२४ जुलै १९४३ सांगलीच्या क्रांतिकारकांच्या उडीचा अमृतमहोत्सव! - रविवार विशेष - जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:19 PM2018-07-21T23:19:43+5:302018-07-21T23:21:25+5:30

२४ जुलै १९४३ रोजी सांगलीचा जेल फोडून वसंतदादा पाटील आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी इंग्रजांच्या तावडीतून सुटका करुन घेतली होती. या घटनेचा परवा मंंगळवारी अमृतमहोतसव आहे.नव्या पिढीला हा इतिहास सांगण्यासाठी सांगलीत या घटनेचे स्मारक करावे, एखाद्या चौकाला २४ जुलै असे नाव द्यावे . २५ वर्षापूर्वी केलेली ही सूचना आतातरी अंमलात आणावी....

 24th July 1943 Amrit Mahotsav of Revolutionary Plane of Sangli! - Sunday Special - Jagar | २४ जुलै १९४३ सांगलीच्या क्रांतिकारकांच्या उडीचा अमृतमहोत्सव! - रविवार विशेष - जागर

२४ जुलै १९४३ सांगलीच्या क्रांतिकारकांच्या उडीचा अमृतमहोत्सव! - रविवार विशेष - जागर

googlenewsNext

वसंत भोसले--
२४ जुलै १९४३ रोजी सांगलीचा जेल फोडून वसंतदादा पाटील आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी इंग्रजांच्या तावडीतून सुटका करुन घेतली होती. या घटनेचा परवा मंंगळवारी अमृतमहोतसव आहे.नव्या पिढीला हा इतिहास सांगण्यासाठी सांगलीत या घटनेचे स्मारक करावे, एखाद्या चौकाला २४ जुलै असे नाव द्यावे . २५ वर्षापूर्वी केलेली ही सूचना आतातरी अंमलात आणावी....

सांगलीला दैनिक केसरीची बत्तीस वर्षांपूर्वी आवृत्ती सुरू झाली. त्या आवृत्तीमध्ये नियुक्त झालेला मी पहिला उपसंपादक होतो. तेव्हापासून सांगलीकर झालो. त्याला आता बत्तीस वर्षे झाली. आता कोल्हापूरला राहत असलो, तरी सांगलीकर म्हणूनच मला ओळखतात. कारण घर तेथेच, मतदार तेथेच, सुटीत राहणे तेथेच. तेव्हापासून सांगलीचा इतिहास, राजकारण, विकासाचे टप्पे, अडचणी, मर्यादा सगळं काही समजून घेण्याचा प्रयत्न केला. तो काळ म्हणजे महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाने भारून गेलेला होता. वसंतदादा यांच्या एका इशाºयाने सर्व निर्णय होत होते. ते राजस्थानचे राज्यपाल होते. सांगलीत आले की, शेतकरी सहकारी साखर कारखान्याला यात्रेचे स्वरूप येत असे. महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून कार्यकर्ते आणि नेते वसंतदादांना भेटायला येत असत. आम्ही ०े पत्रकार हे सर्व दूरवरूनच पाहत असायचो. दादांना पाहण्याची, त्यांना ऐकण्याची आम्हालाही उत्सुकता असायची.

