क्रौर्यापुढे ओशाळले नाते !

By किरण अग्रवाल | Published: March 1, 2018 08:39 AM2018-03-01T08:39:01+5:302018-03-01T08:39:01+5:30

क्रौर्य हे क्रौर्यच असते, त्याला कमी-अधिकच्या सीमा नसतात; किंवा तसल्या मोजपट्टीत ते मोजताही येत नाही. माणुसकीचा गहिवर जिथे संपतो तेथून निर्दयतेची व त्याहीपुढील क्रौर्याची वाटचाल सुरू होते.

Cruelty! | क्रौर्यापुढे ओशाळले नाते !

क्रौर्यापुढे ओशाळले नाते !

Next

क्रौर्य हे क्रौर्यच असते, त्याला कमी-अधिकच्या सीमा नसतात; किंवा तसल्या मोजपट्टीत ते मोजताही येत नाही. माणुसकीचा गहिवर जिथे संपतो तेथून निर्दयतेची व त्याहीपुढील क्रौर्याची वाटचाल सुरू होते. पण असले क्रौर्य जेव्हा नात्यांनाही धडका देत, त्या नात्याच्या म्हणून असणा-या मर्यादांचे पाश तोडते किंवा नात्यातील नाजूक भावबंधावरच आघात करीत हिंस्रतेची परिसीमा गाठते, तेव्हा ती बाब संबंधितांची, अगर त्या कुटुंबांची व्यक्तिगत न राहता समाजाच्याही काळजीचा विषय ठरून गेल्याशिवाय राहात नाही. प्रियकराच्या मदतीने आपल्या पोटच्या लहानग्याला बदडून काढत थेट मृत्यूच्या कोठडीत ढकलून देणा-या नाशकातील एका मातेचे क्रौर्यही त्यामुळेच समाजशास्त्रींची चिंता वाढविणारे ठरले आहे.

काकाकडून पुतणीच्या, मामाकडून भाचीच्या, शालकाकडून मेहुणीच्या अथवा तत्सम नात्यातील व्यक्तींकडून होणा-या लैंगिक छळाच्या घटना हल्ली वाढत चालल्या आहेत. या अशा घटना समाजमनाची अस्वस्थताच वाढवून देत असतात; पण त्याहीपुढे जात जेव्हा स्वत:च जन्मास घातलेल्या लेकीकडेही वासनांधपणे बघितले गेल्यासारखे प्रकार घडून येतात, तेव्हा नात्याला काळिमा फासले जाण्याचे पातक त्यातून ओढवते. अशा घटना अगदी अपवादात्मक असतात हे खरे; पण अवघ्या समाजाला त्या हादरा देणा-या ठरतात. नात्याची वीण उसवून टाकत माणूस असा पशू का बनतो, किंवा तसा का वागतो याची मानसशास्त्रीय अंगाने चिकित्सा करता वैफल्य, हीनता, व्यसनाधिनता, असुरक्षितता, असमाधान व बदला घेण्याची मानसिकता यासारखी काही कारणे त्यामागे आढळून येतात. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सारासार विचाराची क्षमता संपते, बुद्धी गहाण पडते व विवेक मागे पडततो तेव्हा वासना ही विकाराचे रूप धारण करते किंवा मनुष्यातले पशुत्व जागे होते. अशावेळी मग माणुसकीची भावना तर गळून पडतेच, शिवाय नात्याचे दोरही तुटतात. अघोरी अथवा क्रौर्याच्या संकल्पनेत मोडणाºया घटना याच अवस्थेत घडतात. अवघ्या सहा वर्षे वयाच्या आपल्या लेकराला कपडे धुण्याच्या धुपाटण्याने ते धुपाटणे मोडेस्तोवर झोडपून काढत, त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाºया मातेच्या निर्दयतेचा प्रकारही याच मालिकेत मोडणारा आहे.

