Atal Bihari Vajpayee : मीडियासाठी एक आदर्श पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 03:42 AM2018-08-17T03:42:09+5:302018-08-17T03:42:19+5:30

अटलजी पत्रकारांसोबत तासन्तास बोलत बसायचे. ते खाण्याचे मोठे शौकीन होते. भाजपचे अनेक नेते त्यांचे मन जिंकण्यासाठी आपल्या भागातून त्यांच्यासाठी स्वादिष्ट पदार्थ आणत असत. पाहुण्यांचे आदरातिथ्य करणारे ते मोठ्या मनाचे व्यक्ती होते.

Atal Bihari Vajpayee: Ideal Prime Minister for Media | Atal Bihari Vajpayee : मीडियासाठी एक आदर्श पंतप्रधान

Atal Bihari Vajpayee : मीडियासाठी एक आदर्श पंतप्रधान

Next

- हरीश गुप्ता
(‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर)

अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी १९७३ मध्ये माझी पहिल्यांदा भेट झाली. त्यावेळी मी हिंदुस्थान समाचार या हिंदी न्यूज एजन्सीचे काम करत होतो आणि दिल्ली विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेताना अनेक वृत्तपत्रांसाठी लेखही लिहित होतो. १९७१ च्या लोकसभा आणि १९७२ च्या विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर इंदिरा गांधी या लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या. सततच्या पराभवामुळे विरोधकांचे खच्चीकरण झाले होते.
एका प्रमुख हिंदी वृत्तपत्राची अशी इच्छा होती की, मी अटलबिहारी वाजपेयी, ज्योतिर्मय बसू, भूपेश गुप्ता आणि अन्य नेत्यांच्या मुलाखती घ्याव्यात. बरेच प्रयत्न करून मी वाजपेयी यांच्या घरचा लँडलाईन नंबर मिळविला. कारण, त्या काळात असे नंबर मिळविणे सोपे काम नव्हते. आश्चर्याची बाब म्हणजे, स्वत: वाजपेयी यांनी फोन घेतला आणि मलाही याचा अतिशय आनंद झाला. संसद सदस्यांसाठी असलेल्या १, फिरोजशाह रोडवरील बंगल्यात ते राहात होते. माझ्यावर तसे दडपण होते. कारण, ते जनसंघाचे सर्वात लोकप्रिय नेते होते. परिस्थिती पाहून त्यांनी माझ्यासाठी अधिक सहज वातावरण निर्मिती केली आणि आमच्यातील चर्चा सुरू झाली. अगदी एका महिलेने त्यांना भोजनाची वेळ झाल्याचे सांगितले तोपर्यंत आमची चर्चा सुरूच होती. निघण्यापूर्वी ते मला म्हणाले, ‘बरखुरदार, तुम्हारा न्यूजपेपर ये सब छापेगा?’ मी पत्रकारितेत नवा होतो. यातील गुंतागुंत मला ठाऊक नव्हती. त्यांनी मुलाखतीत इंदिरा गांधी यांच्यावर कठोर टीका केली होती. मी धीर एकवटून म्हणालो, ‘सर, ही एक असाईनमेंट आहे आणि मला विश्वास आहे की, हे प्रकाशित होईल’ पण, त्यांना खात्री नव्हती. कारण, त्यांना अशी शंका होती की, हे काँग्रेस समर्थक वृत्तपत्र आहे. जागेअभावी ही मुलाखत नंतर संपादित स्वरुपात प्रकाशित झाली. मुलाखत प्रकाशित झाल्याचे सांगण्यासाठी मी त्यांना फोन केला. तोपर्यंत अटलजी यांनी ती मुलाखत वाचली होती आणि ते खूपच आनंदी होते. विशेषत: प्रोफाईल फोटोमुळे ते अधिक खूश होते. अशाप्रकारे एक पत्रकार म्हणून त्यांच्यासोबत माझा दीर्घ प्रवास सुरूझाला होता.
मी जेव्हा त्यांना फोन करत असे तेव्हा ते विचारत, ‘आजकल क्या चल रहा है?’ गप्पांमध्ये रंगणारे ते एक दिलदार राजकारणी होते. ते दिवस असे होते की, सुरक्षा रक्षक नव्हते, बंगल्याबाहेर एकही सुरक्षा रक्षक नसायचा. नेते स्वतंत्रपणे नागरिकांशी, मीडियाशी बोलायचे. दूरदर्शन वगळता कोणतेही न्यूज चॅनल नव्हते. अर्थात, ते विरोधी पक्षनेत्यांसाठी नव्हते. त्यामुळे प्रिंट मीडियाच्या व्यक्ती हे विरोधकांना अधिक जवळचे वाटायचे. पत्रकारांसोबत ते तासन्तास बोलत बसायचे. ते खाण्याचे मोठे शौकीन होते. भाजपचे अनेक नेते त्यांचे मन जिंकण्यासाठी आपल्या भागातून त्यांच्यासाठी स्वादिष्ट पदार्थ आणत असत. पाहुण्यांचे आतिथ्य करणारे ते मोठ्या मनाचे व्यक्ती होते.
