नोंदींची दुरुस्ती रखडल्याने चालू शैक्षणिक वर्षात शिक्षकांच्या बदल्यांची शक्यता धूसर...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 12:53 PM2017-11-21T12:53:19+5:302017-11-21T12:58:52+5:30

जोपर्यंत संवर्ग-१ आणि संवर्ग-२ मध्ये मोडणा-या शिक्षकांच्या आॅनलाइन नोंदीची खातरजमा होत नाही, तोपर्यंत बदलीचे आदेश निर्गमित होणार नाहीत, असा पवित्रा राज्यस्तरीय बदली विभागाने घेतला आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात बदल्या होण्याची शक्यता फार कमी आहे.

With the retention of the records, no possibility of transfer of teachers in the current academic year will be ... | नोंदींची दुरुस्ती रखडल्याने चालू शैक्षणिक वर्षात शिक्षकांच्या बदल्यांची शक्यता धूसर...

नोंदींची दुरुस्ती रखडल्याने चालू शैक्षणिक वर्षात शिक्षकांच्या बदल्यांची शक्यता धूसर...

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या दहा दिवसांपासून शिक्षकांच्या बदलीबाबत राज्यस्तरीय आॅनलाइन बदल्यांच्या विभागाकडून कोणतीही सूचना प्राप्त नाही दरवर्षी साधारणपणे मे अखेरपर्यंत शिक्षकांच्या बदल्या होत असतात.यंदा ग्रामविकास विभागाने जिल्हास्तराऐवजी राज्यस्तरावरूनच शिक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला.

औरंगाबाद : गेल्या दहा दिवसांपासून शिक्षकांच्याबदलीबाबत राज्यस्तरीय आॅनलाइन बदल्यांच्या विभागाकडून कोणतीही सूचना प्राप्त नसल्यामुळे शिक्षणाधिका-यांसह जिल्हा परिषदेच्याशिक्षकांमध्येही मोठी अस्वस्थता पसरली आहे. तथापि, जोपर्यंत संवर्ग-१ आणि संवर्ग-२ मध्ये मोडणा-या शिक्षकांच्या आॅनलाइन नोंदीची खातरजमा होत नाही, तोपर्यंत बदलीचे आदेश निर्गमित होणार नाहीत, असा पवित्रा राज्यस्तरीय बदली विभागाने घेतला आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात बदल्या होण्याची शक्यता फार कमी आहे. 

दरवर्षी साधारणपणे मे अखेरपर्यंत शिक्षकांच्या बदल्या होत असतात. यंदा ग्रामविकास विभागाने जिल्हास्तराऐवजी राज्यस्तरावरूनच शिक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी स्वतंत्र राज्यस्तरीय विभाग स्थापन करण्यात आला. या विभागाने यंदा पहिल्यांदाच शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या करण्यासाठी २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार संवर्गनिहाय नोंदी मागविल्या. जूनपासून संपूर्ण आॅक्टोबरपर्यंत शिक्षकांकडून आॅनलाइन नोंदणी करून घेतली. यासंदर्भात राज्यस्तरीय बदली विभागाकडून वारंवार तब्बल ११२३ सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बदलीपात्र यादीतील शिक्षकांपैकी मयत झालेले किंवा बदलीपात्र नसतानादेखील चुकीने काही शिक्षकांचा बदलीपात्र यादीत समावेश करण्यात आला आहे काय, याची जिल्हानिहाय खातरजमा करण्यात आली. त्यानंतर आजपर्यंत राज्यस्तरीय बदली विभागाकडून कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. 

तथापि, राज्यस्तरीय बदली विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, संवर्ग-१मध्ये काही शिक्षकांनी गंभीर आजारी नसतानादेखील वैद्यकीय अधिका-यांकडून आजाराचे खोटे प्रमाणपत्र मिळवून ते आॅनलाइन नोंदणीच्या वेळी जोडले आहे. याशिवाय अनेकांनी पती-पत्नी एकत्रीकरणाचा फायदा उचलण्यासाठी ३० किलोमीटरच्या आतमध्ये असलेल्या शाळांवर कार्यरत शिक्षकांनीही आॅनलाइन नोंदणी केलेली आहे. अशा शिक्षकांची तालुकानिहाय सखोल तपासणी केल्यानंतर खोट्या नोंदी करणाºया शिक्षकांना यादीतून वगळले जाईल. त्यानंतरच बदलींचे आदेश निर्गमित केले जाणार आहेत. परंतु राज्यस्तरीय बदली विभागाकडून अजूनपर्यंत तालुकानिहाय याद्यांच्या तपासणीचे आदेश शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेले 
नाहीत.

शिक्षकांमध्ये दोन गट सक्रिय
शिक्षकांमध्ये आता बदलीच्या बाजूने व विरोधी, असे दोन दबाव गट सक्रिय झाले आहेत. या दोन्ही गटांनी संपूर्ण राज्यभरात जिल्ह्याच्या ठिकाणी शक्तिप्रदर्शनही केले. सर्वोच्च न्यायालयानेदेखील २७ फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार शिक्षकांच्या बदल्यांसाठी हिरवा कंदिल दाखविला. पहिल्यापासून आक्रमक असलेला राज्यस्तरीय बदली विभाग मात्र, अंतिम टप्प्यात शांत दिसत आहे. चालू शैक्षणिक वर्षात बदल्या होतील, की मे २०१८ अखेर बदल्यांबाबत निर्णय घेतला जाईल, यासंबंधीच्या सूचनांकडे राज्यभरातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: With the retention of the records, no possibility of transfer of teachers in the current academic year will be ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.