अनुभवाला प्राधान्य देत झाली संघाची घोषणा

सळसळत्या युवा रक्ताऐवजी अनुभवाला प्राधान्य देताना, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ निवड समितीने ३० मे पासून सुरू होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 03:33 AM2019-04-16T03:33:36+5:302019-04-16T03:36:15+5:30

whatsapp join usJoin us
The announcement of the team was giving priority to the experience | अनुभवाला प्राधान्य देत झाली संघाची घोषणा

अनुभवाला प्राधान्य देत झाली संघाची घोषणा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : सळसळत्या युवा रक्ताऐवजी अनुभवाला प्राधान्य देताना, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ निवड समितीने ३० मे पासून सुरू होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. संघातील सर्वात अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनी याला पर्याय म्हणून बीसीसीआयने युवा रिषभ पंतऐवजी अनुभवी दिनेश कार्तिकला संधी दिली. तसेच, युवा अष्टपैलू विजय शंकर, लोकेश राहुल व रवींद्र जडेजा यांनीही १५ सदस्यांच्या भारतीय संघात स्थान मिळविण्यात यश मिळविले.
विशेष म्हणजे, २०१५ च्या विश्वचषक संघातील ७ खेळाडू यंदाच्या विश्वचषक स्पर्धेही खेळणार आहेत. बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी आणि निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी भारतीय संघ जाहीर केला. सोमवारी भारतीय संघाची घोषणा झाली आणि यासह विश्वचषक संबंधीच्या बºयाच प्रश्नांची उत्तरे मिळाली. कोणाला संधी मिळणार? चौथ्या क्रमांकासाठी कोणाची वर्णी लागणार? महेंद्रसिंग धोनीला राखीव यष्टीरक्षक म्हणू कोण स्थान पटकावणार? असे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडले होते. एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय निवड समिती या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चौथ्या क्रमांकावर खेळणार कोण, हा होता.
संघाला गरज पडल्यास विराट कोहली चौथ्या स्थानावर उतरेल, असे मत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले होते. रोहित शर्मा व शिखर धवन यांच्यावर सलामीची जबाबदारी सोपविल्यानंतर कर्णधार कोहली तिसºया स्थानावर येतो, पण चौथ्या स्थानासाठी भारताकडे सक्षम पर्याय नव्हता. २०१७ पासून बीसीसीआयने या स्थानासाठी जवळपास ११ खेळाडूंचे पर्याय वापरले, पण विश्वचषक स्पर्धा तोंडावर असतानाही भारतीय संघाला चौथ्या क्रमांकाची चिंता लागली होती. अनेकांनी अंबाती रायुडू, धोनी आणि केदार जाधव ही नावे पुढे केली होती. त्यात भर म्हणून रिषभ पंत, विजय शंकर, लोकेश राहुल यांचीही नावे चर्चेत होती, पण महाराष्ट्राच्या केदार जाधवने या शर्यतीत बाजी मारली.
चौथ्या स्थानासह संघात अतिरिक्त फिरकी गोलंदाज खेळवावा की चौथा वेगवान गोलंदाज, यावरही मोठी चर्चा सुरू होती. निवड समितीने यावरही तोडगा काढताना, रवींद्र जडेजा आणि विजय शंकर या अष्टपैलू खेळाडूंना संधी दिली आहे. लोकेश राहुलचा राखीव सलामीवीर म्हणून समावेश करण्यात आला असून, गरज पडल्यास चौथ्या क्रमांकासाठी त्याचा विचार केला जाऊ शकतो, असेही स्पष्ट करण्यात आले.
>राहुल, हार्दिकला संधी, पण ‘कॉफी’मुळे
पडू शकते ‘विकेट’
बीसीसीआयने जाहीर केलेल्या भारतीय संघात अष्टपैलू हार्दिक पांड्याचे स्थान पक्के होतेच, परंतु तो आणि राहुल विश्वचषक स्पर्धेत खेळतील, याची शाश्वती देणे कठीण आहे. एका टीव्ही शोदरम्यान महिलांबद्दल केलेले आक्षेपार्ह विधान त्यांना भोवण्याची शक्यता आहे. महिलांबद्दल विवादास्पद वक्तव्यानंतर पांड्या आणि राहुल यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. या प्रकरणाची चौकशी बीसीसीआयने नियुक्त केलेले लोकपाल करत असून, लोकपाल डी. के. जैन यांच्यासमोर दोघांनी आपली बाजू मांडली. यानंतर, लोकपालांना या प्रकरणाचा अहवाल प्रशासकीय समितीसमोर मांडायचा आहे. ‘अहवाल सादर करण्यासाठी वेळेचे बंधन नाही, परंतु विश्वचषक संघ जाहीर होण्यापूर्वी तो सादर झाल्यास बरे होईल. लोकपाल काय अहवाल देतात, त्यावर सर्व अवलंबून आहे,’ असे बीसीसीआयच्या एका अधिकाºयाने सांगितले होते.
>अशी असेल क्रमवारी
सलामी : रोहित शर्मा व शिखर धवन.
मधली फळी : विराट कोहली, केदार जाधव/ लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी.
६-७ क्रमांक : हार्दिक पांड्या, विजय शंकर/ रवींद्र जडेजा/ दिनेश कार्तिक
फिरकी गोलंदाज :
युजवेंद्र चहल/ कुलदीप यादव
वेगवान गोलंदाज : जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार

Web Title: The announcement of the team was giving priority to the experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.