सांगली जिल्ह्याला राजकीय आणि सार्वजनिक जीवनाची मोठी परंपरा आहे. कोल्हापूरचा परिसर शाहू संस्थानात होता. तेथे स्वातंत्र्याची लढाई होती; पण अधिक तीव्रता आणि जोर सांगली-साताºयाला होता. वसंतदादा पाटील यांच्यासह अनेक थोर स्वातंत्र्यसेनानी या जिल्ह्याने दिले. क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड, पांडू मास्तर, बर्डे गुरुजी, हुतात्मा नानकसिंग, किसन अहिर, मामासाहेब पवार, धोंडिराम माळी, नामदेव कराडकर, आण्णासाहेब पत्रावळे, रंगरावदादा पाटील, भगवानबप्पा मोरे, वाय. सी. पाटील अशी किती तरी नावे सांगता येतील. या सर्व क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य लढ्यात हिरीरीने भाग घेतला होता. राष्ट्रीय चळवळीचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता. महात्मा गांधी यांच्या अहिंसात्मक मार्गाचा प्रभाव असला, तरी सशस्त्र संघर्षाचा मार्गही त्यांनी हाताळला होता. नाना पाटील, वसंतदादा, जी. डी. बापू लाड, नागनाथअण्णा, आदींनी सशस्त्र संघर्षही केला. जेरबंद झाले तेव्हा तो फोडून ऐतिहासिक उडीही घेतली. शस्त्रे विकत घेण्यासाठी रेल्वे लुटली, पोस्टावर धाड टाकली. खजिने लुटले, ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले. त्याचबरोबर गावगुंडांचाही बंदोबस्त करून आया-बहिणींना संरक्षण दिले. दीनदुबळ्यांना संरक्षण दिले. हा सर्व इतिहास समजून घेण्याचा तो काळ होता. या सर्व मंडळींनी स्वातंत्र्योत्तर काळातही सहकाराच्या माध्यमातून विधायक, तसेच रचनात्मक कार्याला वाहून घेतले. सत्तेच्या राजकारणापासून ते चार हात लांबच होते. शिक्षण क्षेत्रातही पाया रचला.

या पार्श्वभूमीवर त्यावेळच्या दादांच्या सांगलीत असाच अभ्यास आम्ही पत्रकार मंडळी करीत होतो. स्वातंत्र्यानंतरच्या पिढीचे प्रतिनिधी संपतराव नाना माने, विठ्ठलदाजी पाटील, दिनकरआबा पाटील, शिवाजीराव देशमुख, संभाजी पवार, मोहनराव कदम, उमाजीराव सनमडीकर, डॉ. पतंगराव कदम, आदी मंडळी आमदार होती. शिवाजीराव नाईक, संपतराव देशमुख, आनंदराव मोहिते, शामराव कदम, अनिल बाबर, एस. टी. बामणे, आदी जिल्हा परिषदेचा कारभार पाहत होते. शरद पाटील, हरिभाऊ खुजट, मारुती झिंबल, शिवाजीराव माने, आर. आर. पाटील, आदी सदस्य जिल्हा परिषदेत विरोधकांची भूमिका बजावत होते. राजाभाऊ जगदाळे यांचे नगरपालिकेतील वर्चस्व कमी होऊन युवा नेते मदन पाटील निर्णय घेऊ लागले होते. विष्णूआण्णा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते. प्रकाशबापू पाटील यांचा खासदारपदाचा पहिला कार्यकाळ चालू होता. जयंत पाटील यांची आगामी राजकारणाच्या वाटचालीची पेरणी चालू होती. ते त्यावेळचे महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्याचे सर्वांत तरुण चेअरमन होते. भरभरून राजकारण करण्याचा तो कालखंड होता. सांगलीत काँग्रेसचा पहिल्यांदाच पराभव करणारे संभाजी पवार या बिजली पहेलवानाचा राज्यभर डंका झाला होता. त्यांना व्यंकाप्पा पत्की यांची साथ होती. वसंतदादा पाटील आणि शालिनीताई पाटील यांच्यात वितुष्ट आले होते. त्या आधीमधी सांगलीत यायच्या. आपले बंधू उत्तमराव फाळके यांच्या घरी उतरायच्या आणि तेथेच पत्रकार परिषद घेऊन वसंतदादांच्यावर जोरदार टीका करायच्या. त्याची बातमी लिहिण्यापेक्षा त्यांची वसंतदादा पाटील यांच्यासारख्या उत्तुंग राजकीय व्यक्तिमत्त्वाची टीका ऐकून घाबरायला व्हायचे. बातम्या छापून आल्या तरी दादा त्यावर भाष्य करायचे नाहीत.

