Ramzan : दहशतवादाच्या मुकाबल्यासाठी रमजान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2018 07:15 AM2018-05-20T07:15:15+5:302018-05-20T07:15:15+5:30

इस्लाम हा शांततेचा संदेश देणारा धर्म. त्यातील रमजानच्या पवित्र महिन्यातील विचारांचा दहशतवादाच्या मुकाबल्यासाठी उपयोग होऊ शकतो.

Ramzan to counter terrorism | Ramzan : दहशतवादाच्या मुकाबल्यासाठी रमजान

Ramzan : दहशतवादाच्या मुकाबल्यासाठी रमजान

नौशाद उस्मान

जशी सहिष्णुता एक प्रवूत्ती आहे, तशीच दहशतवाद हीदेखील एक प्रवृत्ती आहे. असंयम, असहिष्णुता व कुणाचीही भिती मनात नसणे ही प्रवृत्ती म्हणजे दहशतवाद होय. कायदा, पोलीस व सरकारी यंत्रणा कुणाचं काहीही बरंवाइट करू शकत नाही कारण या ऐहिक संस्थांना अनेक मर्यादांनी वेढलेले आहे. अमर्याद अशा एका प्रचंड सार्वभौम शक्तीची भिती माणसावर असणे आवश्यक आहे. ती शक्ती म्हणजे ईश्वर होय. ईश्वराची प्रेमयुक्त भिती मनात जपण्यासाठी उपवास हे प्रभावी साधन आहे. सध्या उपवासांचा रमजान महिना सुरू आहे. यानिमित्त दहशतवादाच्या निर्मूलनात रमजान कसे सहकार्य करू शकतो यादृष्टीने विचार करण्याची गरज आहे.  
रमजान महिन्यात ईश्वराने त्याचा सर्वात शेवटचा ग्रंथ कुराणाचे अवतरण केले. कुराण हा रमजानचा आत्मा आहे. कुराणावर जास्तीत जास्त प्रामाणिकपणे आचरण करण्याची प्रेरणा मिळण्यासाठी उपवास ठेवले जातात. शांततेचा संदेश देणाऱ्या कुराणाला आत्मसात करण्यासाठी उपवास ठेऊन आपल्या अंतकरणात ईशपरायणतेचा प्रकाश आवश्यक आहे. कारण कुराणाची शिकवण ही मानवाच्या सर्व समस्यांचे निराकरण करू शकते. कुराणात ईश्वर सांगतो:
‘‘... खुनी अथवा जगातील दहशतवाद्यांशिवाय इतर कुणालाही ज्याने ठार केले त्याने जणू समस्त मानवांना ठार केले आणि ज्याने एखाद्याचा जीव वाचविला त्याने जणू समस्त मानवांचा जीव वाचविला.’ परंतु त्यांची (इस्रायली लोकांची) अवस्था अशी आहे कि, आमचे प्रेषित वरचेवर त्यांच्यापाशी उघड-उघड आदेश घेऊन आले तरीसुद्धा त्यांच्यात भूतलावर आंतक माजविणारे मोठ्या संख्येने अतिरेकी आहेत’’
-भावार्थ:  कुराण (५-३२)
इस्रायली लोकांना उपदेश देण्यासाठी आलेल्या प्रेषितांवर अवतरित ग्रंथांवर त्यांची श्रद्धा असल्याचे ते सोंग करत होते. परंतु त्यावर आचरण न करता भूतलावर दहशतवाद पसरविण्याचे घृणास्पद काम करत होते. कारण त्यांची ग्रंथावरची श्रद्धा प्रामाणिक नव्हती. प्रामाणिक श्रद्धेसाठी ईश्वराच्या प्रकोपाची भिती, ईशप्रेम व ईश्वराच्या कृपेची अभिलाषा या तिन्ही गोष्टी आवश्यक आहेत. यालाच तकवा म्हणजे ईशपरायणता म्हणतात. ही ईशपरायणता नसानसात भिनली पाहिजे यासाठीच रमजान महिन्यात उपवास हे कर्तव्य म्हणून निश्चित केले गेले आहे. म्हणून हे उपवास ठेवणाऱ्यांनी कुराणानुसार आचरण करायलाच हवं हे ओघानं आलंच. उपरोक्त श्लोकावरून कळते कि, जगभरातला दहशतवाद समूळ नष्ट करण्याची जबाबदारी उपवास ठेवणाऱ्यांची आहे. त्यांनी कुराणाच्या शांती संदेश जगभरातल्या समस्त मानवांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. उपवासामुळे संयम, सहिष्णूता व ईश्वराची प्रेमयुक्त भिती म्हणजेच ईशपरायणता उत्पन्न होऊ शकते. गरज आहे फक्त उपवासाची वास्तविकता समजून उपवास ठेवण्याची, कुराणावर आचरण करण्याची आणि त्याचा सर्वांना परिचय करून देण्याची! अशाप्रकारे रमजान व रोजे यांच्या संस्कारातून येणाऱ्या सहिष्णुतेचा सुगंध वर्षभर दरवळू द्या, आमीन!

(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

Web Title: Ramzan to counter terrorism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.