समतामूलक शाश्वत विकासासाठी एकात्मसम्यक विचाराकडे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:45 AM2017-12-13T01:45:48+5:302017-12-13T01:46:12+5:30

आजमितीस जगासमोरील अव्वल समस्या आहे : क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल; जलवायू परिवर्तन! ४६० कोटी आयुर्मानाच्या या पृथ्वीला आजवर अनेक स्थित्यंतरांतून जावे लागले.

Equality for the sake of sustainable development ... | समतामूलक शाश्वत विकासासाठी एकात्मसम्यक विचाराकडे...

समतामूलक शाश्वत विकासासाठी एकात्मसम्यक विचाराकडे...

googlenewsNext

- प्रा. एच.एम. देसरडा
(नामवंत अर्थतज्ज्ञ, माजी सदस्य, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ)

आजमितीस जगासमोरील अव्वल समस्या आहे : क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल; जलवायू परिवर्तन! ४६० कोटी आयुर्मानाच्या या पृथ्वीला आजवर अनेक स्थित्यंतरांतून जावे लागले. उत्क्रांतीच्या या प्रक्रियेत जे काही इष्टानिष्ट बदल झाले त्यांचा मागोवा शास्त्रज्ञ, समाजसुधारक, लेखक, साहित्यिक, पत्रकार यांनी घेतला आहे. शोध, आविष्कार, प्रयोग, कल्पकता, उद्योजकता यांचा मिलाफ घडवून प्रतिसृष्टी निर्माण (?) करण्याचा कैफ चढवून निसर्गाच्या गुंतागुंतीची परस्परावलंबी रचना नि जीवन समुच्ययात (वेब आॅफ लाईफ) अविवेकी, अनाठायी हस्तक्षेप करून भयानक संकट ओढवून घेतले! आपली ही वसुंधरा खरोखरीच फार अद्भुत, विलक्षण रोमांचकारी आहे. सोबतच निसर्ग व त्यातील संसाधनांचा ज्ञानविज्ञान व तंत्रज्ञानाच्या साह्याने वापरविनियोग करीत सुखसुविधा उभ्या करणे, त्याद्वारे मानवसंस्कृती उन्नत करणे उत्क्रांतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. औद्योगिक क्रांतीने जीवाश्म इंधनाचा, रसायनांचा वापर करण्याचे तंत्र दिले. मात्र, मानव त्याचा बेछूट वापर करीत बेभान झाला. परिणामी, हवामान बदलाच्या प्रलयंकारी संकटाने गंभीर स्वरूप धारण करीत जगाला विनाशाच्या कडेलोटावर पोहोचवले आहे. जीवन सुकर, सुखावह नि आनंदी करण्यासाठी अन्न-वस्त्र-निवाºयासह अन्य वस्तू व सेवांचा वाढविस्तार केला.

जात-वंश-वर्ण-पुरुषप्रधान वर्ग व्यवस्था
हवामान बदलाचा मानव व पृथ्वीच्या सुरक्षेवर होणा-या प्रतिकूल परिणामाचा प्रश्न सर्वोच्च आहे. सोबतच तेवढाच कळीचा प्रश्न आहे, सामाजिक, आर्थिक विषमता व विसंवादाचा. थोडक्यात, सांप्रतकाळी मानव समाजाचे हे दोन मुख्य ऐरणीवरचे प्रश्न आहेत. या दोन्हींचा स्वतंत्र विचार करणे निरर्थक आहे.
२०१७ साली अवघ्या जगावर वंश, धर्म, जात, परकीयद्वेष यासारख्या संकुचित विभाजनवादी नि आक्रमक राष्टÑवादाचे सावट पसरले आहे. काही युरोपियन देशांचा वंश-वर्ण-धर्म वर्चस्ववादी उजव्या पक्षांच्या बाजूने झुकाव, अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या कडव्या अति-उजव्या उपटसुंभभूमाफियांचा (गोंडस शब्दात रिअल इस्टेटवाल्यांचा) राष्टÑाध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला विजय आणि राष्टÑाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर चाललेला स्वच्छंदी कारभार या खचितच चिंतेच्या बाबी आहेत. सिरिया, इराक, तुर्कस्तान व इतर देशांतील अल्पसंख्याकांवरील हल्ले यांनी अवघे जग चिंताक्रांत आहे आणि खुद्द आपल्या देशात आततायी अट्टाहास, विद्यार्थ्यांवर राष्ट्रद्रोहाचे खटले व पत्रकारांच्या हत्या या सर्व बाबी चिंताजनक असून, इंटरनेटच्या जमान्यातील मानवसमाज अंधकारात लोटला जात आहे! खरं तर हे भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकार व मूल्यांना सरळसरळ आव्हान आहे. भारतच नव्हे तर संपूर्ण जगाच्या भविष्यासाठी बाबासाहेबांच्या स्मरणानिमित्त याची चर्चा गांभीर्याने होणे नितांत गरजेचे आहे.
जात-वंश-वर्ण-वर्ग- पुरुषसत्ताक व्यवस्था हे तर जगभर विषमतेचे मुख्य कारण आहेच. भरीसभर म्हणजे सरंजामी, भांडवली, राजकीय अर्थकारणाने श्रमजीवी जनसमुदायाला आपल्या कह्याकब्जात ठेवण्यासाठी सर्रासपणे बळाचा वापर केला. आजही मस्तवातलपणे करीत आहे. दुसºया महायुद्धातील प्रचंड हिंसा नि वंश-संहाराच्या (जेनोसाईड) परिणामी मानवसमाजाच्या वाटचालीबाबत काही मूलगामी प्रश्न विचारले जात आहेत.