नाशकातील एका साडीच्या दुकानात कामास असलेल्या सोनाली सुधाकर थोरात या मध्यमवर्गीय महिलेकडून घडलेल्या या प्रकारामागील कारण तसे किरकोळ होते. अवघ्या सहा वर्षे वयाच्या नकुल या तिच्या मुलाने पॅन्टमध्ये शी केल्याच्या रागात ही माता अनावर झाली. प्रियकराच्या मदतीने या महिलेने नकुलला तर बेदम मारहाण केलीच; पण आपल्या भावाचे रात्रभरचे विव्हळणे पाहून त्याला दवाखान्यात न्या, असे सांगणाºया दहा वर्षाच्या नंदिनीलाही त्यांनी झोडपून गप्प बसविले. अखेर दुसºया दिवशी नकुलला लोकलज्जेस्तव रुग्णालयात नेले असता तो मृत झाल्याचे घोषित केले गेले. विशेष म्हणजे, शिक्षणासाठी निवासी आश्रमशाळेत राहणारी ही मुले सुट्यांमध्ये घरी आईकडे आली असता हा प्रकार घडला. मातेच्या निर्दयतेचा हा ओरखडा भाऊ गमावलेल्या नंदिनीच्या मनावर किती गहिरा आघात करून गेला असेल याची कल्पनाच मनाचा थरकाप उडवून देणारी आहे. दोनदा लग्न केलेली सोनाली दोघा पतींना सोडून प्रियकरासोबत राहते व तिच्या प्रियकरालाही त्याच्या पत्नीने सोडून दिलेले, अशी यातील कौटुंबिक पार्श्वभूमी. त्यामुळे साध्या वा अगदी क्षुल्लक कारणातून हे क्रौर्य घडून आलेले दिसत असले तरी, त्याची पार्श्वभूमी समाजव्यवस्थेचा धाक न उरल्यामागे व स्वैराचारात दडलेली असल्याचे सहजपणे लक्षात येणारे आहे. कुठे चालला आहे समाज, का घडून येते आहे ही अधोगती, काय केल्याने थांबवता यावे हे अध:पतन यासारखे प्रश्न त्यातून उपस्थित होणारे असून, त्याची उत्तरे शोधण्याचे आव्हान समाजाचे नेतृत्व करणाºया धुरिणांसमोर उभे ठाकल्याचे म्हणावे लागेल.

अर्थात, असे असले तरी सारेच काही संपलेले नाही. माणुसकीच्या पणत्या अजूनही मिणमिणत का होईना, प्रकाश पेरण्याचे काम करताना दिसतात तेव्हा रणरणत्या उन्हात थंडगार हवेची झुळूक स्पर्शून गेल्याचा अनुभव त्यातून घडून येतो, जो मनाला सुखावून जातो. प्रस्तुत प्रकरणात बंधू नकुलने जीव गमावल्यामुळे भेदरलेल्या मनाने व मारहााणीच्या जखमा अंगावर बाळगत जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नंदिनीचे भविष्य सावरण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तुषार जगताप व अन्य कार्यकर्ते पुढे आले आहेत. नंदिनीवरील उपचार, तिचे पुढील शिक्षण, होस्टेलमधील निवासव्यवस्था आदी सर्व काळजीचे दायित्व त्यांनी स्वीकारले आहे. क्रौर्यापुढे मातेचे नाते जरी ओशाळले असले तरी, माणुसकीचा झरा आटलेला नाही, हेच यातून स्पष्ट व्हावे. समाज, समाज म्हणून आपण जे म्हणतो किंवा त्याला पुढे नेण्याची अगर त्याच्या उन्नयनाची जी भाषा करतो त्यात अखेर या असल्या कळवळा व सुहृदयतेखेरीज दुसरे काय अपेक्षित असते? नात्याच्या वा रक्ताच्या भावबंधापलीकडे जात संवेदनांचे असे झरे मोकळे होणे हीच तर खरी माणुसकी व तोच तर खरा माणुसकी धर्म! आणखी कोणता वेगळा ‘रंग’ हवा कशाला?

Web Title: Cruelty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.