गरीब देशाचे ‘श्रीमंत’ थकबाकीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:19 AM2018-05-10T00:19:44+5:302018-05-10T00:19:44+5:30

मार्क्सला जाऊन आता शंभरावर वर्षे झाली. त्याच्या विचारांपासून त्याच्याच अनुयायांनी फारकतही घेतली. मात्र त्याच्या विचारांचा गाभा अद्याप तेवढाच खरा आहे. जगाच्या एकूण संपत्तीपैकी ७० टक्के संपत्ती फक्त ४२ कुटुंबांच्या मालकीची आहे हे जागतिक पाहणीतले एक वास्तव जेवढे बोलके तेवढीच भारताच्या एकूण संपत्तीपैकी ७९ टक्के संपत्ती केवळ एक टक्का लोकांच्या ताब्यात असल्याचे सत्यही अतिशय जळजळीत आहे.

Bank lone Arrears news | गरीब देशाचे ‘श्रीमंत’ थकबाकीदार

गरीब देशाचे ‘श्रीमंत’ थकबाकीदार

Next

मार्क्सला जाऊन आता शंभरावर वर्षे झाली. त्याच्या विचारांपासून त्याच्याच अनुयायांनी फारकतही घेतली. मात्र त्याच्या विचारांचा गाभा अद्याप तेवढाच खरा आहे. जगाच्या एकूण संपत्तीपैकी ७० टक्के संपत्ती फक्त ४२ कुटुंबांच्या मालकीची आहे हे जागतिक पाहणीतले एक वास्तव जेवढे बोलके तेवढीच भारताच्या एकूण संपत्तीपैकी ७९ टक्के संपत्ती केवळ एक टक्का लोकांच्या ताब्यात असल्याचे सत्यही अतिशय जळजळीत आहे. कारण, हा देश गरिबांचा असला तरी त्यावर मालकी श्रीमंतांची आहे हे उघड करणारे हे वास्तव आहे. सारीच संपत्ती, मार्क्स म्हणतो तशी या धनवंतांनी चोरीच्या वा लुटीच्या मार्गाने मिळविली नसेल. पण त्या वर्गाची स्वार्थी व लबाड वृत्ती मात्र पूर्वीएवढीच आजही कायम राहिली आहे. भारतातील सगळ्या राष्टÑीयीकृत बँका येथील बड्या उद्योगपतींनी लुबाडल्या आहेत आणि त्यातले अनेकजण ती लूट घेऊन देशाबाहेर पळूनही गेले आहेत. विजय मल्ल्या, ललित आणि नीरव हे दोन मोदी, कैलास अग्रवाल, नीलेश पारस, किरण मेहता, बलराम गर्ग अशी या बड्या व पळालेल्या चोरांची नावे आहेत. आज ते देशाबाहेर आहेत आणि या पार्श्वभूमीवर ज्या आणखीही काही बड्या धनवंतांकडे बँकांच्या कर्जाची प्रचंड रक्कम थकलेली आहे त्यांची यादी खा. संजय सिंह या राज्यसभा सदस्याने नुकतीच जाहीर केली आहे. केंद्र सरकारच्या कोळसा, पोलाद व कृषी या महत्त्वाच्या समित्यांचे सिंह हे सदस्य आहेत आणि त्यांनी ‘आता हे लोक तरी पळून जाणार नाहीत याची खबरदारी घ्या’ असे सीबीआयला सुचविले आहे. त्यांनी जाहीर केलेल्या या यादीत सर्वात वरचे नाव अनिल अंबानीचे असून त्याच्याकडील बँकांची थकबाकी १ लक्ष २५ हजार कोटी एवढी प्रचंड आहे. (तरी त्याच्यावरील २६ हजार कोटींचा एक कर्जभार त्यांचे थोरले बंधू मुकेश अंबानी यांनी नुकताच उचलला आहे.) अनिल अग्रवाल याची थकबाकी १ लक्ष ३ हजार कोटींची, रूईया बंधूंची १ लक्ष १ हजार कोटींची, गौतम अदानींची ९६ हजार ३१ कोटींची, मनोज गौरची ७५ हजार १६३ कोटींची, सज्जन जिंदालची ५८ हजार १७१ कोटींची, सी.एन. रावची ४७ हजार ९७६ कोटींची, एल. मधुसूदन रावची ४७ हजार १७२ कोटींची, वेणुगोपाल धूतची ४५ हजार ४०५ कोटींची, ब्रिजभूषण जिंदालची ३७ हजार २४८ कोटींची, पीव्हीके रेड्डीची ३३ हजार ९३३ कोटींची, सुरिंदरकुमार मोन याची २२ हजार ७५ कोटींची, अरविंद धामची १४ हजार ७४ कोटींची, संदीप जाजोरियाची १२ हजार ११५ कोटींची, उमंग केजरीवालची १० हजार २७३ कोटींची, एच.एस. भरानाची १० हजार ६५ कोटींची, ऋषी अग्रवालची ६ हजार ९५३ कोटींची तर सदाशिव क्षीरसागर या गरीब माणसाची थकबाकी ५ हजार १६९ कोटी एवढी मोठी आहे. सामान्य माणसाचे डोळे नुसते विस्फारणार नाही तर ते फोडू शकणारी ही कोट्यवधींची आकडेवारी आहे. मल्ल्या, मोदी, चोकसी आणि अगरवाल हे या तुलनेत सामान्य म्हणावे असे अपराधी वा थकबाकीदार आहेत. संजय सिंह यांचे म्हणणे असे की मल्ल्या आणि मोदीसारखे पळतात तसे हेही पळू शकतील की नाही आणि मोदींचे सरकार पुन: त्यांच्या पळून जाण्याची फसवी कारणेच देशाला सांगत राहील की नाही? साधा शेतकरी त्याच्यावरील काही हजारांच्या कर्जापायी आत्महत्या करतो. कारण त्याची मानसिकता प्रामाणिक व नाळ जमिनीशी जुळली असते. मार्क्स म्हणतो तसा कामगारांसारखाच उद्योगपतींनाही देश नसतो. ही माणसे आत्महत्येसारखे भित्रे मार्ग पत्करत नाहीत. सगळी लूट घेऊन ती विदेशाचा रस्ता धरतात. अशा माणसांवर पाळत राखून त्यांच्या हालचाली टिपणे त्याचमुळे आवश्यकही असते.

Web Title: Bank lone Arrears news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.