दुष्काळामुळे यंदा वेरूळ-अजिंठा महोत्सवाला शहरवासीय मुकणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 06:29 PM2018-11-19T18:29:26+5:302018-11-19T18:31:26+5:30

जिल्ह्यातील दुष्काळाची भीषणता पाहता यंदा अजिंठा-वेरूळ महोत्सव होणार नाही, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.

This year, due to drought, will the Ellora-Ajantha Mahotsav be defeated? | दुष्काळामुळे यंदा वेरूळ-अजिंठा महोत्सवाला शहरवासीय मुकणार?

दुष्काळामुळे यंदा वेरूळ-अजिंठा महोत्सवाला शहरवासीय मुकणार?

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यातील दुष्काळाची भीषणता पाहता यंदा अजिंठा-वेरूळ महोत्सव होणार नाही, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. दुष्काळाचे सावट मोठ्या प्रमाणावर आहे. संपूर्ण जिल्ह्यातील परिस्थिती भयावह आहे. त्यामुळे महोत्सव घेण्याबाबत प्रशासकीय पातळीवरील हालचाली मंदावल्या आहेत. २०१४ ते २०१८ या काळात एक वर्ष हा महोत्सव झाला. गेल्या वर्षीचा महोत्सव ऐनवेळी रद्द करण्यात आला होता. नोव्हेंबरमध्ये महोत्सव घेण्याबाबत विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी मध्यंतरी संकेत दिले होते; परंतु औरंगाबादसह मराठवाडा दुष्काळाच्या रेट्याखाली आहे. त्यामुळे सांस्कृतिक मेजवानीचे कार्यक्रम आयोजित करावे की नाही, यावरून प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक महोत्सव आयोजित करूच नये, असे मत काही अधिका-यांनी विभागीय आयुक्तांकडे व्यक्त केले आहे. 

वेरूळ-अजिंठा हा सांस्कृतिक महोत्सव १५ जानेवारी २०१८ च्या आसपास होण्याची शक्यता विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी गेल्या वर्षी वर्तविली होती. सीताफळ, रेशीम महोत्सवानंतर त्याबाबत नियोजनाचा त्यांनी प्रयत्न केला. खाजगी संस्थेऐवजी तो महोत्सव एमटीडीसी व विभागीय प्रशासनाच्या अधिपत्याखाली घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते; परंतु नियोजनासाठी वेळ न मिळाल्यामुळे जानेवारी २०१८ मध्ये महोत्सवाचे आयोजन करता आले नाही. दिवाळीनंतर महोत्सव घेण्याबाबत त्यांनी स्पष्ट केले होते; परंतु दुष्काळामुळे महोत्सव होण्याची शक्यता सध्या तरी नाही.

यापूर्वी आठ वेळा झाला नाही महोत्सव
२००१ पासून वेरूळ लेण्यांच्या पायथ्याशी होणारा हा महोत्सव विद्यापीठ परिसरातील सोनेरी महाल परिसरात आयोजित करण्यात येऊ लागला. २००७ पर्यंत हा महोत्सव नियमित होत गेला. त्यानंतर कोणत्या न कोणत्या कारणामुळे हा महोत्सव आयोजित होऊ शकला नाही. २०११ आणि २०१६ हे दोन वर्ष वगळले तर दहा वर्षांत आठ वेळा सदरील महोत्सव रद्दच करावा लागला. दरम्यान महसूल उपायुक्त शिवानंद टाकसाळे म्हणाले, प्रशासकीय पातळीवर महोत्सवाबाबत काहीही हालचाली नाहीत. 

या कारणांनी महोत्सव रद्द झाला 
- २००८- मुंबई दहशतवादी हल्ल्यामुळे रद्द 
- २००९- स्वाईन फ्लूची साथ आल्याने रद्द 
- २०१०- शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमुळे रद्द 
- २०१३- दुष्काळामुळे महोत्सव रद्द
- २०१४- दुष्काळामुळे रद्द
- २०१५- दुष्काळी स्थितीमुळे रद्द
- २०१७- नियोजन होऊ शकले नाही
- २०१८- दुष्काळाच्या सावटामुळे रद्द होण्याची शक्यता

Web Title: This year, due to drought, will the Ellora-Ajantha Mahotsav be defeated?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.