‘श्रीं’ च्या विसर्जनासाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 10:54 PM2018-09-21T22:54:50+5:302018-09-21T22:55:48+5:30

रविवारी चंद्रपूर शहरातील श्री गणेश विसर्जन मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावरुन निघणार आहे. मिरवणूक पाहण्याकरिता शहरातील आणि आसपासच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात. या ठिकाणी गणेश भक्तांना कोणताही त्रास होऊ नये. तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून विसर्जन मिरवणूक शांततेत व भक्तीमय वातावरणात पार पाडण्याकरिता पोलीस प्रशासन अत्याधुनिक उपकरणांद्वारे निगरानी ठेवणार आहे.

The administration ready for the immersion of 'Shree' | ‘श्रीं’ च्या विसर्जनासाठी प्रशासन सज्ज

‘श्रीं’ च्या विसर्जनासाठी प्रशासन सज्ज

Next
ठळक मुद्देपोलिसांनी केली शहराची पाहणी : गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर करडी नजर

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : रविवारी चंद्रपूर शहरातील श्री गणेश विसर्जन मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावरुन निघणार आहे. मिरवणूक पाहण्याकरिता शहरातील आणि आसपासच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात. या ठिकाणी गणेश भक्तांना कोणताही त्रास होऊ नये. तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून विसर्जन मिरवणूक शांततेत व भक्तीमय वातावरणात पार पाडण्याकरिता पोलीस प्रशासन अत्याधुनिक उपकरणांद्वारे निगरानी ठेवणार आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात अत्याधुनिक उपकरणाच्या सहाय्याने बंदोबस्ताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज राजपुत यांच्या नेतृत्वात पोलिसांनी चंद्रपुरात मॉकड्रील करीत शहराची पाहणी केली. विसर्जनासाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून संपूर्ण सिस्टम अद्यावत करण्यात आली आहे. प्रत्येक चौकात आणि वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही व हॅन्डी कॅमेराद्वारे संपूर्ण मिरवणूक बंदोबस्तावर बारकाईने नजर ठेवण्यात येणार आहे. त्यासोबतच ११ हायटेक कॅमेऱ्याचे सुसज्ज असलेली लाईव्ह मोबाईल सीसीटीव्ही व्हॅनद्वारे आणि मिरवणूक मार्गावर, महत्त्वाच्या ठिकाणी ड्रोन कॅमेराद्वारे अतिसुक्ष्म निगराणी ठेवण्यात येणार आहे.
संपूर्ण बंदोबस्ताकरिता शेकडो पोलिसांचा ताफा तैनात ठेवण्यात येणार आहे. यासाठी बाहेर जिल्ह्यातून अतिरिक्त पोलीस दल मागविण्यात आल्याची माहिती आहे.
मिरवणुकीमध्ये ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याकरिता ध्वनी प्रदूषण प्रतिबंध पथके आवश्यक यंत्रणेसह नेमण्यात आलेले आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांततेत श्रीचे विसर्जन करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शहरातील वाहतुकीत तात्पुरता बदल
बंगाली कॅम्प ते सावरकर चौक, एसटी स्टँड- प्रियदर्शिनी चौक ते कस्तुरबा चौक मार्गे गांधी चौक तसेच पठाणपुरा गेट ते जटपुरा गेट मार्गे प्रियदर्शिनी चौक ते जुना वरोरा नाका हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना बंद ठेवण्यात येईल. नागपूर मार्गाने येवून बल्लारपूर किंवा मूलकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने प्रियदर्शिनी चौकाकडे जाण्यास बंदी असल्याने सर्व प्रकारची वाहने ही जुना वरोरा नाका-बेलेवाडी जुना उड्डान पुल-सावरकर चौक ते बंगाली कॅम्प, मूल किंवा बल्लारपूर जातील. मूल किंवा बल्लारपूरकडून नागपूरकडे जाणारी सर्व वाहने बंगाली कॅम्प- सावरकर चौक नवीन उड्डाणपुल मार्गे नागपूरकडे जातील. नागपूरकडून शहरामध्ये जाणारी सर्व वाहने (जड वाहने वगळून) घुटकाळा, श्री टॉकीज, पठाणपुरा परिसरात जायचे असल्यास जुना वरोरा नाका चौकातून उजवीकडे वळण घेऊन रामनगर-संत केवलराम चौक-सेंट मायकल स्कूल-सवारी बंगला चौक- नगिनाबाग ते चोर खिडकी मार्गे शहरात प्रवेश करतील. या सर्व मार्गावर पोलीस तैनात असणार असून प्रत्येक वाहनावर पोलिसांची नजर असणार आहे.
ही आहेत नो पार्किंग झोन
जटपुरा गेट ते कस्तुरबा चौकपर्यंत, जटपुरा गेट ते रामाळा तलाव पर्यंत, जटपुरा गेट ते प्रियदर्शिनी चौकपर्यंत, जटपुरा गेट ते दवा बाजार चौक पर्यंत, कस्तुरबा चौक ते गांधी चौक ते जटपुरा गेट पर्यंत, कस्तुरबा चौक ते अंचलेश्वर गेटपर्यंत, गांधी चौक ते मिलन चौक ते जोडदेऊळ पर्यंत, कस्तुरबा चौक ते जेल रोड चौक, दस्तगीर चौक ते मिलन चौक, मिलन चौक ते बजाज पॉलिटेक्निक कॉलेज, हिंदी सिटी हायस्कूल ते रघुवंशी कॉम्प्लेक्सपर्यंत, मौलाना आझाद चौक ते जयंत टाकीज, छोटा बाजार चौक ते पाताळेश्वर मंदिरपर्यत नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.
दाताळा नदीघाटाचे खोलीकरण नाही
विसर्जनादरम्यान सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन दाताळा मार्गावरील इरई नदी पात्रात व रामाळा तलावात करण्यात येते. अनेक मंडळाच्या मूर्ती दहा ते पंधरा फूट उंचीच्या राहत असल्याने पात्रात त्याचे विसर्जन होत नाही. त्यामुळे दरवर्षी महापालिका व पाटबंधारे विभागाकडून इरई नदीच्या पात्रात खोलीकरण करून रेती बाजुला काढली जाते. मात्र यावेळी तसे करण्यात आलेले नाही. याशिवाय मोठ्या मूर्तीचे विसर्जन रामाळा तलावात केल्यास तिथे शेकडो टन माती तयार होण्याचीही शक्यता आहे.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई
गणेश उत्सव अंतिम टप्प्यात आहे. गणेश विसर्जन शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागाकडून तयारी करण्यात आली आहे. अशातच काही गुंडप्रवृत्तीच्या इसमांकडून गणेश उत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही अनुचित प्रकार घडवून शांतता व सुव्यवस्था भंग होऊ नये, याकरिता जिल्ह्यातील गुंडप्रवृत्तीच्या आणि गुन्हेगारी रेकार्ड असलेल्या इसमांवर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ (२) अन्वये उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवून मनाई आदेश काढण्यात आले आहे. विसर्जन मिरवणुकीमध्ये त्यांना फिरण्यास प्रतीबंध आहे.

Web Title: The administration ready for the immersion of 'Shree'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.