अफवांच्या बाजारात निरपराधांचे बळी, सोशल मीडियाची भूमिका महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 05:27 AM2018-06-18T05:27:02+5:302018-06-18T11:50:21+5:30
गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातच नव्हे, तर अन्य भागांमध्ये चोरांच्या टोळ्या फिरत आहेत, लहान मुले पळविणारे लोक आले आहेत, ते नरभक्षक आहेत, अशा विकृत व घाबरवणाऱ्या अफवांचा बाजार सुरू झाला आहे.
औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातच नव्हे, तर अन्य भागांमध्ये चोरांच्या टोळ्या फिरत आहेत, लहान मुले पळविणारे लोक आले आहेत, ते नरभक्षक आहेत, अशा विकृत व घाबरवणाऱ्या अफवांचा बाजार सुरू झाला आहे. मात्र त्यात निरपधारांचे बळी जात आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात चोर समजून सामान्यांना मारहाणीच्या आठ ते दहा घटना घडल्या आहेत. त्यात दोघांचा बळी गेला, तर दोघे घाटी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. लोकांना मारहाण करण्याच्या घटनांना व्हॉटस् अॅप खतपाणी घालत आहे.
लहान मुलांप्रती असुरक्षितेची भावना निर्माण झाल्याने लोकांकडून हिंसक कृत्य होत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांना वाटते. वैजापूर तालुक्यात चांदगाव येथे चोर समजून गावकºयांनी सहा ते सात जणांना पकडून बेदम मारहाण केली. त्यात दोन निरपराधांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पडेगाव परिसरातील कासंबरी दर्गा वसाहतीत शुक्र वारी सकाळी मुले पळविणारे समजून विक्रमनाथ लालूनाथ भाटी आणि मोहननाथ सोडा या बहुरूप्यांना जमावाने बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे, तर त्यांना सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही जमावाने धक्काबुक्की केली. त्यातील मोहननाथ घाटी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. तिसºया घटनेत जिकठाण येथे चोर समजून एकाला अशाच प्रकारे बदडल्याने त्याला घाटीत दाखल करण्यात आले. भाड्याने घर शोधत असलेल्या महिलेला वाळूज एमआयडीसीतील लोकांनी बेदम मारहाण केली.
>असुरक्षिततेच्या भावनेतून आक्रमक
लहान मुले आणि महिलांच्या बाबतीत पुरुष मंडळी अतिसंवेदनशील असतात आणि त्यांच्याविषयी असुरक्षिततेची त्यांची भावना असते. त्यामुळेच लहान मुले पळविणा-यांची टोळी आल्याची अफवा जरी असली, तरी त्यावर ते सहज विश्वास ठेवतात. व्हॉट्सअॅप या सोशल मीडियावरून फिरणारे व्हिडीओ आणि पोस्ट त्यांना दिसतात. परिणामी, त्या खºयाच असल्याचे समजून लोक चोर समजून संशयितांना मारहाण करतात.
- डॉ.मेहराज कादरी, मानसोपचार तज्ज्ञ
>संशयित तरुणास जमावाचा चोप
औरंगाबाद जिल्ह्यातील जिकठाण येथे संशयित तरुण बंडू आसाराम आहिरे (३५,रा. पुरी, ता. गंगापूर) यास जमावाने शुक्रवारी रात्री मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. जमावाने त्याच्या दुचाकीची तोडफोड केली. त्याच्याजवळ तलवार आढळून आली आहे. वाळूज पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. रस्त्यात संशयित तरुण उभा असल्याची माहिती गावक-यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्याचा पाठलाग करून पकडले. त्याच्याजवळ एका गोणीत तलवार आढळली. त्यानंतर गावकºयांनी त्यास चोप दिला. बंडूवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो शुद्धीवर आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.