विद्यापीठाने महापालिकेला धरले जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 11:06 PM2019-05-06T23:06:57+5:302019-05-06T23:07:35+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात दूषित पाणीपुरवठ्यामुळे १६६ विद्यार्थिनींना उलट्या, मळमळ, जुलाबचा त्रास झाला होता. या प्रकरणात विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी महापालिकेकडून मिळालेले पाणी पिण्याच्या टाक्यात टाकले होते, असे म्हणत मनपाला जबाबदार धरले आहे. तसेच यातील दोषी व्यक्तींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न विद्यापीठ प्रशासनाकडून सुरू असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात दूषित पाणीपुरवठ्यामुळे १६६ विद्यार्थिनींना उलट्या, मळमळ, जुलाबचा त्रास झाला होता. या प्रकरणात विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी महापालिकेकडून मिळालेले पाणी पिण्याच्या टाक्यात टाकले होते, असे म्हणत मनपाला जबाबदार धरले आहे. तसेच यातील दोषी व्यक्तींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न विद्यापीठ प्रशासनाकडून सुरू असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.
विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहात मागील आठवड्यात पिण्याच्या पाण्यात दूषित पाणी मिसळल्यामुळे विद्यार्थिनींना ऐन परीक्षेच्या काळात दवाखान्यात दाखल व्हावे लागले. या प्रकाराकडे सुरुवातीला दुर्लक्ष करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाला आजारी विद्यार्थिनींची संख्या वाढत गेल्याने लक्ष द्यावे लागले. मागील आठवड्यात सोमवारी (दि.२९ एप्रिल) कुलसचिवांनी एक दिवसाच्या आत पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी देण्यात येतील. घडलेल्या गंभीर प्रकाराची चौकशी तात्काळ केली जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेश करपे, किशोर शितोळे, अधिसभा सदस्य डॉ. राम चव्हाण, डॉ. स्मिता अवचार, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. योगिता होके-पाटील यांनी वसतिगृहातील विद्यार्थिनींची भेट घेतल्यानंतर प्रशासनाला धारेवर धरले. विद्यार्थी संघटनांनी मोठ्या प्रमाणात आंदोलने केली. यानंतर वसतिगृहातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. यात दोषींवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली. तेव्हा प्रकरण दाबण्यासाठी काही विद्यार्थी संघटना, प्रशासनातील अधिकारी आणि व्यवस्थापन परिषद सदस्याने पडद्याआड प्रयत्न सुरू केले. त्यात त्यांना यश आल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. दौºयावरून परतलेले कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची भेट घेतली असता, त्यांनी या प्रकरणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई करता येईल, असे उत्तर दिले. यावेळी उपस्थित प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी विद्यार्थिनी वसतिगृहात महापालिकेकडून मिळणारे पाणीच टाकले. त्याशिवाय इतर कोणत्याही ठिकाणचे पाणी टाकले नसल्याचे स्पष्ट करून महापालिकेकडे बोट दाखविले आहे.
कुलसचिवांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न
विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहात घडलेल्या प्रकारानंतर हे प्रकरण योग्यपणे हाताळण्यात आले नाही. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्यार्थी संघटनांनी प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. याविषयीचे निवेदनही कुलगुरूंना देण्यात आले. मात्र डॉ. पांडे यांना पाठीशी घालण्यासाठी एक व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्यापीठातील अधिकारी आणि एका गटातील काही पदाधिकारी यांनी मोहीम राबविली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा प्रकरणात कोणावरीही कारवाई होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
विद्यापीठाचे प्रकुलगुरू, कुलसचिव, मालमत्ता विभागाचे अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांची सोमवारी बैठक घेतली. या बैठकीत पाणीपुरवठ्यासह इतर सर्व बाबींचा आढावा घेतला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, ९० हजार लिटर पाण्याचा साठा तयार ठेवला आहे. पाणीपुरवठा सुरळीत होईल, याची दक्षता घेतली जात आहे. तसेच आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांचा रुग्णालयात झालेला खर्चही देण्यात येईल.
- डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू
------------