विदर्भाने रचला इतिहास, रणजी चषक पहिल्यांदाच जिंकला

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रीय क्रिकेट पटलावर नव्या चॅम्पियनचा उदय झाला. फैज फझलच्या नेतृत्वाखालील ‘अंडरडॉग्ज’ मानल्या जाणा-या विदर्भ संघाने चाहत्यांना नववर्षाची शानदार गिफ्ट रणजी चषक पटकावून दिला. विदर्भाने अंतिम लढतीत सातवेळचा चॅम्पियन दिल्ली संघाचा पराभव करीत प्रथमच रणजी ट्रॉफी स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 01:21 AM2018-01-02T01:21:59+5:302018-01-02T01:22:18+5:30

whatsapp join usJoin us
 Vidarbha wins the history, Ranji Trophy for the first time | विदर्भाने रचला इतिहास, रणजी चषक पहिल्यांदाच जिंकला

विदर्भाने रचला इतिहास, रणजी चषक पहिल्यांदाच जिंकला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- नीलेश देशपांडे
इंदूर : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रीय क्रिकेट पटलावर नव्या चॅम्पियनचा उदय झाला. फैज फझलच्या नेतृत्वाखालील ‘अंडरडॉग्ज’ मानल्या जाणा-या विदर्भ संघाने चाहत्यांना नववर्षाची शानदार गिफ्ट रणजी चषक पटकावून दिला. विदर्भाने अंतिम लढतीत सातवेळचा चॅम्पियन दिल्ली संघाचा पराभव करीत प्रथमच रणजी ट्रॉफी स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला. येथे सोमवारी चौथ्या दिवशी संपलेल्या या लढतीत विदर्भाने नऊ विकेट््स राखून जेतेपदावर नाव कोरले. सामन्यात आठ बळी घेत विदर्भाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
विदर्भापुढे केवळ २९ धावांचे लक्ष्य होते. विदर्भाने एक गडी गमावत ३२ धावा करीत सहज विजय साकारला. नवव्यांदा अंतिम लढतीत खेळणारा मुंबईचा माजी कर्णधार वसीम जाफरने चौकार ठोकत कारकिर्दीत प्रथमच जेतेपदाच्या लढतीत विजयी धाव फटकावली. रणजी ट्रॉफी स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवणारा विदर्भ १७ वा संघ ठरला.
विदर्भाने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आणि त्यांचा पहिला डाव २९५ धावांत गुंडाळला. रजनीश गुरबानीने सहा बळी घेत दिल्लीचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रत्युत्तरात खेळताना विदर्भाने अक्षय वाडकरच्या (१३३) प्रथम श्रेणी कारकिर्दीतील पहिल्या शतकाच्या जोरावर ५४७ धावांची दमदार मजल मारली. दिल्ली संघाचा दुसरा डाव २८० धावांत संपुष्टात आला.
त्याआधी, सकाळच्या सत्रात कालच्या ७ बाद ५२८ धावसंख्येवरून पुढे खेळताना विदर्भाचे उर्वरित तीन फलंदाज झटपट बाद झाले. दिल्लीचा युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने १३५ धावांत ५ बळी घेतले. दिल्ली संघाला विदर्भाच्या पहिल्या डावात डावखुरा फिरकीपटू मनन शर्माची उणीव भासली. गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला गोलंदाजी करता आली नाही. दुसºया डावात मात्र फलंदाजीसाठी तो मैदानात उतरला.
दिल्लीच्या दुसºया डावात ध्रुव शोरे (६२) व नितीश राणा (६४) यांनी अर्धशतके झळकावली. शोरेने पहिल्या डावात १४५ धावांची खेळी केली होती. दिल्लीने डावाने पराभवाची नामुष्की टाळली असली तरी त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सलग दुसºयांदा अंतिम लढतीचे यजमानपद भूषविणा-या होळकर स्टेडियममध्ये विदर्भापुढे छोटे लक्ष्य होते. विदर्भाने कर्णधार फैज फझलच्या विकेटच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.
जाफर १७ आणि संजय रामास्वामी ९ धावा काढून नाबाद राहिले. मुंबईचा माजी कर्णधार जाफर नवव्यांदा रणजी ट्रॉफी अंतिम लढतीत खेळला आणि प्रत्येक वेळी त्याचा संघ चॅम्पियन ठरला.
पहिल्या डावात २५२ धावांनी पिछाडीवर पडलेल्या दिल्ली संघाची दुसºया डावात सुरुवात निराशाजनक झाली. धावफलकावर ३२ धावांची नोंद असताना कुणाल चंदेला (९) तंबूत परतला. त्यानंतर अनुभवी गौतम गंभीर बाद झाल्यामुळे दिल्ली संघाला मोठा धक्का बसला. गुरबानीच्या गोलंदाजीवर त्याला पायचित ठरविण्यात आले. त्यावेळी चेंडू डाव्या यष्टीबाहेर जात असल्याचे भासत होते.
राष्ट्रीय संघाबाहेर असलेला गंभीर फॉर्मात असल्याचे दिसत होते. त्याने ३७ चेंडूंना सामोरे जाताना ३६ धावा केल्या. त्यानंतर शोरे व राणा यांनी तिसºया विकेटसाठी ११० धावांची भागीदारी केली. दुसºया सत्रात या दोघांनी फ्लिक व ड्राईव्हचे शानदार फटके मारले. धावफलकावर १६४ धावांची नोंद असताना दिल्लीने शोरेची विकेट गमावली. त्याआधी, शोरेला पहिल्या स्लिपमध्ये तैनात जाफरकडून जीवदान मिळाले होते, पण त्याला त्याचा लाभ घेता आला नाही. राणाचा अडथळा गुरबानीने दूर केला. पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करणाºया हिंमत सिंगला खातेही उघडता आले नाही. आॅफ स्पिनर अक्षय वखरेने त्याचा त्रिफळा उडवला. कर्णधार ऋषभ पंतने (३२) सिद्धेश नेरळच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका खेळून आपली विकेट बहाल केली. त्याआधीच्या षटकात वाडकरने त्याला यष्टिचित करण्याची संधी गमावली होती. पंत बाद झाल्यानंतर दिल्लीचा डाव संपुष्टात येण्यास फार वेग लागला नाही. विकास मिश्राने ३२ चेंडूंना सामोरे जाताना ३ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या तर आकाश सुदनने १८ धावांचे योगदान दिले. त्यामुळे दिल्ली संघाला डावाने पराभवाची नामुष्की टाळता आली. विदर्भातर्फे अक्षय वखरेने ९५ धावांच्या मोबदल्यात ४, सरवटेने ३० धावांच्या मोबदल्यात ३ आणि गुरबानीने ९२ धावांत २ बळी घेतले.

