गुजरातच्या समरांगणात पंतप्रधानांसह सारा भाजप बॅकफूटवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:51 AM2017-12-02T00:51:31+5:302017-12-02T00:52:36+5:30

 All the BJP along with the Prime Minister in Gujarat's Samarang | गुजरातच्या समरांगणात पंतप्रधानांसह सारा भाजप बॅकफूटवर

गुजरातच्या समरांगणात पंतप्रधानांसह सारा भाजप बॅकफूटवर

Next

- सुरेश भटेवरा
(राजकीय संपादक, लोकमत)

गुजरात निवडणुकीवर साºया देशाच्या नजरा खिळल्या आहेत. पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना आपल्याच गृहराज्यात घनघोर युद्ध लढण्याची पाळी आली आहे. राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींची शाब्दिक जुगलबंदी ऐकताना गुजरातच्या जनतेची भरपूर करमणूक होते आहे. सत्ताधाºयांच्या विरोधात जनतेचा असंतोष इतका स्पष्टपणे जाणवतोय की, जनतेला विश्वासात घेण्यासाठी भाजपला पंतप्रधानांच्या ५० जाहीर सभा आयोजित कराव्या लागल्या आहेत. प्रचारमोहिमेच्या सुरुवातीला भाजपने १८२ मतदारसंघाच्या ५० हजार १२८ बुथवर पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ बरोबर ‘चाय पे चर्चा’ ची मैफल सजवली. अमित शाह, केंद्रातले दोन डझन मंत्री आणि भाजपचे तमाम नेते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. गुजराती जनतेचा हवा तसा प्रतिसाद मात्र या कार्यक्रमाला मिळाला नाही. नाटकाच्या नांदीलाच अपशकुन व्हावा, तसे घडले. पुढल्या टप्प्यात मग मोदींच्या सभांचा पट मांडला गेला. भरपूर खर्च करून योजलेल्या मोदींच्या पहिल्या चार सभांपैकी दोन सभा अक्षरश: फ्लॉप ठरल्या. जेमतेम पाच ते सात हजारांची उपस्थिती होती. उपस्थितांच्या चेहºयावर निरुत्साह होता. नेहमीप्रमाणे ‘मोदी मोदी’ घोषणा देणारी उत्साही पथकेही इथे फिरकली नव्हती. गुजरातच्या जमिनीवरचे हे वास्तव देशाला दाखवण्याची हिंमत, दुर्दैवाने एकाही वृत्तवाहिनीला अथवा प्रमुख वृत्तपत्राला झाली नाही.
गुजरातचे मतदान ९ आणि १४ डिसेंबरला आहे. पहिल्या टप्प्याच्या प्रत्यक्ष मतदानाला अवघे सात दिवस उरले आहेत. मतमोजणी १८ डिसेंबरला आहे मात्र प्रचाराचा प्रत्येक दिवस पुढे ढकलताना भाजपच्या तमाम नेत्यांना ऐन हिवाळ्यात घाम फुटला आहे. ज्या घोषणांवर गेल्या तीन निवडणुका गुजरातमध्ये लढवल्या गेल्या, ते मुद्दे यंदा पूर्णत: अप्रासंगिक ठरले आहेत. पंतप्रधान जनतेला भावनिक आवाहने करीत सुटले आहेत. भारतीय नागरिक कोणताही धर्म मानत असला तरी देशातील विविध प्रार्थना स्थळांवर जाऊ न परमेश्वराचे दर्शन घेण्याचा त्याला अधिकार आहे. भारताच्या विविधतेचे ते एक अलौकिक प्रतीक आहे. पंतप्रधानांसह भाजपला मात्र त्याचा विसर पडलाय. राहुल गांधींनी सोमनाथ मंदिराचे दर्शन घेताच, मंदिराच्या कुठल्याशा रजिस्टरचा आधार घेत, राहुल हिंदू नसल्याची हाकाटी भाजपने पिटली. सोमनाथ मंदिराच्या जीर्णोध्दाराला म्हणे पंडित नेहरूंचा विरोध होता. मोरवीच्या पूरग्रस्तांची पहाणी करताना पंतप्रधान इंदिरा गांधींनी नाकाला रुमाल लावला होता अशी बाष्कळ उदाहरणे खुद्द पंतप्रधान मोदी जाहीर सभांमधून देत होते. सोमनाथ मंदिराच्या जीर्णोध्दारानंतर अथवा मोरवीच्या महापुरानंतर गुजरातच्या जनतेने प्रचंड बहुमताने काँग्रेसच्याच हाती सत्ता सोपवली होती हा इतिहास मोदी विसरले काय? ६० वर्षे काँग्रेसने काय केले हा सवाल वारंवार विचारण्यापेक्षा त्याच ६० वर्षात जनतेने जनसंघ आणि भाजपला का नाकारले? याचे प्रत्यंतर मोदींच्या साडेतीन वर्षाच्या कारकिर्दीतच जनतेला आले आहे.
