स्वातंत्र्याच्या फुलबागेत आव्हानांचे निवडुंग

By विजय दर्डा | Published: August 14, 2017 01:18 AM2017-08-14T01:18:25+5:302017-08-14T01:50:55+5:30

उद्याचा सूर्य भारतीय स्वातंत्र्याच्या ७० व्या वाढदिवसांचा झगमगाट घेऊन येईल.

Cactus of Challenges in Fulbagh of Independence | स्वातंत्र्याच्या फुलबागेत आव्हानांचे निवडुंग

स्वातंत्र्याच्या फुलबागेत आव्हानांचे निवडुंग

उद्याचा सूर्य भारतीय स्वातंत्र्याच्या ७० व्या वाढदिवसांचा झगमगाट घेऊन येईल. एका स्वतंत्र राष्ट्राचे नागरिक असणे हे आपले नक्कीच भाग्य आहे. म्हणूनच ज्यांच्यामुळे हे भाग्य आपल्या नशिबी आले त्या सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचे कृतज्ञतेने स्मरण करणे हे आपले कर्तव्य ठरते. सकारात्मक आचार-विचारांच्या नवनवीन पुष्पांनी स्वातंत्र्याची ही फुलबाग अधिक खुलवणे, बहरवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे!
स्वातंत्र्यानंतर आपण भरपूर प्रगती केली आहे हे नि:संशय. अंतराळाला गवसणी घालत आपले यान मंगळाकडे झेपावले. एवढेच नाही तर इतर देशांचे उपग्रहही भारत सोडत आहे. भारत कोणाहूनही कमी नाही हे आपल्या वैज्ञानिकांनी सिद्ध केले आहे. एकेकाळी अमेरिकेने मेहेरबानीखातर दिलेल्या सडक्या गव्हाने पोटाची खळगी भरणारा भारत आज कृषी क्रांतीची भूमी बनला असून जगाची भूक भागवत आहे. वेगवान, गुळगुळीत महामार्ग देशाच्या कानाकोपºयात पोहोचत आहेत. लढाऊ विमाने जेथे उतरू शकतात व जेथून उड्डाण करू शकतात, असे रस्ते आज भारतात आहेत. पूर्वी लहानसहान यंत्रांसाठी जगाकडे याचकासारखा पाहणारा आपला देश आज विशाल व गुंतागुंतीची यंत्रसामुग्री तयार करत आहे.
थोडक्यात भारताची फुलबाग बहरली आहे. त्यात विविध क्षेत्रांतील यशाची चित्तवेधक फुले डोलत आहेत. तरीही ज्याने चिंतित व्हावे अशी अनेक आव्हाने व समस्या भारतापुढे अजूनही आहेत. खायला पुरेसे अन्न, पाणी, शिक्षण, आरोग्यसुविधा व रोजगार या चांगल्या आयुष्यासाठी आवश्यक असलेल्या पाच मूलभूत गोष्टी आहेत. देशातील सर्व नागरिकांना या पाच गोष्टी पुरेशा व सहजपणे मिळतात, असे आपण म्हणू शकतो का? अजिबात नाही! शेतकºयांच्या शेतीला पाणी नाही, दर्जेदार बियाणे नाही. पिकविलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. लाखो नागरिकांना आजही पिण्याचे स्वच्छ, शुद्ध पाणी मिळत नाही. आरोग्यसेवाच आजारी असल्यासारख्या झाल्या आहेत. लोक किड्या-मुंग्यांसारखे मरत आहेत. देशाच्या एकतृतीयांश लोकसंख्येच्या पाचवीला दारिद्र्य पुजलेले आहे.
सन २०१५ ची उपलब्ध असलेली आकडेवारी पाहिली तर दिसते की, देशात बेरोजगारांची संख्या १२ कोटी आहे. त्यात २५ टक्के बेरोजगार २० ते २४ या वयाचे आहेत. २५ ते २९ या वयोगटातील आणखी १७ टक्के बेरोजगार आहेत. यात महिलांची संख्याही खूप मोठी आहे. तंत्रशिक्षण घेतलेले १६ टक्के तरुणही बेरोजगारांच्या रांगेत उभे आहेत. तरुण पिढीला रोजगार उपलब्ध करण्याचे दावे तर नेहमीच केले जातात. सरकारही बरीच आकडेवारी देत असते. पण बेरोजगारी वाढत आहे, हे सत्य आहे. साहजिकच याचे दुष्परिणामही दिसू लागले आहेत. ‘रिकामे मन, सैतानाचे घर’, अशी म्हणच आहे. तरुण हातांना काम मिळाले नाही की ते वाईट मार्गाला जाण्याची, त्यांची डोकी भडकविली जाण्याची शक्यता अधिक असते. अशा वेळी अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळतात. आज काश्मीरमध्ये दगडफेक करणारे एवढे तरुण रस्त्यांवर का दिसतात? दगड फेकण्याचे जर कोणी दिवसाला ७०० रुपये देत असेल तर बेरोजगार मुले याकडे वळावीत यात नवल नाही. मी अनेक वेळा काश्मीर खोºयाचा दौरा केला आहे. मला तेथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत चौकात गप्पा मारणाºया तरुणांची टोळकी दिसली. यांना