रमजान आणि परस्पर सुसंवादाचे महत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2018 07:15 AM2018-05-19T07:15:15+5:302018-05-19T07:15:15+5:30

रमजानाचे महत्त्व नेमके काय, ते जाणून घेतानाच अर्थपूर्ण सुसंवाद कसा अपेक्षित आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न:

Importance of Interpersonal Communication in Ramzan | रमजान आणि परस्पर सुसंवादाचे महत्व

रमजान आणि परस्पर सुसंवादाचे महत्व

नौशाद उस्मान

माणूस हा समाजशील, दुसऱ्या शब्दात, कळपात राहणारा प्राणी आहे. संवाद हा समाजाचा आत्मा असतो. पण आज सोशल मीडियाच्या युगात संवादच हरवलाय. आज लाखो कोस दूरवरच्या माणसाशी चॅट करायला वेळ आहे पण आपल्याजवळ शेजाऱ्यांसाठी दोन मिनिटे नाहीत. अशावेळी गेट टू गेदर, स्नेह संमेलनं फायदेशीर ठरतात. अशाचप्रकारे रमजान व ईदनिमित्तदेखील परस्पर सुसंवादाच्या माध्यामातूनही जातीय सलोखा कायम राहू शकतो. इफ्तारच्या फराळाचा आस्वाद घेतांना शिरकुर्म्याच्या दुधात साखर व कुर्मा (खारिक/खजूर) मिसळावी त्याप्रमाणे ईदच्या दिवशी माणसांची मनं एकमेकांत मिसळतात. धन्य-धन्य तो अल्लाह! ज्याने आम्हाला विविधतेने नटलेल्या या देशात जन्मास घातले! गरमागरम सुगंधीत शिरकुर्मा रिचवताना गप्पा रंगतात. ‘काय खबरबात, खुशाल? वावरात काय पेरलं आणि पोरगी कुठे दिली? यासारख्या विषयांवर गप्पा मारल्या जातात. तर तरूण घोळक्यात ‘ग्रॅज्युएशननंतर काय करणार? किंवा ईदनिमित्त कोणत्या टॉकीजवर कोणता नवीन पिक्चर लागला’ वगैरे.
 पण इतर खाजगी गोष्टींसह ज्या मुख्य मुद्यावर चर्चा होणे अपेक्षित असते, त्यावर सहसा कुणी बोलत नाही, तो म्हणजे या ईदचा, रमजानचा मूळ उद्देश! कोणतीही गोष्ट आपण का करतो हे जर ती गोष्ट करणाऱ्याला माहीत असणे अभिप्रेत असते. त्यामुळे कोणताही धार्मिक उत्सव किंवा विधी आपण का पार पाडत आहे हेही प्रत्येकाला माहीत असणे आवश्यक आहे. त्याविषयी आपण एकमेकांना विचारायला हवे. ‘कपडे कितीला घेतले' किंवा ‘शिरकुर्म्याचं दूध काय भाव घेतलं’ अशा शुल्लक गोष्टींऐवजी ‘‘ईदच्या दिवशी जिथे नमाज पढली जाते, त्या ईदगाहच्या मैदानावर मूर्ती किंवा काहीही अधिष्ठान मांडलेले नसते. मग तिथं उपासना होते तरी कशाची?" "तुझा देव कोणता?" "तुझे देव किती ?", "तुझा ग्रंथ कोणता?"" तो कुणी लिहिला अन् कुणी सांगितला?" या सर्व प्रश्नांवर बिनधोक मुद्देसुद चर्चा व्हायला हवी. "नाही बा! धर्माबिर्माचं काही विचारायचं नाही. उगीच त्याला राग आला तर?" ही भीती नको. एकमेकांच्या श्रद्धा, धर्मभावना समजून घ्यायला हव्या. मनात साचलेल्या गढूळ डोहाला रमजाननिमित्त मोकळी वाट करून द्यायला हवी. आपण सर्व एकच वडिल आदम व एकच आई हव्वाची संतती असून परस्परांचे बांधव आहोत, एकाच ईश्वराचे भक्त आहोत, असा संदेश देणारे कुरआन रमजानमध्ये अवतरीत झाल्याची आणि त्यामुळेच रमजान साजरा केला जात असल्याची माहिती सर्वांना करून देण्याची गरज आहे. त्यासाठी संवादाची गरज आहे, सोशल मीडियावर "तू तू - मै मै" ची नव्हे! या रमजानच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा सामाजिक संवादाला नवी झळाळी देऊ या इन्शा अल्लाह!

(लेखक नौशाद उस्मान इस्लामचे अभ्यासक आहेत)

Web Title: Importance of Interpersonal Communication in Ramzan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.