मोदींच्या हातून गुजरात गेले तर दिल्लीत पंतप्रधानपद सांभाळणे देखील त्यांना कठीण जाईल. स्वपक्षातच कदाचित बंडखोरीचे सूर उमटतील, अशी कुजबूज पक्ष कार्यकर्त्यांमधे आत्ताच सुरू झाली आहे. नोटाबंदीनंतर विरोधकांकडे पैसा नाही. भाजपने मात्र गुजरातच्या निवडणुकीत तुफान पैसा ओतला आहे, ही बाब एव्हाना लपून राहिलेली नाही. जनतेत मात्र पराकोटीचा असंतोष आहे. लोकसभा २०१४ च्या निवडणुकीनंतर गुजरातच्या ग्रामीण भागात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. २०१० साली भाजपकडे ३० तर काँग्रेसच्या हाती केवळ १ जिल्हा परिषद होती. मोदी पंतप्रधान झाल्यावर २०१५ साली कोणताही प्रबळ स्थानिक नेता नसताना, काँग्रेसने ४७.८५ टक्के मते मिळवली आणि ३१ पैकी २४ जिल्हा परिषदांवर काँग्रेसचा तिरंगा फडकवला. भाजपकडे ३० पैकी अवघ्या ६ जिल्हा परिषदा राहिल्या. गुजरातमध्ये धुमसणाºया असंतोषाचे हे पहिले प्रतीक होते. नोटाबंदी व जीएसटीच्या अतिरेकी अंमलबजावणीनंतर हा असंतोष शहरांमधेही पोहोचला. हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी व अल्पेश ठाकूर या तीन तरुण नेत्यांचा, राज्यातल्या अनुक्रमे १३ टक्के पाटीदार, ७ टक्के दलित आणि ४० टक्के ओबीसी समाजातले तरुण नेतृत्व अशा रूपात अचानक उदय झाला. आज हे तिन्ही नेते भाजपला हरवण्याचा निर्धार करीत, काँग्रेसबरोबर आले आहेत. मुस्लीम समाजाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही. राज्यातला प्रभावशाली पाटीदार पटेल समाज दीर्घकाळापासून काँग्रेसच्या विरोधात होता तरीही ९० च्या दशकात काँग्रेसच्या माधवसिंग सोलंकींनी सोशल इंजिनिअरींगचा प्रयोग करीत १८२ पैकी १४९ जागा जिंकल्या होत्या. गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये समोर मोदी असताना काँग्रेसने सरासरी ६० जागा जिंकण्याचे सातत्य राखले. २० ते २२ जागांवर काँग्रेस उमेदवार अवघ्या ५ ते ७ हजारांच्या फरकाने पराभूत झाले. गुजरातची सत्ता मिळवायला अवघ्या ९२ जागा लागतात. सत्ताधाºयांविरुद्ध पराकोटीचा असंतोष असताना ३२ जागांचा हा फरक काँग्रेस ओलांडणार नसेल तर मग केव्हा ओलांडेल? गुजरात निवडणुकीच्या समरांगणाचे प्रत्यक्ष अवलोकन करून आलेले दिल्लीतले पत्रकार खासगीत बोलताना सांगतात ‘गुजरातमधे यंदा काँग्रेसची त्सुनामी आहे. मतदानातून धक्कादायक चमत्कार घडेल शक्यता आहे. दिल्लीत केजरीवालांना ७० पैकी ६७ जागा मिळवून देणाºया चमत्कारासारखा तो मोठाही असू शकतो. वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांची सर्वेक्षणे मात्र अजूनही भाजपच आघाडीवर असल्याची भाकीते दाखवीत आहेत. त्यांची बिचाºयांचीही काही मजबुरी असू शकते. अंदाजांच्या या खेळाचा निकाल १८ डिसेंबरला स्पष्ट होईल.

Web Title:  All the BJP along with the Prime Minister in Gujarat's Samarang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.