१ मार्च १९८९ रोजी वसंतदादा यांचे निधन झाले. प्रचंड जनसमुदायाच्या साथीनं आणि तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत कृष्णा तीरावर अंत्यसंस्कार झाले. एक अध्याय संपला असं वाटत असायचं. मात्र, वसंतदादा पाटील यांच्या नावाची जादू अनेक वर्षे चालू होती. त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान आणि स्वातंत्र्योत्तर काळातील सहकार चळवळीतील सहभाग महाराष्ट्राच्या विकासाचा दिशादर्शक होता. त्यानुसार इतिहास समजून २४ जुलै १९४३ च्या त्या ऐतिहासिक घटनेची आठवण नेहमी येत राहायची.

वसंतदादा पाटील आणि त्यांच्या अनेक सहकाºयांनी कृष्णा काठावरील सांगली-मिरज परिसरात स्वातंत्र्याचे रणसंग्राम पुकारले होते. त्यांना ब्रिटिशांनी पकडले आणि सांगलीच्या राजवाड्यातील खंदकाजवळ असलेल्या जेलमध्ये ठेवले होते. जेलमध्ये ठेवले म्हणून गप्प बसून राहणारे ते स्वातंत्र्यसैनिक नव्हते. त्यांनी नियोजन केले आणि भर पावसाळ्यात पोलीस अधिकाºयांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. जेलच्या भिंतीवरून खंदकाच्या बाजूने उड्या टाकल्या. वसंतदादा पाटील आणि त्यांचे बारा सहकारी जेल फोडून बाहेर पडले. पाऊस कोसळत होता. शनिवारचा दिवस असल्याने कापड पेठेतून नदीकडे जाणाºया रस्त्यावर आठवडी बाजार भरला होता. (आजही तेथेच आठवडी बाजार भरतो.) या स्वातंत्र्यसैनिकांनी भर बाजारातून पळ काढला. पोलीस मागे लागले होते. त्या सर्वांनी टिळक चौकातून कृष्णा नदीकडे पळ काढला. नदीला पूर आला होता. मागे पोलीस लागले होते. गोळीबार करीत होते. आता एकच मार्ग होता. पुरात उड्या ठोकायच्या आणि हरिपूरच्या दिशेने पोहत कृष्णा-वारणा नद्यांच्या संगमाकडे जायचे. तेथून कवठेसारच्या दिशेने कोल्हापूर संस्थानात धूम ठोकायची असा विचार होता.

त्या २४ जुलैची ही ऐतिहासिक उडी आठवली की अंगावर रोमांच उभे राहत असतं. पोलिसांचा गोळीबार चुकवीत कृष्णा नदीत उड्या मारल्या; मात्र वसंतदादा पाटील आणि बाबूराव जाधव यांना गोळ्या लागल्या. वसंतदादांच्या खांद्यात गोळी घुसली. त्या जखमेसह त्यांनी कृष्णेचा पैलतीर गाठला. बाबूराव जाधव यांना लागलेल्या गोळ्यांंमुळे त्यांचा कृष्णेच्या वाहत्या पाण्यातच मृत्यू झाला. त्यांचा मृतदेहही सापडला नाही. बाबूराव जाधव यांचा मूळचा ठावठिकाणाही समजत नाही. ते मूळचे बेळगावचे होते. कामानिमित्त सांगलीत आले होते आणि वसंतदादा पाटील यांच्या सहवासात येऊन स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी भाग घेतला, असे एका निवेदनात वसंतदादा पाटील यांनीच सांगितले आहे. दादांच्या आठवणीच्या एका पुस्तकातही हा उल्लेख आढळतो.
या स्वातंत्र्य सैनिकांच्या गटात आण्णासाहेब पत्रावळे होते. त्यांना नदीकाठावर पळताना दम लागला. नदीकाठच्या मळीच्या रानात चिखल होता. त्यांचा पाय चिखलात अडकला. पुराच्या पाण्यात त्यांना सूर मारता आला नाही. मागून पाठलाग करणाºया पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते ठार झाले. या ऐतिहासिक उडीचे हे दोन हुतात्मे झाले. कामेरीचे हिंदुराव पाटील यांचे धैर्य वाखाणण्याजोगे आहे. जेलच्या भिंतीवरून उडी मारताना ते दगडावर पडले. त्यांचा गुडघा फुटला. रक्तबंबाळ झाले. तसेच पळत जाऊन पुरात उडी मारून त्यांनी पैलतीर गाठला होता. हा सर्व इतिहास समजून घेत घेत १९९३ साल उजाडले. तेव्हा या घटनेचा सुवर्ण महोत्सव होता. २४ जुलै १९९३ रोजीच्या केसरीत बातमी लिहिली की, या ऐतिहासिक घटनेचा सुवर्णमहोत्सव होत असताना साºयांनाच विसर कसा पडला आहे.

