जिल्ह्यातील आदिवासी सेवक पुरस्कारापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:34 AM2017-07-25T00:34:42+5:302017-07-25T00:34:42+5:30
आदिवासी समाजातील समस्यांना वाचा फोडून आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी महाराष्ट्र शासनातर्फे आदिवासी सेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
योजनेतून चंद्रपूर जिल्हा वगळला : आदिवासी विकाममंत्र्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आदिवासी समाजातील समस्यांना वाचा फोडून आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी महाराष्ट्र शासनातर्फे आदिवासी सेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. मात्र या योजनेतून चंद्रपूरला वगळण्यात आल्यामुळे जिल्हातील आदिवासी सेवक पुरस्कारापासून वंचित आहेत. त्यामुळे हा अन्याय दूर करण्यासाठी डी. के. आरीकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांना निवेदन देण्यात आले आहे.
आदिवासी समाजातील नागरिकांना प्रोत्साहन देण्याकरिता आदिवासी सेवक पुरस्कार देण्यात येतो. परंतु, २०१५-१६ व २०१६-१७ चे आदिवासी सेवक पुरस्काराचे वितरण नाशिकला मार्च महिन्यात करण्यात आले. मात्र यातून चंद्रपूर जिल्हाच वगळण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र शासनाबद्दल आदिवासी समाजात असंतोष निर्माण झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्याला आदिवासी सेवक पुरस्कारापासून वंचित ठेवणे म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील पाच लाख आदिवासी समाजाचाच नाही, तर जिल्ह्याचाही अवमान आहे. त्यामुळे हा अन्याय दूर करण्याच्या मागणीचे निवेदन चंद्रपूर येथील दलित मित्र आरीकर यांनी महाराष्ट्राचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना दिले. यावेळी ना. सावरा यांनी चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात राहत असून राज्याच्या व देशाच्या विकासात आदिवासी समाजाचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे आदिवासी समाजाच्या भावनांची कदर केली जाईल. चंद्रपूर जिल्हा आदिवासी सेवक पुरस्कारापासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन दिले.
या शिष्टमंडळात आदिवासी समाजाचे नेते दयालाल कन्नाके, वाघूजी गेडाम, डी. के. आरीकर, सरिता मालू, अग्रवाल आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील नागरिक उपस्थित होते.