सर्जा-राजा मला माफ कर, पोळ्याच्या आधी बैलजोडी विकण्याची नामुश्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 06:53 PM2017-08-20T18:53:49+5:302017-08-20T18:56:27+5:30
डोक्यावर दुष्काळाचे सावट व भविष्यातील गरजा भागविण्यासाठी शेतक-यांच्या सर्वात प्रिय पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर बैल जोड़ी विकण्याची नामुश्की काही शेतकऱ्यांवर येवून ठेपली आहे.
ऑनलाईन लोकमत / श्यामकुमार पूरे
सिल्लोड ( जि. औरंगाबाद ), दि. २० : सिल्लोड तालुक्यात काही भाग वगळता दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. खरिपाचे पीक वाया गेल्याने हातचा पैसा निघुन गेला आहे. डोक्यावर दुष्काळाचे सावट व भविष्यातील गरजा भागविण्यासाठी शेतक-यांच्या सर्वात प्रिय पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर बैल जोड़ी विकण्याची नामुश्की काही शेतकऱ्यांवर येवून ठेपली आहे. भराडी येथे शनिवारी भरलेल्या बाजारात सर्जा- राजा मला माफ कर, असे म्हणून कवडिमोल भावात काही शेतक-यांनी जनावरे विकली.निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी हतबल झाला असल्याचे चित्र सिल्लोड तालुक्यात दिसत आहे.
तालुक्यातील भराड़ी येथे शनिवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारात लहान मोठी जनावरे मिळून जवळपास 140 जनावरे विक्री साठी आली होती. 50 ते 60 हजारात विक्री होणारी मोठी बैल जोड़ी केवळ 30 ते 35 हजारात तर 30 ते 35 हजारात विकली जाणारी लहान जोड़ी केवळ 15 ते 20 हजारात विक्री झाली. बाजारात ही जनावराना योग्य किंमत मिळाली नाही. यामुळे शेतकरी हताश झाले.
सिल्लोड तालुक्यात गेल्या 4-5 वर्षापासून सतत दुष्काळ सदृश्य स्थिती कायम आहे. पीक लागवडी वर खर्च होतो पण दरवर्षी हा खर्च भरून येईल इतके उत्पन्न होत नसल्याने शेतकऱ्यांच्या कर्जबाजारी पणात वाढ होत आहे. शेतकऱ्यांना जनावरे संभाळने कठिन झाले आहे.परिणामी शेतकऱ्याकडे जनावरे कमी होत चालली आहे. आपल्या गरजा भागवुन लोकांचे कर्ज फेडणे हे शेतकऱ्यांपुढील आव्हान आहे.
दुकानांकडे फिरवली पाठ
आजचा बाजार सर्जा-राजासाठीच्या खास सजावट वस्तुने भरलेला होता. यामध्ये कासरे, गोंडी, नाथा, केसरी, रंगाचे डबे, घागर माळा, झूले, पैंजण, छबी, गेटी, कवड़याच्या माळा, बाशिंगे, गळ्यातील गोप व घागर माळा आदी वस्तूंनी नटलेला होता. परंतु, हाताची पिके गेल्याने दुष्काळी परीस्थित लक्ष्यात घेता शेतकरी हातच राखून या दुकानांकडे फिरकलेच नाही.
जीएसटी लागू झाल्याने भावातही वाढ आहे. कोणतेही सजावटीचे सामान हे मागील वर्षापेक्षा जास्त किंमतीचे आहे. यामुळे यावर्षी बैलाच्या सजावटीसाठीचे हे समान घेण्यासाठी शेतकरी सरसावला नाही. उलट जूने साहित्यच वापरू असा विचार करून केवळ भावाची विचारपूस करत दुकानातून काढता पाय घेत आहे. आता शेवटच्या दिवशी मोठ्याप्रमाणात खरेदी-विक्री होईल या आशेवर व्यापारी आहेत.
साहेब नाव छापु नका
जनावरांच्या चारा पाण्याची चिंता, डोक्यावर दुष्काळाचे सावट. यामुळे आता काही शेतकऱ्यानी त्यांच्या प्रिय सर्जा- राजाच्या जोडीला बाजाराची वाट दाखवली आहे. सण साजरा करण्या ऐवजी त्यांना बाजारात विकावे लागण्याची नामुष्की शेतकऱ्यावर आली आहे. सणाच्या आदल्या दिवशी जनावरे विकली अशी बदनामी होईल असे म्हणत बाजारात आलेली शेतकरी, 'आमचे नाव छापु नका...' अशी विनंती करत होते.
शेतक-यांचा अंत पाहू नये...
शासनाने शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करावे. तात्काळ दुष्काळ जाहीर करून पंचनामे करावी व शेतकऱ्यांना मदत द्यावी. आता केवळ आश्वासन देवून शासनाने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये.- अब्दुल सत्तार, आमदार, सिल्लोड -सोयगाव .