सांगलीचे पालकमंत्री शिवाजीराव देशमुख यांचा त्याच दिवशी सांगली दौरा होता. आम्हा पत्रकारांना ते म्हणाले, थोडी आधी कल्पना दिली असती तर सुवर्णमहोत्सव साजरा केला असता. जिल्ह्यातील तमाम नेतेमंडळी उपस्थित होते. त्यावेळी काही झाले नाही. केले नाही आणि पुढेही काही केले गेले नाही. बाबूराव जाधव आणि आण्णासाहेब पत्रावळे हे हुतात्मे झाले. वसंतदादा पाटीलही काळाच्या पडद्याआड गेले. आता त्या ऐतिहासिक उडीत भाग घेतलेल्यांपैकी कोणीही जिवंत नाही. मात्र, सांगलीत त्या घटनेची एकही खूण कोठे नोंदवून ठेवण्यात आलेली नाही. बेळगावच्या त्या युवकाचा (बाबूराव जाधव) कोणी उल्लेखही करीत नाही.त्यांचे एका रस्त्याला नावही दिले नाही की चौकाचे नामकरण केले नाही. काही स्वातंत्र्य सैनिकांनी पुढाकार घेऊन सांगलीतील आमराई उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ आण्णासाहेब पत्रावळे यांचा अर्धपुतळा उभा केला आहे. तेवढीच काय ती या ऐतिहासिक घटनेची साक्ष आहे.
उद्याच्या २४ जुलै रोजी क्रांतीकारकाच्या या ऐतिहासिक उडीच्या घटनेला पंचाहत्तर वर्षे होतील. अमृतमहोत्सवी वर्ष असणार आहे. जेव्हा सुवर्णमहोत्सव झाला, त्यावेळी या घटनेची नोंद सांगलीत कोठे ना कोठे झाली पाहिजे, त्यानिमित्ताने एखादे स्मृतिभवन करावे, एखाद्या चौकालाच २४ जुलै चौक असे नाव द्यावे, असे अनेकांना सुचवून पाहिले. मात्र, त्या ऐतिहासिक घटनेचे महत्त्व कोणालाच जाणवले नाही, हे दुर्दैव होय. इतिहास घडवावा लागतो. घडलेल्या इतिहासाची नोंदही पुढील पिढीसाठी प्रेरणा म्हणून जतन करावी लागते.

१३ जुलै १६६० रोजी पन्हाळगड ते विशाळगड दरम्यान पावनखिंडीचा ऐतिहासिक संग्राम झाला. सरसेनापती बाजीप्रभू देशपांडे यांच्यासह अनेक शिवरायांचे मावळे गतप्राण झाले. शिवरायांना सुखरूप विशाळगडापर्यंत पोहोचण्यासाठी लढा देत राहिले. स्वराज्याचे संरक्षण करताना धारातीर्थ पडणार हे माहीत असतानाही त्यांनी लढा दिला. या लढ्यात अपयश येणार, मारले जाणार, पण शिवराय वाचणार आहेत, तो स्वराज्याचा विजय असणार असे सांगत ते धारातीर्थी पडले. हा जाज्वल्य इतिहास आजही अनेक शिवप्रेमी तन-मन-धनाने प्रेरणा म्हणून पाळतात. तो साजरा करतात. अनेक युवक त्या मार्गाने चालत जाऊन त्या ऐतिहासिक घटनेचे स्मरण करून बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांना वंदन करतात. हे इतिहासाचे प्रेम आहे. इतिहासाची प्रेरणा आहे.आपल्या स्वातंत्र्य लढ्यातीलही अनेक प्रसंग नव्या पिढीला सांगण्यासारखे आहेत. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जगाचे वातावरण बदलले असले तरी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर जगाचा इतिहास आठवून पहा. इतक्या अस्थिर वातावरणात आणि वैचारिक मतभेदातही स्वतंत्र भारताचे स्वप्न अनेकांनी पाहिले होते. ते काही अमर राहणारे नव्हते; पण त्या काळाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती.