रोजगार का मिळत नाही, याचा मी बराच विचार करतो. काश्मिरी युवकांना सरकारने रोजगार उपलब्ध करून दिला तर फुटीरवाद्यांना रोजंदारीने दगडफेक करण्यासाठी कोणीही न मिळण्याचा दिवस फार लांब असणार नाही. आधी काँग्रेस सरकार व आता मोदी सरकारही कौशल्यविकासावर भर देत आहे. मोदीजींनी ‘मेक इन इंडिया’ची नवी घोषणाही दिली आहे. त्यादृष्टीने कामही होत आहे. पण त्याचे म्हणावे तसे परिणाम दिसत नाहीत. यातूनच रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याने ‘मेक इन इंडिया’च्या ठोस परिणामांची आपण आतुरतेने वाट पाहात आहोत.
दहशतवाद हे आपल्या फुलबागेत फोफावत असलेले आणखी एक निवडुंग आहे. दहशतवादाने ग्रासलेल्या देशांमध्ये भारताचा चौथा क्रमांक लागतो. खरे तर आपण दोन प्रकारच्या दहशतवादाचा मुकाबला करत आहोत. एक पाकिस्तानकडून प्रायोजित केला जाणारा दहशतवाद. दुसरा हा नक्षलींच्या रूपाने देशातच पैदा झालेला दहशतवाद आहे. मला वाटते की या दोन्हींशी लढण्यासाठी निरनिराळी रणनीती असायला हवी. आदिवासी भागांचा झपाट्याने विकास करण्यासोबतच कायद्याचा पाश आवळून नक्षलींना नक्कीच वेगळे पाडता येईल. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादासाठी इस्रायलसारखे ‘झिरो टॉलरन्स’चे कठोर धोरणच स्वीकारावे लागेल. फुलबागेत वाढणारी ही निवडुंगे वेळीच समूळ उपटून फेकून देणे गरजेचे आहे.
मी आपल्याला एक घटना सांगतो. थोर वैज्ञानिक व माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम गुजरातमधील आणंद येथे मुलांशी गप्पागोष्टी करत होते. एका मुलाने त्यांना विचारले की, देशाचा सर्वात मोठा शत्रू कोणता? पारुल नावाची एक चुणचुणीत मुलगी उत्तरली की, गरिबी हा देशाचा सर्वात मोठा शत्रू आहे! मलाही वाटते की, देशातून गरिबीचे उच्चाटन झाल्याखेरीज आपली ही भारतरूपी फुलबाग खºया अर्थाने गुलशन गुलजार होणार नाही. इतरही अनेक निवडुंगांचे काटे राष्ट्राच्या शरीराला टोचत आहेत. उदा. कुपोषित व अविकसित मुलांची संख्या चार कोटी आहे. वयाच्या तुलनेत उंची व वजनाने खुरटलेल्या मुलांच्या बाबतीत १३० देशांच्या यादीत भारत १२० व्या क्रमांकावर आहे. आपल्याकडे १,०५० नागरिकांमागे सरकारी इस्पितळात एक खाट उपलब्ध आहे, तर सरासरी एक हजार रुग्णांमागे ०.७ म्हणजे पूर्ण एक डॉक्टरही उपलब्ध नाही. याहून विटंबना अशी की संशोधन आणि विकासावर जगभरात केल्या जाणाºया खर्चात भारताचा वाटा २.१ टक्के आहे. युरोपचा हाच वाटा २४.५ टक्के आहे.
देशाची सामाजिक स्थितीही ठीक नाही. भारताच्या धर्मनिरपेक्ष स्वरूपावर गंभीर आघात होत आहे. मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी जी खंत व्यक्त केली ती गंभीरपणे दखल घेण्यासारखी आहे. विविधतेत एकता ही भारताची खरी शक्ती आहे. देशाच्या विकासाचा भक्कम पाया रचल्याबद्दल आपण पंडित नेहरूंना सलाम करायला हवा. टीका करणे आणि नावे ठेवणे सोपे आहे. सरकारे येतात आणि जातात. आपण कोणत्या वाटेने जात आहोत याला महत्त्व आहे. केवळ ‘मेरा देश महान’ म्हटल्याने देश महान होत नाही. त्यासाठी स्वातंत्र्यासोबत सर्वधर्मसमभावही तेवढाच आवश्यक आहे.
हे लिखाण संपविण्यापूर्वी...

पंजाबच्या देविंदर सिंग कांग याचे नाव अनेकांना फारसे परिचित नसेल. पण हा २६ वर्षांचा जिगरबाज युवक विश्वचषक भालाफेक स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र ठरलेला भारताचा पहिला खेळाडू आहे. १५ जणांच्या चमूमधूून त्यालाच हे साध्य करता आले. कांगला माझ्या मनापासून शुभेच्छा व अभिनंदन. युवा पिढीचा तो हिरो आहे.
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड)
vijaydarda@lokmat.com

Web Title: Cactus of Challenges in Fulbagh of Independence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.