जिल्ह्याची पाणीपातळी पाऊण मीटरने घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:47 PM2017-11-18T23:47:40+5:302017-11-18T23:47:45+5:30
जिल्ह्यातील ५० गावांतील विहिरींची भूजल सर्वेक्षण विभागाकडून आॅक्टोबर महिन्यात पाण्याची पातळी मोजण्यात आली. सर्वेक्षणादरम्यान मागील पाच वर्षांच्या कालावधीतील सरासरीपेक्षा ०.७५ मीटरने भूजल पातळी खालावली असल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील ५० गावांतील विहिरींची भूजल सर्वेक्षण विभागाकडून आॅक्टोबर महिन्यात पाण्याची पातळी मोजण्यात आली. सर्वेक्षणादरम्यान मागील पाच वर्षांच्या कालावधीतील सरासरीपेक्षा ०.७५ मीटरने भूजल पातळी खालावली असल्याचे दिसून आले.
यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. परतीचा पाऊस जरी चांगला झाला तरी, अनेक ठिकाणचे तलाव नदी, नाले कोरडेच पूर्णत: भरले गेलेच नाहीत. जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव आणि सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर भूजल पातळी अवलंबून असते. परंतु यावर्षी झालेल्या अल्पपावसामुळे जिल्ह्यातील लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये आजघडीला मोजकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. तर विहिरींची पातळीही घटत आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे ग्रामीण भागातील पाणी पुरवठा तसेच स्वच्छता व गावनिहाय सखोल भूजल सर्वेक्षण करण्यात आले.
या विभागाद्वारे पिण्याचे पाणी, शेती व औद्योगिक गरजा यासाठी भूजल सर्वेक्षण, संशोधन, भूजल मूल्यांकन, विकास, सनियंत्रण, व्यवस्थापन आदी कामे केली जातात. आॅक्टोबर महिन्यांत सर्वेक्षण करण्यात आले असून याबाबत पुढील नियोजन केले जाणार असल्याची माहिती भूजल सर्वेक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.