मालिका विजयाचा धडाका कायम राखण्यात यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 04:15 AM2017-11-11T04:15:35+5:302017-11-11T04:16:00+5:30
विराट सेनेने आपल्या मालिका विजयाचा धडाका कायम राखला. या शानदार मालिका विजयाच्या निमित्ताने ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक अयाझ मेमन यांनी टीम इंडियाच्या शिलेदारांचे विश्लेषण केले आहे...
- अयाझ मेमन, संपादकीय सल्लागार
टी२० क्रिकेट इतिहासात न्यू झीलंडविरुद्ध एकदाही जिंकू न शकलेल्या टीम इंडियाने तीन सामन्यांची टी२० मालिका २-१ अशा रोमांचक पद्धतीने जिंकली. मालिका१-१ अशी बरोबरीत आल्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे अखेरचा सामना ८ षटकांचा खेळविण्यात आल्यानंतरही टी२० स्पेशालिस्ट असलेल्या बलाढ्य न्यूझीलंडला मात देत भारतीयांनी चमकदार कामगिरी केली. मुख्य म्हणजे यासह विराट सेनेने आपल्या मालिका विजयाचा धडाका कायम राखला. या शानदार मालिका विजयाच्या निमित्ताने ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक अयाझ मेमन यांनी टीम इंडियाच्या शिलेदारांचे विश्लेषण केले आहे...
4/10 मनिष पांड्ये
अजूनही मनीष संघात जागा मिळवण्यासाठी धडपडत आहे. एक सामना खेळताना त्याने त्याच्या फलंदाजीची क्षमता दाखवली. चपळ क्षेत्ररक्षण.
4/10 श्रेयस अय्यर
अय्यरला तिन्ही सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यातील एका सामन्यात त्याने चमक पाडली. हा खुलेपणाने खेळणारा गुणवान खेळाडू आहे, पण इतर फलंदाजांमध्ये छाप पाडण्यासाठी त्याला सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल.
4/10 अक्षर पटेल
पहिल्या सामन्यात खूप परिणामकारक ठल्यानंतर अक्षर काहीसा दडपणाखाली जाणवला. फलंदाजांना नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याला आणखी मेहनत घ्यावी लागेल.'
4/10 कुलदीप यादव
केवळ एक सामना खेळताना एकच षटक गोलंदाजी केली. कारण हा सामना ८ षटकांचा खेळविण्यात आला. कर्णधार संघ व्यवस्थापनाशी चर्चा करून कुलदीपला नियमितपणे संघात स्थान देऊ शकतो.
4.5 / 10 हार्दिक पांड्या
गेल्या काही महिन्यांमध्ये तुफानी प्रदर्शन केल्यानंतर पांड्या अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. तो फलंदाजी व गोलंदाजीतही फारशी चमक दाखवू शकला नाही, पण त्याला मर्यादित संधीही मिळाली. क्षेत्ररक्षणात छाप पाडली.
4.5 मोहमद सिराज
पाटा खेळपट्टीवर कॉलिन मुन्रो आणि कंपनीविरुद्ध सिराज खूप महागडा ठरला. पण त्याने जीव तोडून वेगवान मारा केला. तो भविष्यातील भारताचा वेगवान गोलंदाज आहे.
5/10 आशिष नेहरा
कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळत असताना नेहराच्या बळींची पाटी कोरी राहिली, पण त्याने शानदार मारा करताना आपले कौशल्य आणि महत्त्व दाखवून दिले.
5.5/10 महेंद्रसिंग धोनी
प्रतिकूल परिस्थितीमध्ये फलंदाजीला आला, पण आवश्यक गतीने धावा करण्यात अपयशी ठरला. त्याचा स्ट्राइक रेट (१४३.५८) कोहली आणि मनीष पांड्ये यांच्यानंतर सरस ठरला. धोनीची जागा मिळवण्याची स्पर्धा आता अधिक तीव्र होत आहे. यष्ट्यांमागे शानदार कामगिरी.
6/10 रोहित शर्मा
पहिल्या सामन्यात रोहितने जबरदस्त ८० धावांची खेळी केली. यानंतर त्याच्याकडून धावा झाल्या नाहीत, पण त्याच्यामुळे किवी गोलंदाजांवर एक दबाव राहिला; शिवाय त्याने शानदार क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शनही केले.
6/10 शिखर धवन
रोहितप्रमाणेच धवननेही पहिल्या सामन्यात ८० धावांची खेळी केली. गेल्या काही महिन्यांपासून त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये आपली जागा जवळपास नक्की केली आहे. डीपमध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण केले.
6/10 भुवनेश्वर कुमार
भुवीला एकदिवसीय मालिकेप्रमाणे छाप पाडण्यात अपयश आले. मुन्रोने केलेल्या तुफानी खेळीपुढे तो खूप महागडाही ठरला. पण हा एक दिवस सोडला तर तो संपूर्ण मालिकेत शानदार खेळला.
8/10 विराट कोहली
कोहलीने सर्वाधिक धावा काढल्या. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्याने आक्रमक नेतृत्व करताना किवी आव्हान यशस्वीपणे परतावले. अखेरच्या सामन्यात त्याने ज्या प्रकारे गोलंदाज हाताळले ते अप्रतिम कौशल्य होते.
9/10 युझवेंद्र चहल
चहलनेही चांगल्या नियंत्रणासह अप्रतिम वैविध्य असलेले लेग ब्रेक, गुगली आणि फ्लिपर्स टाकून किवी फलंदाजांना दडपणाखाली आणले. बुमराहप्रमाणेच इकोनॉमी रेट नियंत्रणात राखताना बळी घेत तो घातक ठरला.
9/10 जसप्रीत बुमराह
संपूर्ण मालिका गाजवताना आपली छाप पाडली. जबरदस्त नियंत्रण आणि विविधता या जोरावर त्याने सर्व गोलंदाजांच्या तुलनेत सर्वोत्तम इकोनॉमी रेट राखला. प्रतिकूल परिस्थितीत कोहलीसाठी अत्यंत भरवशाचा खेळाडू ठरला. विशेष करून थरारक झालेल्या अंतिम सामन्यात तो चमकला.