औरंगाबादेत संमेलनाच्या दुस-या दिवशी वेदपठण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:06 AM2018-01-21T00:06:15+5:302018-01-21T00:06:21+5:30
अखिल भारतीय वैदिक संमेलनात दुस-या दिवशी शनिवारी घनपाठींनी चार वेदांचे पठण केले. यामुळे अग्रसेन भवन परिसरातील वातावरण मंगलमय झाले होते. मौखिक वेदपठणातून वैदिकांची उच्च स्मरणशक्ती, गाढा अभ्यास व वैदिक संस्कृती जपण्यासाठीच्या त्यागाची चुणूक या संमेलनात पाहण्यास मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अखिल भारतीय वैदिक संमेलनात दुस-या दिवशी शनिवारी घनपाठींनी चार वेदांचे पठण केले. यामुळे अग्रसेन भवन परिसरातील वातावरण मंगलमय झाले होते. मौखिक वेदपठणातून वैदिकांची उच्च स्मरणशक्ती, गाढा अभ्यास व वैदिक संस्कृती जपण्यासाठीच्या त्यागाची चुणूक या संमेलनात पाहण्यास मिळत आहे.
राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान, उज्जैन व संत ज्ञानेश्वर वेद विद्या प्रतिष्ठानतर्फे आयोजित अखिल भारतीय वैदिक संमेलनासाठी खास धर्मपीठ सजविण्यात आले होते. पर्वतरांगांच्या पार्श्वभूमीवर महर्षी यज्ञवल्यक ऋषी, संत ज्ञानेश्वर आणि गुरू-शिष्य परंपराची महती सांगणारे कटआऊट सभागृहाची शोभा वाढवीत होते. त्यातून वैदिक परंपरेचा वारसा प्रतिबिंबित केला जात होता.
या धर्मपीठावर विविध राज्यांतून आलेल्या घनपाठींनी ऋग्वेद, युजर्वेद, सामवेद, अथर्ववेदाचे पठण करून सकाळी वातावरण मंगलमय केले होते. धर्मपीठावर घनपाठीवेद पठण करीत असताना समोर बसलेले घनपाठी त्यांच्यासोबत वेद पठण करीत होते. गुरू-शिष्यांच्या महान परंपरेची अनुभूती येथे बघण्यास मिळाली. वेदातील मंत्रोच्चार, स्वर, लय ऐकून सर्वजण मंत्रमुग्ध झाले होते. यानंतर वैदिक परंपरेत महिलांचे स्थान या विषयावर चर्चासत्र रंगले. यात सविता जोशी, क्रांती व्यवहारे, डॉ. मंजूषा कुलकर्णी, हभप मुकुंदकाका जाटदेवळेकर सहभागी झाले होते. दुसºया सत्रात ‘धर्माचे मूळ वेद आहे’ या विषयावरील चर्चासत्रात ज्येष्ठ वेदाभ्यासक डॉ. प्रा. ग. उ. थिटे, पं. गुलाम दस्तगीर बिराजदार, वेदमूर्ती नरेंद्र कापरे व पं. बाळकृष्ण जोशी यांनी आपले विचार मांडले.
यानंतर पंडितप्रवर गणेशश्वर शास्त्री द्रविड यांच्या अध्यक्षतेखाली ‘शास्त्र सर्व कर्माचे मूळ प्रमाण आहे’ या विषयावरील चर्चासत्र गाजले. चार वेदांचे गाढे अभ्यासक, वेदमूर्ती, पुरोहित यांचा यावेळी स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. ‘वेद आणि विज्ञान’ या विषयावरील चर्चासत्रालाही नागरिकांनी गर्दी केली होती.
संमेलनासाठी समितीचे अध्यक्ष अनिल भालेराव, संजय जोशी, पं. दुर्गादास मुळे, अनंत पांडव गुरुजी आदी परिश्रम घेत आहेत.
वैदिक संमेलनाची रविवारी सांगता
रविवारी अग्रसेन भवनात सकाळी ८ वा. वेद मंत्र पठण. ९ वा. राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी यांचे कीर्तन व त्यानंतर १० ते दुपारी १२ वाजेदरम्यान वैदिक संमेलनाचा समारोप होणार आहे. या सोहळ्यास भाजपचे राज्य अध्यक्ष रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.