वसंतदादा  पाटील आणि त्यांच्या सहकाºयांवरही पडली होती. त्यांनी ती प्राणाची बाजी लावून निभावली. त्याची प्रेरणा म्हणून नोंद घ्यायला नको का? मदन पाटील सांगली महापालिकेत नेतृत्व करीत होते आणि किशोर शहा महापौर होते. तेव्हापासून सूचना करीत आलो आहोत. माधवनगरच्या रस्त्यावरील एक-दोन मोठे चौक आहेत. त्यापैकी एका चौकालाच ‘२४ जुलै चौक’ असे नाव द्यावे. एखाद्या तारखेच्या नावाने चौक असणे, म्हणजे नेमके काय आहे? असा चौकस सवाल भावी पिढीला , सांगलीत येणाºया बाहेरच्या लोकांना पडेल आणि त्या इतिहासाची उजळणी होत राहील. त्या चौकात एक स्मृतिस्तंभ करा. त्यावर त्या तेरा स्वातंत्र्यसैनिकांची नावे लिहा आणि २४ जुलै १९४३ रोजी सांगलीचा जेल फोडण्याच्या इतिहासाची नोंद करा. समजू द्या भावी पिढीला!या सूचनेची नोंद कोणी घेतली नाही. सुवर्णमहोत्सवी वर्षात ती मांडणी केली होती. आता त्यालाही पंचवीस वर्षे होत आली. अमृतमहोत्सव होत आला. शतकमहोत्सव होईल तेव्हा वसंतदादा पाटील आणि त्यांच्या सहकाºयांना पाहिलेल्यांपैकी कोणी असणार नाहीत. हा इतिहासही कोणी सांगेल की नाही याची कल्पना नाही. सत्तेवर कोणीही असो, त्या त्या गावाचा, शहराचा इतिहास नोंदविला पाहिजे. याबाबत कोल्हापूरला शंभर टक्के गुण दिले पाहिजेत. करवीरच्या संस्थापिका ताराराणी यांच्या धीरोदात्त प्रतिमेच्या पुतळ्याचे दर्शन होेऊनच कोल्हापुरात प्रवेश होतो. राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा त्यांच्या निधनानंतर केवळ चार वर्षांत उभारण्यात आला आहे. कोल्हापूरला घडविणाºया प्रत्येकाची नोंद कोठे ना कोठे घेण्यात आली आहे. नामदार भास्करराव जाधव, भाई माधवराव बागल, आप्पासाहेब पवार, बाळासाहेब देसाई अशी अनेकांची नावे सांगता येतील.

सांगलीने आता तरी ही उणीव भरून काढावी. सांगलीत वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाची उभारणी रडत-खडत झाली. ती पूर्ण झाली का? हा सवाल अनुत्तरीत आहे. सांगलीला गेले की, वसंतदादांचे स्मारक पाहून या, असा निरोप आपण मित्रांना दिला पाहिजे, असे स्मारक व्हायला हवे होते. आता तरी सांगली जिल्ह्याचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे भव्य स्मारक करावे.

Web Title:  24th July 1943 Amrit Mahotsav of Revolutionary Plane of Sangli! - Sunday Special - Jagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.