कार चोरीची फिर्याद नोंदवायची; मग कोर्टाकडून आदेश आणा..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 01:24 AM2017-08-24T01:24:13+5:302017-08-24T01:24:13+5:30
कारचोरीची तक्रार नोंदविण्यासाठी पुंडलिकनगर ठाण्यात गेलेल्या एका माजी सैनिकाला पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी ‘तुम्ही कोर्टाकडून आदेश आणा, तरच फिर्याद नोंदवितो’, असा अजब सल्ला दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कारचोरीची तक्रार नोंदविण्यासाठी पुंडलिकनगर ठाण्यात गेलेल्या एका माजी सैनिकाला पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी चक्क सात दिवस फिरवले. फिर्याद नोंदवून घेतली नाहीच उलट त्या माजी सैनिकालाच आरोपीच्या पिंजºयात उभे करून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. ‘तुम्ही कोर्टाकडून आदेश आणा, तरच फिर्याद नोंदवितो’, असा अजब सल्ला मुदिराज यांनी दिला.
पोलीस आयुक्त यशस्वी यादव हे कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या जवळ जाण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत, तर दुसरीकडे मात्र त्यांचेच अधिकारी सामान्य तक्रारदारांनाच आरोपीच्या पिंजºयात उभे करून तक्रार नोंदवून घेत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली.
सिडको एन-४ येथील रहिवासी कचरू त्र्यंबकराव अढागळे हे नुकतेच भारतीय सेना दलात २८वर्षे सेवा करून निवृत्त झाले. १७ आॅगस्ट रोजी त्यांच्या घरासमोरून त्यांच्या मालकीची कार क्रमांक (एमएच-२० बीटी ६२६०)चोरट्यांनी चोरून नेली. दुसºया दिवशी सकाळी १८ आॅगस्ट रोजी अढागळे हे पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी गेले असता तेथील ठाणे अंमलदार यांनी साहेब नाही, तुम्ही सायंकाळी या, असे त्यांना सांगितले. यामुळे ते सायंकाळी गेले तेव्हाही वरिष्ठ आले नाही,असे सांगून दुसºया दिवशी येण्यास सांगण्यात आले. १९ रोजी सकाळी तक्रारदार हे पो.नि. मुदिराज यांना भेटले तेव्हा त्यांनी तक्रारदार गाडीचा शोध घेतो, दोन दिवसांत गाडी न सापडल्यास फिर्याद नोंदवून घेतो, असे सांगून परत पाठविले. दोन दिवसांनंतर पोलिसांकडून त्यांना कोणताही फोन न आल्याने २२ आॅगस्ट रोजी तक्रारदार हे निरीक्षकांना भेटले. तेव्हा मुदिराज म्हणाले की,‘मी तुमच्या गाडीची सखोल चौकशी केली आहे, बँकेच्या कर्जाचे हप्ते थकवून क्लेम मिळविण्यासाठी खोटी (पान २ वर)
तक्रार करीत आहात, तुम्हीच गाडी लपविली ’,असा आरोप त्यांच्यावर केला. पोलीस निरीक्षकांच्या या आरोपाने तक्रारदार यांना धक्काच बसला. गाडीचा विमाच उतरविला नाही, यामुळे मी क्लेमसाठी तक्रार करीत नाही, तर माझ्या गाडीचा दुरुपयोग आरोपी करू शकतात, म्हणून तक्रार करीत असल्याचे म्हणाले. तेव्हा कोर्टात जा आणि कोर्टाकडून आदेश आणल्यानंतरच कार चोरीचा गुन्हा नोंदविण्यात येईल, असा अजब सल्ला देऊन मुदिराज यांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला.