सकारात्मक विचार करा, आयुष्यात यशस्वी व्हा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 09:34 PM2019-01-15T21:34:29+5:302019-01-15T21:34:44+5:30
मकर संक्रांत आली की, प्रत्येक जण तीळगूळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणतात. मात्र लवकरच ते विसरूनही जातात. किरकोळ कारणावरून वाद निर्माण होतात. प्रत्येकाने आपला दृष्टिकोण सकारात्मक ठेवला तर मनुष्य आयुष्यात निश्चितच यशस्वी होतो, असा मंत्र भंडाराचे निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी दिला.
भंडारा : मकर संक्रांत आली की, प्रत्येक जण तीळगूळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणतात. मात्र लवकरच ते विसरूनही जातात. किरकोळ कारणावरून वाद निर्माण होतात. प्रत्येकाने आपला दृष्टिकोण सकारात्मक ठेवला तर मनुष्य आयुष्यात निश्चितच यशस्वी होतो, असा मंत्र भंडाराचे निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी दिला.
मकरसंक्रांतीच्या पर्वावर ‘लोकमत’तर्फे ‘गुड’ बोला, गोड बोला अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत बोलताना विजय भाकरे म्हणाले, देश जोडण्यासाठी देशातील माणसाची मने आपआपसात जुळणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकांच्या मनातील कटुता, विद्वेश, सुडाची भावना समुळ नष्ट करणे आवश्यक झाले आहे. बंधूभाव व प्रेमपूर्वक वर्तन हे चांगल्या विचारातून निर्माण होते. मकरसंक्रांत हा केवळ गोड बोला अशा शुभेच्छा देण्याचा नाही तर हा विचार मनात रुजविण्यासाठी अत्यंत पोषक आहे. आपल्या देशात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे म्हटले जाते. हा प्रेमाचा संदेश कायमस्वरुपी रूजवायचा असेल तर प्रत्येकाने सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याची गरज आहे. व्यक्ती सुखी, समाधानी, बंधूभाव व प्रेमाने ओतप्रेत असेल तर संपूर्ण समाज आणि देश बलशाली होण्यास विलंब लागणार नाही. त्यासाठी आपल्या देशातील सण उत्सव महत्वपूर्ण ठरतात. अशा सण उत्सवाच्या माध्यमातून समाजात एकात्मता निर्माण करणे पोषक ठरते, असे आरडीसी विजय भाकरे यांनी सांगितले.
मकरसंक्रांतीचा सण हा परिवर्तनाची नांदी ठरणारा आहे. तीळगूळ घ्या गोड गोड बोला असू म्हणून बंधूभाव व प्रेमाचे प्रतिक तीळगूळ वाटून समोरच्या व्यक्तीकडूनही तशाच वर्तनाची अपेक्षा आणि विनंती करणे ही या सणाची महती असल्याचे भाकरे म्हणाले.