जिल्ह्यातील २७ प्रकल्पांत ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:44 PM2019-05-21T23:44:28+5:302019-05-21T23:44:42+5:30

प्रचंड तापमानामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांचे पाणी तळाला जात असून २७ प्रकल्पांत तर पाण्याचा ठणठणाट आहे. दोन मध्यम, आठ लघु आणि १७ मामा तलाव कोरडे पडले आहेत. जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांमध्ये केवळ ११ टक्के जीवंत पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा लांबल्यास जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

Threatening in 27 projects in the district | जिल्ह्यातील २७ प्रकल्पांत ठणठणाट

जिल्ह्यातील २७ प्रकल्पांत ठणठणाट

Next
ठळक मुद्दे११ टक्के जलसाठा : दोन मध्यम, आठ लघु आणि १७ मामा तलाव कोरडे

देवानंद नंदेश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्रचंड तापमानामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांचे पाणी तळाला जात असून २७ प्रकल्पांत तर पाण्याचा ठणठणाट आहे. दोन मध्यम, आठ लघु आणि १७ मामा तलाव कोरडे पडले आहेत. जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांमध्ये केवळ ११ टक्के जीवंत पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा लांबल्यास जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची क्षमता ४२.८१५ दलघमी आहे. सध्या या प्रकल्पांमध्ये ६.१६४ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. या प्रकल्पात सध्या १४.३९ टक्के जलसाठा आहे. मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरणा प्रकल्प कोरडे पडले आहेत. तर तुमसर तालुक्यातील प्रकल्पात १९.८७ टक्के आणि बघेडा प्रकल्पात ९.३७ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प असून त्यापैकी आठ प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यात तुमसर तालुक्यातील पवनारखारी, डोंगरला, मोहाडी तालुक्यातील हिवरा, आमगाव, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी आणि लाखनी तालुक्यातील मुरमाडी (हमेशा) या प्रकल्पांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पात केवळ ९.३७ टक्के जलसाठा आहे.
जिल्ह्यात २८ माजी मालगुजारी अर्थात मामा तलाव आहेत. या प्रकल्पात सध्या ८.७५ टक्के जलसाठा असून त्यापैकी साकोली तालुक्यातील एकोडी, चांदोरी, आमगाव, वलमाझरी, पिंडकेपार, परसोडी, लवारी, उमरी, सानगडी, केसलवाडा, रेंगेपार कोहळी, लाखनी तालुक्यातील कन्हेरी, चान्ना, मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव, एकलारी आणि जांभोरा तसेच लाखांदूर तालुक्यातील दहेगाव मामा तलावांचा समावेश आहे. वाढत्या तापमानाने पाण्याचे बाष्पीभवन होत असून प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने खाली होत आहे. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे.
पावसाळा लांबल्यास स्थिती गंभीर
गत काही वर्षांचा आढावा घेतल्यास भंडारा जिल्ह्यातील प्रकल्पाचे पाणी उन्हाळ्यात दहा ते ११ टक्केच राहते. यावर्षीही अशी स्थिती निर्माण झाली आहे. पावसाळा लांबल्यास पाणी टंचाईची स्थिती गंभीर होऊ शकते. भंडारा हा जिल्हा टँकरमुक्त असल्याने कुठेही टँकर लावण्यात आला नाही. मात्र काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते. प्रशासन पाणी टंचाईच्या उपाययोजनांवर गांभीर्याने विचार करीत असला तरी अधिनस्त यंत्रणा मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.

Web Title: Threatening in 27 projects in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.