भविष्यात गोवरी-सास्ती गावाला पुराचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 11:38 PM2018-05-27T23:38:55+5:302018-05-27T23:39:07+5:30
शनिवारी रात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या पावसाने नाल्याला पाणी आले. मात्र पुढे नाल्याचा प्रवाह वेकोलिने माती टाकून अडविल्याने गोवरी वसाहतीपासून - बाबापूर गावाकडे जाण्याºया रस्त्यावरील नाल्याला एकाच दिवसाच्या पाण्याने पुराचे स्वरूप आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : शनिवारी रात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या पावसाने नाल्याला पाणी आले. मात्र पुढे नाल्याचा प्रवाह वेकोलिने माती टाकून अडविल्याने गोवरी वसाहतीपासून - बाबापूर गावाकडे जाण्याºया रस्त्यावरील नाल्याला एकाच दिवसाच्या पाण्याने पुराचे स्वरूप आले होते. त्यामुळे पावसाळ्यात गोवरी- सास्ती गावाला पुराचा धोका असल्याचे दिसून येते. वेकोलिने तत्काळ उपाययोजना केली नाही तर वेकोलि परिसरातील गावांना यावर्षी पुराचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
राजुरा तालुक्यातील कोळसा खाणीची मुजोरी वेकोलि परिसरातील गावांचे प्रचंड नुकसान करणारी आहे. गोवरी, सास्ती पोवनी, साखरी, गोयेगाव परिसरात वेकोलिच्या मोठ्या प्रमाणात खुल्या कोळसा खाणी आहे. कोळसा उत्खननासाठी वेकोलि प्रशासनाने मातीचे महाकाय ढिगारे नदी, नाल्याच्या काठावर टाकले आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास गोवरी परिसरात चांगलाच पाऊस बरसला. त्यामुळे गोवरी गावाजवळून वाहणाºया नाल्याला पाणी आले. मात्र वेकोलिने यावर्षी नाल्याच्या अगदी काठावर मातीचे ढिगारे टाकल्याने नाल्याचे नैसर्गिक पात्र पूर्णत: अरुंद झाले आहे.
काही ठिकाणी नाल्याचा प्रवाहच अडल्याने नाल्यातून समोर पाणी निघण्याचे मार्गच बंद झाले. त्यामुळे रात्रीच्या सुमारास आलेल्या पावसाने पूर्ण नालाच पाण्याने हाऊसफूल्ल झाला. त्यामुळे पूरस्थितीसारखी परिस्थिती उदभवली होती. एका दिवसाच्या पावसाने नाल्याची ही परिस्थिती होत असेल तर पावसाळ्यात वेकोलि परिसरातील गावांचे काय होणार, हा प्रश्न उभा ठाकला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात नाला पाण्याने भरला, यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. मात्र वेकोलिने जिवंत नैसर्गिक नाल्यावरच कुरघोडी केल्याने व मातीचे ढिगारे नाल्याच्या काठावर टाकल्याने पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली. यासाठी वेकोलिचे अधिकारी जबाबदार असून वेकोलिला नैसर्गिक नाल्याच्या पात्रात माती टाकून नाला वळविण्याचा अधिकार दिला कुणी, असा प्रश्न निसर्ग प्रेमी पर्यावरण संघटनेकडून विचारला जात आहे. भविष्यात पुराचा मोठा धोका टाळण्यासाठी वेकोलिने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. नाहीतर यावर्षी गोवरी- सास्ती गावासह परिसरातील गावांना पुराचा मोठा धोका होण्याची शक्यता आहे. यासाठी वकोलिच्या जबाबदार अधिकाºयांनी याकडे जाणीवपूर्णक लक्ष देणे गरजेचे आहे.