‘लोकमत सरपंच अवॉर्डस’चे भंडाऱ्यात शानदार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 10:02 PM2018-02-15T22:02:30+5:302018-02-15T22:03:12+5:30

हा सत्कार सरपंचांचा एकट्याचा नसून संपूर्ण गावाचा सत्कार आहे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री तथा भंडाऱ्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ सोहळ्यात ते बोलत होते.

Great distribution of 'Lokmat Sarpanch Award' in Bhandara | ‘लोकमत सरपंच अवॉर्डस’चे भंडाऱ्यात शानदार वितरण

‘लोकमत सरपंच अवॉर्डस’चे भंडाऱ्यात शानदार वितरण

googlenewsNext
ठळक मुद्देसरपंचांचा सत्कार हा गावाचा सत्कार; चंद्रशेखर बावनकुळे :

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या सरपंचांनी गाव विकासासह गावाचा लोकसहभागातून कायापालट करावा, अशा कर्तबगार सरपंचाचा ‘लोकमत’ने केलेला हा सहृदयी सत्कार अविस्मरणीय आहे. हा सत्कार सरपंचांचा एकट्याचा नसून संपूर्ण गावाचा सत्कार आहे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री तथा भंडाऱ्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ‘लोकमत’ समुहाच्या वतीने गुरूवारला साखरकर सभागृहात आयोजित ‘सरपंच अवॉर्ड’ सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे, आमदार डॉ.परिणय फुके, आमदार चरण वाघमारे, आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहु, मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, बीकेटी ग्रुपचे एरीया मॅनेजर (महाराष्ट्र) झुबेर शेख, बीकेटीचे आॅथोराईजड डिस्ट्रीब्युटर दीपक बानकोटी, महिंद्रा ग्रुपचे डीजीएम भालचंद्र माने, महिंद्रा ग्रुपचे ट्रेड मॅनेजर ब्रीज श्रीवास्तव, लोकमतचे संपादक दिलीप तिखिले मंचावर उपस्थित होते.
यावेळी ना.बावनकुळे म्हणाले, गावाच्या विकासासाठी आता राज्य शासनाच्यावतीने जिल्हा नियोजन समितीमध्ये मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. या योजनेतून सर्व सरपंचांनी गावाचा कायापालट करावा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छग्राम योजनेतून गावाचा विकास साधण्याचे ध्येय सर्वांसमोर ठेवले आहे. यातून गाव ‘स्वच्छ व सुंदर’ करून आदर्श निर्माण करावा. पालकमंत्री पांदन योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. याकरिता सर्वांनी लोकसहभागातून गावविकास साधावा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांचे कार्य पे्ररणादायी असून त्यांचा वारसा सरपंचानी घेऊन गावाला प्लॉस्टिकमुक्त व हागणदारीमुक्त करण्याकरिता पुढाकार घ्यावा. ‘लोकमत’ने पुरस्कृत केलेल्या सरपंचांची जबाबदारी आता वाढली असून जे यावर्षी विजेते ठरू शकले नाही, त्यांनी गावाचा विकास साधून पुढल्यावर्षी पुरस्कार विजेता ठरण्याच्या दृष्टीने काम करावे, असे आवाहनही ना.बावनकुळे यांनी यावेळी केले.
यावेळी आमदार चरण वाघमारे म्हणाले, ग्रामपंचायतस्तरावर सरपंच विकासाचा केंद्रबिंदू आहे. गावाचा विकास लोकसहभागातून शक्य आहे. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा गावविकासाचा वसा पुढे न्या. विकासातून नियोजन करून सरपंचांनी गावचा अभ्यास करावा, शासनाचे नियमांची माहिती जाणून घेण्याची गरज आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती अंतर्गत केंद्र व राज्य शासन अनेक जीआर काढतात, त्या जीआरचा अभ्यास करण्याची गरज आहे. केंद्राच्या ९८ तर राज्य शासनाच्या ४८ आॅनलाईन योजना आहेत. त्यात लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी इच्छाशक्तीची गरज असून गाव विकासाचा ध्यास घेण्याचे आवाहन आ.वाघमारे यांनी केले.
बीकेटी टायर्स हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक, ‘पतंजली आयुर्वेद’ हे प्रायोजक तर ‘महिंद्रा ट्रॅक्टर्स’ हे सहप्रायोजक आहेत.
प्रास्ताविक लोकमतचे प्रादेशिक विभागप्रमुख गजानन चोपडे यांनी केले. संचालन विक्रम फडके आणि सखी मंचच्या जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार यांनी तर आभारप्रदर्शन लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी नंदकिशोर परसावार यांनी केले.

‘सरपंच आॅफ द ईयर’ ठरल्या शिवणीच्या सरपंच माया कुथे
लाखनी तालुक्यातील शिवनीच्या सरपंच माया कुथे यांना ‘लोकमत’ने ‘सरपंच आॅफ द ईयर’ पुरस्काराने गौरविले. ही ग्रामपंचायत आयएसओ मानांकित असून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, राज्यस्तरावर यशवंत पंचायतराज पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर दलित वस्ती सुधारणा स्पर्धा, राष्ट्रीय स्तरावर राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण पुरस्कार तसेच राज्यस्तरावर पर्यावरण विकास रत्न पुरस्कार या ग्रामपंचायतने पटकाविले आहे. ग्रामपंचायतच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार मिळालेला आहे.

सरपंच हा शासन-प्रशासनाचा महत्त्वाचा दुवा
शासन व प्रशासनाचा दुवा म्हणून गावातील सरपंचांची ओळख आहे. सरपंच हे शासन आपल्या दारी नेण्याचा महत्त्वपूर्ण दुवा आहे. शासनानेही सरपंचाच्या कामाची दखल घेणे सुरू केले आहे. हा सरपंचाचा गौरव आहे, असा संदेश  जिल्ह्यातील सरपंचाना दिला. सरपंच हा गावाचा कारभारी असून मुख्य कणा आहे. केंद्र व राज्य शासनाने सरपंचाच्या कामांची दखल घेतली आहे. त्यांच्या कामांची पावती देण्याकरिता ‘लोकमत’ने सरपंच अवॉर्ड कार्यक्रम घेतला आहे. या अवॉर्डची दखल राज्य शासन घेणार आहे. ‘गाव करी ते राव न करी’ या सुभाषितानुसार सरपंच गावाचा चेहरामोहरा नक्कीच बदलू शकतो. केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीची गरज आहे, असेही मत उपस्थितांनी व्यक्त केले.

३७२ ग्रामपंचायतींनी नोंदविला सहभाग
मागील काही दिवसांपासून या सरपंच अवॉर्डस सोहळ्याची भंडारा जिल्ह्यातील सरपंचांना उत्सुकता होती. जिल्ह्यातील ५४२ ग्रामपंचायतींपैकी ३७२ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता. सरपंचांनी गावातील जल व्यवस्थापन, वीज व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण, प्रशासन-लोकसहभाग, रोजगार, कृषी या ११ कॅटेगरीत केलेल्या कामांची पाहणी करून या प्रत्येक क्षेत्रासाठी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

Web Title: Great distribution of 'Lokmat Sarpanch Award' in Bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.