हे कठीण परिश्रमाचे फळ
रणजी करंडक जिंकणे हे माझ्यासाठी भारताकडून झिम्बाब्वेविरुद्ध वन डे खेळण्यापेक्षा महत्त्वपूर्ण आहे. मी या मोसमात सर्वाधिक धावा केल्या पण सांघिक योगदानावर माझा विश्वास आहे. विजेतेपदाचे सर्वच भागीदार ठरतात. खरेतर या ऐतिहासिक जेतेपदाचे वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत. आम्ही नेहमी चषक जिंकण्याचाच विचार करीत होतो. स्वप्नपूर्ती झाल्यामुळे आनंद गगनात मावेनासा झाला आहे. काही मिळवायचे झाल्यास कठोर परिश्रमाची गरज असते. कोच पंडित यांनी आमच्यात ही भावना रुजविली. या श्रमाचे फळ मिळाले आहे. मी अनेक वर्षांपासून संघाचे नेतृत्व करीत आहे. नेतृत्व ही बाब सोपी नाही. अंतिम सामन्यात तिसºया दिवसाच्या खेळामुळे यंदा चॅम्पियन होऊ असा विश्वास लाभला. जेतेपदाच्या या प्रवासात व्हीसीए पदाधिकारी आणि कर्मचाºयांचेही योगदान आहे.
- फैज फझल कर्णधार विदर्भ

