंदणीही केली होती. त्याचवेळी आम्हाला यंदाचा महाबीज १८ सोहळा यशस्वी होणार याची खात्री वाटत होती. प्रत्यक्ष परिषदेच्या दिवशी आम्ही पाच परिसंवाद ठेवले होते. उत्तम वक्ते यात सहभागी झाले. त्यांच्या अनुभवनसंपन्न वक्तृत्वामुळे परिषदेत सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी आम्हाला वैयक्तिक भेटून प्रतिसाद दिला. यंदा अगदी छोटे व्यापारीही आम्ही गृहीत धरले होते. त्यांनाही उद्योग-व्यवसाय विस्तारण्याचा विचार कसा करता येईल, याची चर्चा परिषदेतून घडविली गेली. तसेच पूर्वीसारख्या स्पर्धा आता उरल्या नाहीत, त्यामुळे एकमेकांच्या सहकार्याने आपला व्यवसाय कसा वृद्धिंगत करता येईल, याचाही ऊहापोह केला गेला. त्याशिवाय ‘नेटवर्किंग’ हा महत्त्वाचा भाग होताच. सम व्यावसायिकाबरोबरच आपल्या उद्योगाला पोषक ठरणाºया उद्योजकांमधील संवाद वाढविणे, त्यातून व्यवसायवृद्धीला कसा उपयोग करता येईल, याची चाचपणी करणे असे सारे उपक्रम या परिषदेच्या माध्यमातून राबविले गेले.
शिक्षण आणि पर्यटन हे पुढच्या काळात उद्योग विस्ताराची क्षेत्रे राहणार आहेत, त्या अनुषंगाने भारती विद्यापीठाचे संचालक विश्वजीत कदम यांचा सहभागही या परिषदेत मोलाचा ठरला. महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी महाराष्ट्रात उद्योगाची मोठी संधी असल्याचे सांगत पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असल्याचे मत व्यक्त केले.


 - डॉ. सुनील मांजरेकर, अध्यक्ष, गल्फ महाराष्ट्र बिझिनेस फोरम

Web Title: Expansion of Marathi Entrepreneurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dubaiदुबई