मी ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये असताना आणि संसदेचे कामकाज बारकाईने कव्हर करत असताना अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी माझा अधिक संपर्क होऊ लागला. १९९६ मध्ये ते १३ दिवसांसाठी पहिल्यांदाच पंतप्रधान झाले होते. राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा यांनी त्यांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले होते आणि ते ६, रायसिना रोड येथील निवासस्थानी अडवाणी, डॉ. एम.एम. जोशी, जसवंत सिंह आणि अन्य नेत्यांसह चर्चा करत होते. त्यांना राष्ट्रपती भवनातून का बोलावण्यात आले आहे याबाबत कुणालाही काही माहिती नव्हती. कारण, त्यांच्याकडे संख्याबळ नव्हते आणि सहकारी पक्षही. ज्या क्षणी ते बाहेर आले तेव्हा पुढील पंतप्रधानपदासाठी मी त्यांचे अभिनंदन केले. पण, स्मितहास्य करत ते म्हणाले की, ‘मुझे राष्ट्रपती भवन से वापस तो आने दो.’ जनादेश कुणाच्याही बाजूने नव्हता. त्यामुळे नक्की काय होईल हे कुणीच सांगू शकत नव्हते. पण, नशिबाने फैसला केला की, अटलजी पंतप्रधान होतील. पंतप्रधान होण्यासाठीचे पत्र घेऊनच ते परतले होते. घटनास्थळी एसपीजीची टीम पोहोचली होती. निवासस्थानी अटलजींनी निवडक पत्रकारांसोबत चर्चा केली.
वाजपेयींसोबतच्या नात्याला १९९९ मध्ये नवे वळण मिळाले. जेव्हा ते आपल्या पक्षनेत्यांसोबत आणि एसपीजी टीमसोबत आपल्या कार्यालयातून बाहेर येत होते. मी एका कोपऱ्यात उभा होतो. मला पाहून ते थांबले. तो ऐतिहासिक दिवस होता. कारण, एप्रिल १९९९ मध्ये विरोधक सरकारला हटविण्यासाठी एकत्र झाले होते. आपल्या नेहमीच्या शैलीत ते मला म्हणाले,‘बरखुरदार, क्या हो रहा है.’ मी हळू आवाजात म्हणालो सर, संख्याबळाबाबत समस्या आहे. बसपा तयार नाही. तेव्हा तात्काळ उत्तर देत ते म्हणाले की, बसपा आपल्या बाजूने मतदान करील, असे मला प्रमोदजी यांनी सांगितले आहे. अभिनंदन करून मी परतलो. इकडे लोकसभेत बसपाने सरकारविरुद्ध मतदान करून इतिहास घडवला. ओडिशाचे मुख्यमंत्री गिरधर गमांग यांनी लोकसभेचा राजीनामा दिलेला नसल्याने लोकसभा अध्यक्षांनी गमांग यांना मतदान करण्याची अनुमती दिली. आपले व्यवस्थापन आणि प्रयत्न अपयशी ठरल्याचे पाहून वाजपेयींना धक्काच बसला. सर्व घडामोडीनंतर सरकार अवघ्या एक मताने पराभूत झाले. या व्यक्तीचे मोठेपण बघा, मतदान केल्यानंतर सभागृहाबाहेर मी उभा होतो तेव्हा काही न बोलता त्यांनी माझी पाठ थोपटली.
१९९९ मध्ये ते पुन्हा एकदा बहुमताने सत्तेत आले. वाजपेयींची मीडियाशी मैत्री जुळली होती. त्यांचे प्रसिद्धी सल्लागार अशोक टंडन हे पीटीआयचे माजी कर्मचारी होते. ते नेहमीच मदतीसाठी तत्पर असायचे. तथापि, एखाद्या लेखाने सरकार अस्वस्थही झाले; परंतु, वाजपेयी मिळून-मिसळून राहात. अशा स्थितीत त्यांच्या चेहºयावरील प्रेमळ हास्य आणि आपुलकीचा दृष्टीभाव कायम असे. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात समोरासमोर आलो असता त्यांच्या चेहºयावर नाराजीची पुसटशी लकेर जाणवली. त्यावेळी मी जहाजबांधणी मंत्री शत्रुघ्न सिन्हा यांच्या आसनावर एका कोपºयात बसलो होतो.
वाजपेयी आमच्या जवळून जात असताना आम्ही सर्व त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी उभे राहिलो. ते क्षणभर थांबत म्हणाले, ‘‘अरे, तुम इस कुरापती पत्रकार के साथ क्या रहे हो’’ तेव्हा वाजपेयी काय म्हणतात, हे शत्रुघ्न सिन्हा यांच्या लक्षातच आले नाही. एखाद्या लेखामुळे वाजपेयी नाराज असल्याचे ठाऊक असूनही मी मात्र तसे काही नसल्याचे भासवत होतो. दोन-चार आठवड्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने आम्हाला वाजपेयींच्या विदेश दौºयासाठी निमंत्रित केले. त्यातून या व्यक्तीच्या ठायी असलेली दुर्मिळ उदारता, मनाचा मोठेपणा प्रतित होतो.

Web Title: Atal Bihari Vajpayee: Ideal Prime Minister for Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.