कशाला करायचा हा खोटारडेपणा?

By किरण अग्रवाल | Published: February 12, 2019 09:41 AM2019-02-12T09:41:59+5:302019-02-12T10:03:33+5:30

राजकारणातील अविश्वसनीयता सर्वज्ञात आहे, कधी कोण सोबत येतील आणि कधी कशामुळे दुरावतील हे सांगता येत नाही; पण याचसोबत राजकारणात खोटं बोलल्याशिवाय चालत नाही असेही म्हटले तर ते सर्वमान्य ठरू नये.

Editor's Analytical Article on gulabrao patil nashik statement | कशाला करायचा हा खोटारडेपणा?

कशाला करायचा हा खोटारडेपणा?

Next

किरण अग्रवाल

राजकारणातील अविश्वसनीयता सर्वज्ञात आहे, कधी कोण सोबत येतील आणि कधी कशामुळे दुरावतील हे सांगता येत नाही; पण याचसोबत राजकारणात खोटं बोलल्याशिवाय चालत नाही असेही म्हटले तर ते सर्वमान्य ठरू नये. कारण आजही अनेक राजकारणी खोटारडेपणाचा आधार न घेता स्पष्टवक्तेपणे आपली मते मांडून प्रसंगी मतदारांचा रोष ओढवून घेताना दिसतात. अर्थात, असे करण्यातून म्हणजे खोटे बोलण्यातून लोकांची फसवणूक तर होतेच शिवाय लोकप्रतिनिधित्वाच्या शपथेशीही प्रतारणाच घडून येते म्हणायचे. त्यामुळे राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी यासंदर्भात केलेल्या विधानाला सहज म्हणून न घेता त्याकडे गांभीर्याने बघितले जाणे गरजेचे आहे.

एका पुरस्कार वितरण समारंभासाठी नाशकात आले असता राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी राजकारणातील खोटारडेपणाची गरज बोलून दाखविली. ‘राजकारण हे एक प्रकारचे नाटकच असून, येथे नेत्यांना सतत अभिनय करावा लागतो’ असे सांगताना, ‘अनेकदा मतदारांची मर्जी सांभाळण्यासाठी खोटेही बोलावे लागते. त्याशिवाय राजकारण करताच येत नाही’, असेही सांगायला पाटील विसरले अगर कचरले नाहीत. राजकारणातील खोटारडेपणा कबूल करण्याचा प्रामाणिकपणा आणि धारिष्ट्य दाखविल्याबद्दल त्यांचे कौतुक करता यावे. शाळेत असताना नेहमी खरे बोलावे, खोटे बोलू नये, असे आपल्याला सर्वांना शिकवले जात असते. त्या शिकवणुकीनुसार पाटील राजकारणातील खोटेपणाबद्दल खरे खरे सांगून गेले; पण त्यांच्या या खरेपणातील खंत एकूणच राजकीय परिघावरील अविश्वासाच्या सर्वांनी स्वीकारलेल्या स्थितीत अधिकची व खोटेपणाची भर घालणारी असल्याने त्याची चिकित्सा घडून येणे गरजेचे ठरावे. कारण, या क्षेत्रात कधी काय घडून येईल हे भरवशाचे नसते हे सहज स्वीकारता येणारे सत्य असले तरी; खोटेपणाखेरीज राजकारणच करता येत नाही असे मानणे मात्र अनेकांवर अन्याय करणारे ठरेल. कोणत्याही स्थितीत मतदार नाराज होता किंवा दुरावता कामा नये म्हणून बंडलबाजी करणारे काहीजण असतीलही; परंतु यच्चयावत सारेच राजकारणी मतदारांची मर्जी सांभाळण्यासाठी खोट्याचाच आसरा घेतात असे म्हणता येऊ नये. पाटील यांच्या विधानाकडे म्हणूनच गांभीर्याने बघितले जावयास हवे.

मुळात, मतदारांच्या अपेक्षा असतात तरी काय, की ज्यासाठी राजकारण्यांना खोटे बोलून वेळ निभवावा लागतो? परिसराचा विकास व्हावा, प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत व लोकप्रतिनिधीने संपर्कात राहायला हवे, इतक्याच जर मतदाराच्या अपेक्षा असतील तर त्यात गैर काय आणि त्यासाठी खोटे बोलून अभिनय कशाला करायचा? पण तरी तसे करावे लागत असेल तर ते संबंधिताचेच अपश्रेय म्हणायला हवे. अपेक्षापूर्तीसाठीची धडपड प्रामाणिक असेल तर थापेबाजी करायची वेळच येऊ नये; पण प्रश्न कधी निर्माण होतो, जेव्हा एखादी बाब आवाक्यात नसते अगर करता येणारी नसते, तरी ती पूर्ण करण्याची आश्वासने ठोकून दिली जातात, तेव्हा लोकांसमोर जाताना खोटारडेपणा करण्याची नामुष्की ओढवते. त्यापेक्षा न होऊ शकणाऱ्या कामांचे शब्द देऊ नका, म्हणजे खोटेपणाचा अभिनय करावा लागणार नाही. थोडक्यात, खोटे बोलावे लागणे ही राजकारणातली अपरिहार्यता नाही, तर ते ओढवून घेतलेले दुखणे असते. खोटे बोलून मतदारांना अपेक्षा लावून ठेवणे आणि अंतिमत: त्यांचा भ्रमनिरास घडण्यापेक्षा अगोदरच स्पष्टपणे अमुक काम होणार नाही, हे सांगितलेले केव्हाही बरे. त्याने संबंधित लोक क्षणभर दुखावतील भले; पण नंतरच्या अपेक्षाभंगापेक्षा हे दुखणे सुसह्यच म्हणता यावे.

महत्त्वाचे म्हणजे, खोटे बोलल्याखेरीज राजकारण करताच येत नाही, हे म्हणणे तर तद्दन खोटे आहे. कारण, आपली मते व भूमिकांवर, तत्त्वावर ठाम राहात न जमणा-या गोष्टींसाठी स्पष्टपणे नकार देणारे अनेक राजकारणी आजही पहावयास मिळतात. विकासाचे काय ते बोला, भानगडी केल्यावर पोलिसांकडे सोडवायला मुळीच येणार नाही किंवा फोनदेखील करणार नाही, असे म्हणणारेही आहेत. तेव्हा, खोटे बोलण्याची वेळच येत नाही. दुसरे असे की, विधिमंडळात सदस्य म्हणून शपथ घेताना संविधानाबद्दल खरी श्रद्धा व निष्ठा बाळगण्याबरोबरच जे कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठेने पार पाडण्याचा शब्द संबंधितानी दिलेला असतो. यात खोटेपणाला वाव आहेच कोठे? मग जर राजकारणात खोटेच बोलावे लागत असेल तर निष्ठेने कर्तव्य पार पाडण्याचे काय? तेव्हा, कशाला करायचा हा खोटारडेपणा? याचा खरेच विचार होण्याची गरज आहे.

Web Title: Editor's Analytical Article on gulabrao patil nashik statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.