कपिलदेव, महेंद्रसिंग धोनी ठरले, भारतीय संघाचे यशस्वी कर्णधार

विश्वचषक क्रिकेट; मोहम्मद अझरुद्दीनने केले सर्वाधिक तीन वेळा नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 04:25 AM2019-05-20T04:25:29+5:302019-05-20T04:26:06+5:30

whatsapp join usJoin us
Kapil Dev, Mahendra Singh Dhoni, the successful captain of the Indian team | कपिलदेव, महेंद्रसिंग धोनी ठरले, भारतीय संघाचे यशस्वी कर्णधार

कपिलदेव, महेंद्रसिंग धोनी ठरले, भारतीय संघाचे यशस्वी कर्णधार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : इंग्लंडमध्ये ३० मे पासून रंगणारा १२व्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दर चार वर्षांनी रंगणाऱ्या या क्रिकेटच्या कुंभमेळ्यात भारताचे नेतृत्व आतापर्यंत सहा कर्णधारांनी केले असून, विराट कोहली या पंक्तीत स्थान मिळविणारा सातवा कर्णधार ठरणार आहे. यामध्ये मोहम्मद अझरुद्दीनने सर्वाधिक तीन विश्वचषक स्पर्धांमध्ये भारताचे नेतृत्व केले असून, कपिलदेव व महेंद्रसिंग धोनी भारताला विश्वजेतेपद मिळवून देण्यात यशस्वी ठरले आहेत.


एस. व्यंकटराघवन
देखणा क्रिकेटपटू म्हणून नावलौकिक मिळविलेल्या व्यंकटराघवन यांनी १९७५ व १९७९ साली विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केले. या दोन्ही विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाकडून विशेष कामगिरी झाली नाही. विशेष म्हणजे, व्यंकटराघवन यांच्या नेतृत्वाखाली भारताने ६ विश्वचषक सामने खेळताना केवळ एक सामना जिंकला. या सहा सामन्यांत व्यंकटराघवन यांना एकही बळी मिळविता आला नाही.

कपिलदेव : भारतीय क्रिकेटमध्ये मानाचे स्थान मिळविलेल्या कपिलदेव यांनी दोन विश्वचषक स्पर्धांमध्ये भारताचे नेतृत्व केले आणि यापैकी १९८३ साली त्यांनी भारताला पहिल्यांदा विश्वविजेतेपदाचा मान मिळवून दिला. यावेळी भारताकडून कोणालाही चमकदार कामगिरीची अपेक्षा नव्हती. मात्र, ‘डार्कहॉर्स’ ठरलेल्या भारताने सलामीलाच वेस्ट इंडिजला नमवून सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर, झिम्बाब्वेविरुद्ध अडखळल्यानंतर कर्णधार कपिलदेव यांनी नाबाद १७५ धावांची ऐतिहासिक खेळी करुन संघाला संजीवनी दिली. यानंतर, भारताने थेट अंतिम फेरीत पुन्हा विंडीजला धूळ चारली आणि इतिहास रचला. १९८७ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेतही कपिलदेव यांनी भारताचे नेतृत्व केले. मात्र, यावेळी भारताचे आव्हान उपांत्य सामन्यात संपुष्टात आले होते.



मोहम्मद अझरुद्दिन : विश्वचषक स्पर्धेत मोहम्मदन अझरुद्दीनने १९९२, १९९६ आणि १९९९ साली भारताचे नेतृत्व करताना या स्पर्धेत सर्वाधिक तीन वेळा भारताचे कर्णधारपद भूषविण्याचा मान मिळविला. १९९२ साली भारताने विशेष कामगिरी केली नाही. या वेळी भारताला ८ सामन्यांतून केवळ २ सामनेच जिंकता आले. यानंतरच्या १९९६ सालच्या विश्वचषकात मात्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जोरावर भारताने उपांत्य फेरीत धडक मारली होती. या वेळी सचिनने अनेकदा आपल्या जोरावर भारताला विजयी केले होते. १९९९ साली पुन्हा एकदा अझरुद्दीनने भारताचे नेतृत्व केले, पण या वेळी भारताकडून निराशाजनक कामगिरी झाली. सुपर सिक्स फेरीमध्ये स्पर्धेतून बाहेरचा रस्ता पकडावा लागल्यानंतर अझरुद्दीनला संघाचे कर्णधारपदही गमवावे लागले होते.

सौरव गांगुली मोहम्मद अझरुद्दीननंतर ‘बेंगॉल टायगर’ सौरव गांगुलीकडे भारताचे नेतृत्व सोपविण्यात आले होते. २००३ सालच्या विश्वचषक स्पर्धेत अडखळत्या सुरुवातीनंतर ऐतिहासिक कामगिरी करताना भारताने स्पर्धा इतिहासात दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. मात्र अंतिम फेरीत भारताला बलाढ्य आॅस्टेÑलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान गांगुलीने या विश्वचषक स्पर्धेत केवळ आपल्या आक्रमक नेतृत्वाची झलक न दाखवता तुफानी फलंदाजीही केली. या स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकावणाºया फलंदाजांत अव्वल राहिलेल्या सचिन तेंडुलकरनंतर गांगुलीने दुसरे स्थान पटकावले होते.

राहुल द्रविड
भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात निराशाजनक राहिलेल्या या विश्वचषकामध्ये संघाचे नेतृत्त्व केले होते राहुल द्रविडने. वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या या विश्वचषक स्पर्धेत भारताला साखळी फेरीतून गाशा गुंडाळावा लागला होता. याआधी झालेल्या २००३ च्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठल्यानंतर भारताकडून जेतेपदाची अपेक्षा होती. मात्र सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग आणि स्वत: द्रविड अशी स्टार मंडळी असतानाही भारतीय संघ अपयशी ठरला.

महेंद्रसिंग धोनी
२०११ साली भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्चस्व राखले. दुसºयांदा विश्वविजेतेपद मिळविताना भारताने २८ वर्षांनंतर बाजी मारली. अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध गौतम गंभीरच्या ९८ धावा व धोनीच्या नाबाद ९१ धावांच्या जोरावर भारताने जगज्जेतेपद जिंकले. धोनीचा विजयी षटकार या स्पर्धेतील लक्षवेधी क्षण ठरला. २०१५ सालच्या विश्वचषक स्पर्धेत भारताला धोनीच्या नेतृत्वात उपांत्य फेरीपर्यंतच समाधान मानावे लागले.

Web Title: Kapil Dev, Mahendra Singh Dhoni, the successful captain of the Indian team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.