विज्ञान-तंत्रज्ञानाचा कैफ!
औद्योगिक क्रांतीच्या लगोलग झालेल्या अमेरिकेतील स्वातंत्र्याची घोषणा, फ्रेंच राज्यक्रांती आणि ज्याला ज्ञानोदय व प्रबोधनपर्व (रिनेसॉ) व विवेकवाद (रॅशनालिटी) अशी व्यापक मान्यता आहे. त्या लोकशाही मूल्यसंकल्पनेला गती मिळाली. वसाहतवाद व व्यापारी भांडवलशाहीचे स्थित्यंतर औद्योगिक भांडवलशाहीत होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बळावर मानव निसर्गावर हुकुमत गाजवू लागला. त्याला त्याचा कैफ चढला! गंमत म्हणजे अमेरिकेचे ट्रम्प, रशियाचे पुतीन, चीनचे शी झिनपिंग व भारताचे मोदी हे एका सुरात हीच विकास, तंत्रज्ञान व उत्पादनाची भाषा बोलत आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी, सत्ता चालविण्यासाठी धर्म, वंश व राष्टÑश्रेष्ठत्वाचा दाखला देत आहेत. कमी-अधिक फरकाने जगातील अन्य सत्ताधारी या बलाढ्यांची धोरणे आपापल्या देशात अट्टाहासाने रेटत आहेत.
औद्योगिक क्रांतीनंतर सरंजामी-भांडवली सत्ताधीशांचे, महाजन अभिजनवर्गाचे चैनचोचले पुरे करण्यासाठी नाना तºहेच्या वस्तू व सेवांचे उत्पादन लक्षणीय प्रमाणात वाढवले गेले. अर्थात, त्यांच्या दिमतीला असलेल्या संघटित कामगार, नोकरशाही, सैन्यदल, पोलीस यंत्रणा आणि या सर्वांना कवेत घेणाºया मध्यम वर्गाला (जो सर्व जाती-धर्मांतून उदयास आलेला मलाईदार थर आहे. ग्रेट मिडलक्लास, नवीन शेटजीभटजी अभिजन जातवर्ग आहे.) या सर्व वस्तू व सेवांच्या विपुलतेचा लाभ मिळाला.

‘हा’ विकास की विनाश?
गेल्या ५०-६० वर्षांत भांडवलाला विशेषत: वित्तीय भांडवलाला जगभर मुक्तसंचार करण्याची मुभा मिळाली. २००८ च्या आर्थिक घसरणीनंतर वित्तीय भांडवलशाहीचा डोलारा टिकणार नाही. त्याच्या अंगभूत मर्यादा आहेत, हे जगभराच्या सामान्य लोकांना जाणवू
लागले. उत्तरोत्तर प्रचलित विकासाचे विनाशकारी स्वरूप दररोज अधिकाधिक उघड होत आहे.

Web Title: Equality for the sake of sustainable development ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Earthपृथ्वी