जेतेपदामुळे विदर्भ क्रिकेटला कलाटणी मिळेल : चंद्रकांत पंडित

रणजी करंडकाचे जेतेपद विदर्भ क्रिकेटला कलाटणी देणारे ठरेल, असा विश्वास संघाचे कोच आणि भारतीय संघाचे माजी यष्टिरक्षक चंद्रकांत पंडित यांनी व्यक्त केला. विदर्भाच्या विजयात मोलाची भूमिका बजाविणारे पंडित पत्रकारांशी बोलताना म्हणाले,‘ विजेता होणे सर्वांना आवडते. या जेतेपदामुळे विदर्भाचे क्रिकेट बदलणार आहे. केवळ हाच संघ नव्हे तर युवा संघांमध्ये आपण विजयी होऊ शकतो, असा विश्वास बळावेल. विदर्भात विजयी संस्कृती रुजविल्याचा मला आनंद होत आहे.’
विदर्भाच्या खेळाडूंमधील कठोर परिश्रम करण्याच्या भावनेचे कौतुक करीत कोच पुढे म्हणाले,‘दैनंदिन वेळापत्रक पाळणे कठीण असते. या खेळाडूंनी मला सन्मान दिला. मी घालून दिलेल्या मार्गावर त्यांनी श्रम केले. सांघिक भावनेने खेळणारे हे खेळाडू विजयाचे हकदार आहेत.’
पंडित हे कठोर आणि शिस्तबद्ध सरावासाठी ख्यातीप्राप्त आहेत. विजेतेपदाचा जल्लोष करणार का, असा सवाल करताच ते म्हणाले,‘या दिवसाची प्रतीक्षा होतीच. खेळाडू जल्लोष करण्यासाठी मोकळे आहेत. जेतेपदाचा आनंद भरभरून लुटायलाच हवा.’
व्हीसीए युवा क्रिकेटपटूंची फळी तयार करीत असल्याबद्दल पंडित यांनी व्हीसीए उपाध्यक्ष तसेच माजी आंतरराष्टÑीय खेळाडू प्रशांत वैद्य यांची प्रशंसा केली. आदित्य ठाकरेसारख्या युवा गोलंदाजाला थेट अंतिम सामन्यात पदार्पण करण्याची संधी दिल्याचे श्रेय त्यांनी वैद्य यांना दिले. मी आदित्यला बाद फेरीच्या सामन्यात संधी देण्याबद्दल उत्सुक नव्हतो पण वैद्य यांनी माझे मन वळविले. आदित्यची कामगिरी तुमच्यापुढे आहे, असे पंडित यांनी सांगितले. गोलंदाजी कोच सुब्रतो बॅनर्जी, अनुभवी खेळाडू वसीम जाफर आणि गणेश सतीश यांच्या भूमिकेचे देखील पंडित यांनी कौतुक केले.


धावफलक

दिल्ली पहिला डाव २९५. विदर्भ पहिला डाव (कालच्या ७ बाद ५२८ धावसंख्येवरून पुढे) :- अक्षय वाडकर झे. राणा गो. खेजरोलिया १३३, आदित्य सरवटे झे. पंत गो. राणा ७९, सिद्धेश नेरळ झे. पंत गो. सैनी ७४, रजनीश गुरबानी नाबाद ००, आदित्य ठाकरे झे. शोरे गो. सैनी ००. अवांतर (२८). एकूण १६३.४ षटकांत सर्वबाद ५४७. बाद क्रम : १-९६, २-१०७, ३-१३३, ४-२०६, ५-२३७, ६-२४६, ७-४१५, ८-५४७, ९-५४७, १०-५४७. गोलंदाजी : आकाश सुदन २७-३-२०२-२, एन. सैनी ३६.३-४-१३५-५, नितीश राणा १३.१-१-३२-१, खेजरोलिया ३९-८-१३२-२, व्ही. मिश्रा ३८-६-१०२-०, ध्रुव शोरे १०-१-२७-०.
दिल्ली दुसरा डाव :- कुणाल चंदेला झे. गुरबानी गो. वखरे ०९, गौतम गंभीर पायचित गो. गुरबानी ३६, ध्रुव शोरे झे. वाडकर गो. सरवटे ६२, नितीश राणा झे. वाडकर गो. गुरबानी ६४, ऋषभ पंत झे. वानखेडे गो. सिद्धेश नेरळ ३२, हिंमत सिंग त्रि. गो. वखरे ००, मनन शर्मा त्रि. गो. वखरे ०८, विकास मिश्रा यष्टिचित वाडकर गो. सरवटे ३४, नवदीप सैनी झे. सरवटे गो. वखरे ०५, आकाश सुदन झे. वानखेडे गो. सरवटे १८, कुलवंत खेजरोलिया नाबाद ०१. अवांतर (११). एकूण ७६ षटकांत सर्वबाद २८०. बाद क्रम : १-३२, २-५०, ३-१६४, ४-१८९, ५-१९०, ६-२२२, ७-२२८, ८-२३४, ९-२७९, २०-२८०. गोलंदाजी : रजनीश गुरबानी १८-२-९२-२, आदित्य ठाकरे १२-६-१४-०, अक्षय वखरे २८-२-९५-४, आदित्य सरवटे ९-१-३०-३, सिद्धेश नेरळ ९-१-३९-१.
विदर्भ दुसरा डाव :- फैज फझल पायचित गो. खेजरोलिया ०१, संजय रामास्वामी नाबाद ०९, वसीम जाफर नाबाद १७. अवांतर (४). एकूण ५ षटकांत १ बाद ३२. बाद क्रम : १-२. गोलंदाजी : खेजरोलिया ३-०-२१-१, सुदन २-०-७-०.

Web Title:  Vidarbha wins the history, Ranji Trophy for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.