गोसे प्रकल्पाच्या वितरिकेची कामे थंडबस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 09:51 PM2019-05-08T21:51:00+5:302019-05-08T21:51:34+5:30
गोसे प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे वितरिकेचे काम गत काही वर्षांपासून थंडबस्त्यात पडले आहे. त्यामुळे पवनी व लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणीच मिळत नाही. परिणामी सिंचनाचे स्वप्न अपुर्ण राहिले आहे. अथांग पाणी प्रकल्पात असताना शेती मात्र तहानलेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आसगाव (चौरास) : गोसे प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे वितरिकेचे काम गत काही वर्षांपासून थंडबस्त्यात पडले आहे. त्यामुळे पवनी व लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणीच मिळत नाही. परिणामी सिंचनाचे स्वप्न अपुर्ण राहिले आहे. अथांग पाणी प्रकल्पात असताना शेती मात्र तहानलेली आहे.
गोसे प्रकल्पाच्या निर्मितीपासून डाव्या कालव्याच्या कामाला सुरुवात झाली. या कालव्याची लांबी २२ किमी आहे. पवनी आणि लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. परंतु अनेक कामे आजही अर्धवट आहेत. गोसेपासून लाखांदूर पर्यंत वितरिकेची कामे सुरु आहेत. कुठे रस्त्यावरील पुलाचे काम अपुरे आहे तर कुठे शेतात पाणी वाहणाऱ्या वितरिकेला गेट लावले नाही. काम सर्वत्र सुरु असल्याचा भास होत असला तरी एकही काम अद्याप पूर्ण झाले नाही. शेतातील धरणाच्या बाजूला रस्त्यासाठी मुरुमही अर्धवट टाकला जात आहे. शेंद्री शिवारात भावड, रनाळा, खैरी, ब्रम्ही, निघवी या भागात पाणी पुरवठा करण्यासाठी वितरीकेचे काम सुरुआहे. डाव्या कालव्यावर गेटसाठी कालवा फोडण्यात आला. मात्र गेटचे काम प्रगतीपथावर दिसत नाही. लवकरच पावसाळ्याला सुरुवात होईल त्यानंतर काम करणे अशक्य होणार आहे. याचा फटका शेतकºयांना बसेल.