कोरड्या विहिरीतील उड्या !

By किरण अग्रवाल | Published: April 2, 2019 07:08 AM2019-04-02T07:08:37+5:302019-04-02T07:10:35+5:30

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी पक्षांतरे होतच असतात, तर काहीजण तिकिटाकरिता नाही; पण सत्तेच्या छायेत कायम राहण्यासाठीही राजकीय घरोबे बदलत असतात.

Article on political leaders rebellion from party | कोरड्या विहिरीतील उड्या !

कोरड्या विहिरीतील उड्या !

Next

किरण अग्रवाल 

राजकारणात बाकी, म्हणजे पक्षनिष्ठा वगैरे काही असो वा नसो; परंतु स्वत:बद्दलचा दांडगा आत्मविश्वास असणारे नेते मोठ्या संख्येने बघायला मिळतात. समोर पराभव अगर अपयश दिसत असतानाही अनेकजण या आत्मविश्वासामुळेच स्वत:हून त्याकडे चालत जातानाही दिसतात. अर्थात, बऱ्याचदा जाणतेपणातूनही असे केले जाते, कारण पडणे निश्चित असले तरी पाडण्यासाठीच होती आमची खरी लढाई, अशी भूमिका घेऊन काहीजण लढत असतात. काही तर थांबण्याकरिता कुणाचा शब्द घेण्यासाठी देखील लढायची तयारी दर्शवतात. ‘भविष्यासाठीचा वायदा’ असा स्वच्छ वा स्पष्ट हेतू त्यामागे असतो. अशा साऱ्यांसाठी निवडणुकांचा काळ म्हणजे सुगीचे दिवस असतात. त्यामुळे आताही लोकसभा निवडणूक होत असल्याने अशाच अनेकांनी ठिकठिकाणी प्रमुख पक्षीय उमेदवारांच्या नाकात दम आणून ठेवलेला दिसून येणे स्वाभाविक म्हणायला हवे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी पक्षांतरे होतच असतात, तर काहीजण तिकिटाकरिता नाही; पण सत्तेच्या छायेत कायम राहण्यासाठीही राजकीय घरोबे बदलत असतात. याखेरीज काही असे असतात, जे बंडखोरी करून व प्रसंगी अपक्ष म्हणून रिंगणात उतरून आपले उपद्रवमूल्य दर्शवून देण्याचा प्रयत्न करतात. अर्थात, कमी मतदारसंख्येच्या निवडणुकीत त्यांचे गणित जुळूनही जाते कधी कधी; परंतु लोकसभेसारख्या मोठ्या मतदारसंघात तसे होणे अवघडच असते. नाशिक जिल्ह्याचेच उदाहरण घ्या, नाशिकसह पूर्वीच्या मालेगाव व आताच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंतच्या म्हणजे १९५१ ते २००४ पर्यंतच्या १६ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ११५ अपक्षांनी नशीब आजमावले; परंतु त्यापैकी एकालाही दिल्ली गाठणे शक्य झाले नाही. एकदा तर खासदार राहून नंतर अपक्ष उमेदवारी करणा-या डॉ. प्रतापराव वाघ यांना अवघ्या नऊ हजार मतांवर समाधान मानावे लागले होते. तात्पर्य इतकेच की, बंडखोरी करीत अपक्ष म्हणून लोकसभेची निवडणूक लढणे हे साधे सोपे नाही.

खासदारकीची हॅट्ट्रिक करूनही यंदा तिकीट कापले गेलेल्या दिंडोरीतील हरिश्चंद्र चव्हाण यांनी हीच वास्तविकता लक्षात घेऊन, अपक्ष उमेदवारी म्हणजे ‘कोरड्या विहिरीतली उडी’ असल्याचे अतिशय अचूक विधान केले आहे. पण राज्यातच नव्हे; संपूर्ण देशात अशा ‘उड्या’ घेऊ पाहणाऱ्यांची संख्या वाढतेय हेच आश्चर्यकारक आहे. अर्थात, प्रारंभी उल्लेखिल्यानुसार स्वत:बद्दलच्या फाजील वा अतिआत्मविश्वासातूनच या अपक्ष उमेदवा-या वाढत आहेत हेच खरे. यात अशा उमेदवा-यांना कुणाचा विरोध असण्याचेही कारण नाही, कारण लोकशाही व्यवस्थेने तसा अधिकार प्रत्येकाला दिला आहे. परंतु कधी कधी प्रमुख उमेदवारांची गणिते बिघडवायला त्या कारणीभूत ठरतात, म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणारे नसते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, उमेदवारी नाकारली गेल्याने बंडखोरी करणा-या किंवा अपक्ष लढणा-यांचेही एकवेळ समजून घेता यावे; परंतु साध्या साध्या कारणाने रुसून बसणा-यांच्या नाराजीचे स्तोम हल्ली वाढत चालले आहे. पक्ष व निष्ठा यासंबंधी काही बांधिलकीच उरली नसल्याने हे घडते आहे. याच निवडणुकीतले उत्तर महाराष्ट्रातीलच एक उदाहरण घ्या, काय तर म्हणे गावात दुस-याकडे भेटायला येऊन गेलेला उमेदवार आपल्याकडे मात्र आला नाही म्हणून काँग्रेसमधील एका मातब्बर ज्येष्ठाने थेट वेगळ्या विचाराची भाषा केलेली दिसून आली. किती हा बालिशपणा? पण, उगाच किरकोळ कारणातून नजरेत भरून जाण्यास काहीजण जसे उत्सुकच असतात. तिकीट वाटपात डावलले गेलेले अन्य इच्छुक आणि असे नाराजीचे स्तोम माजवण्यास उत्सुक असणा-यांना सांभाळत लढायचे म्हणजे तेच खरे दिव्य असते. मतदारांच्या दारात जाण्यापूर्वी अशांकडे हात जोडत फिरणे मग उमेदवारासाठी गरजेचे होऊन बसते. सध्या बहुतेक ठिकाणी अशाच कोरड्या विहिरीत उड्या घेऊ पाहणा-यांच्या नाकदु-या काढण्याचे प्रयत्न चाललेले पहावयास मिळत आहेत.  
 

Web Title: Article on political leaders rebellion from party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.