पावसाळा तोंडावर; ओव्हरबर्डन उभेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 11:46 PM2018-06-17T23:46:35+5:302018-06-17T23:46:53+5:30

मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील वेकोलि प्रशासन राज्य शासन, जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाची पायमल्ली करीत आहे. वेकोलिने आपल्या प्रदूषणाने नागरिकांचे आयुष्यच कमी करून टाकले आहे.

Rainy face; Overburden standing | पावसाळा तोंडावर; ओव्हरबर्डन उभेच

पावसाळा तोंडावर; ओव्हरबर्डन उभेच

Next
ठळक मुद्देपुराची भीती कायम : वेकोलिची मुजोरी थांबेच ना

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील वेकोलि प्रशासन राज्य शासन, जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाची पायमल्ली करीत आहे. वेकोलिने आपल्या प्रदूषणाने नागरिकांचे आयुष्यच कमी करून टाकले आहे. चंद्रपूरलगत वेकोलिने भलेमोठे ओव्हरबर्डन केले आहे. यामुळे अनेकवेळा चंद्रपूरकरांना बॅक वॉटरचा सामना करावा लागला आहे. यापूर्वी अनेक जिल्हाधिकाऱ्यांनीही वेकोलिला ओव्हरबर्डन तात्काळ हटविण्याचे निर्देश दिले होते. मात्र वेकोलि कुणाचे ऐकायला तयार नाही. यावर्षी दमदार पाऊस येईल, असा अंदाज आहे. असे झाल्यास वेकोलिच्या ओव्हरबर्डनमुळे पुन्हा बॅक वॉटरचा सामना करावा लागणार आहे.
चंद्रपूरलगत असलेल्या माना खाण परिसरात व इरई नदीपात्रालगत वेकोलिने मातीचे मोठमोठे ढिगारे तयार केले आहे. वर्षांनुवर्षापासून याच ठिकाणी माती टाकण्यात येत असल्यामुळे हे ओव्हरबर्डन महाकाय झाले आहे. या ओव्हरबर्डनमुळे इरई नदीचे नैसर्गिक पात्र बदलत चालले आहे. परिणामी पावसाळ्यात चंद्रपूरकरांना नेहमीच बॅकवॉटरचा सामना करावा लागतो व पूरपरिस्थिती निर्माण होते. ४० टक्के चंद्रपूरकरांना याचा दरवर्षी फटका बसतो. २०१४ मध्येच ओव्हरबर्डन हटविणे व संरक्षक भिंत बांधणे यावर जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांमध्ये चर्चा झाली होती. वेकोलिला ओव्हरबर्डन हटविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा ओरड झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने ओव्हरबर्डन काही प्रमाणात कमी करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्यापही हे महाकाय ढिगारे तसेच कायम आहे.
उल्लेखनीय असे की निरीच्या चमूनेही चंद्रपूरच्या प्रदूषणाची पाहणी केली असता त्यांनीही वेकोलिच्या ओव्हरबर्डनमुळे पूरपरिस्थिती व प्रदूषण होत असल्याचा अहवाल दिला होता. जिल्ह्यात केवळ मुंगोली, बल्लारपूर व पद्मापूर येथेच नदीचा गाळ काढून ढिगारे हटविण्याचा अल्पसा प्रयत्न करण्यात आला. परंतु चंद्रपुरात पुरासाठी कारणीभूत असलेले माना खाणीमुळे निर्माण झालेले ढिगारे अद्याप हटविण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. तरीही वेकोलिने आपले ओव्हरबर्डन तसेच ठेवले आहे. त्यामुळे चंद्रपुरात पुराचा धोका कायम आहे.
भूस्खलन झाल्यास धोका
माना खुली कोळसा खाण परिसरात दहा ते बारा वर्षांपासून कोळसा उत्खनन केले जात आहे. लगतच गाववस्तीही आहे. त्या गावातील नागरिकांचे पुनर्वसन अद्याप झाले नाही. वेकोलिकडून मोबदला मिळेल व आपण त्या ठिकाणी वास्तव्यास जाऊ, या आशेवर गावातील नागरिक आहेत. गावाला लागूनच वेकोलिचे महाकाय ढिगारे आहेत. पावसाची संततधार सुरू राहिल्यास हे ढिगाºयाचे स्खलन होऊन संपूर्ण माना गाव धोक्यात येण्याची शक्यता आहे.

Web Title: Rainy face; Overburden standing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.