वृक्ष लागवडीचे फक्त शिल्लक राहिले खड्डेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:47 PM2019-03-18T22:47:40+5:302019-03-18T22:48:04+5:30
वनविभागाच्या वतीन मोठा गाजावाजा करीत प्रचंड खर्च करून जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. परंतु लागवडीनंतर झाडांची निगा न घेतल्यामुळे सर्व रोपे करपून गेली असून केवळ खड्डेच शिल्लक राहिली आहेत. परिणामी शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचे चित्र दिसून येत आहे..
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वनविभागाच्या वतीन मोठा गाजावाजा करीत प्रचंड खर्च करून जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. परंतु लागवडीनंतर झाडांची निगा न घेतल्यामुळे सर्व रोपे करपून गेली असून केवळ खड्डेच शिल्लक राहिली आहेत. परिणामी शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचे चित्र दिसून येत आहे..
वनविभागामार्फत जिल्हाभरात जुलै २०१८ मध्ये शासनाने मोठा गाजावाजा करून राज्यातील प्रत्येक तालुक्यात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवून दिले व त्यानुसार तालुक्यातील प्रत्येक गावात वृक्षारोपण करण्यात आले. मात्र, ही वृक्ष लागवड केवळ फोटोसेशन पुरती मर्यादित राहिल्याने तालुक्यात शतकोटी वृक्ष लागवड योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. पाण्याअभावी बहुतांश झाडे सुकली असून वृक्ष लागवड योजना फसल्याचे दिसून येत आहे. प्रशासकीय पातळीवर वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्ह्यातील बहुतांश गावांत राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी सुद्धा वृक्ष लागवड केली. परंतु वृक्षारोपणानंतर या झाडांच्या संगोपनाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्यामुळे वृक्ष लागवड योजनेतील मोजकेच झाड जिवंत नसल्याचे दिसून येत आहे. वृक्ष लागवड योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने मोठा आटापिटा केला. परंतु प्रशासकीय पातळीवर योजनेला ठेंगा दाखविला जात असल्याने शासनाच्या आदेशाला प्रशासन कसा हरताळ फासत आहे, ही बाब यावरून निदर्शनास येते. पर्यावरणाशी संबंधित संभाव्य धोका टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या वृक्षलागवड योजनेतच जर प्रशासन हलगर्जीपणा करीत असेल तर योजनेचा उद्देश कसा सफल होणार, हा प्रश्नच आहे. शासनाने याकडे गांभीयार्ने लक्ष देणे गरजेचे आहे.