८ वर्षांत १० वेळा नोंदणी करूनही 'आधार' मिळेना; ‘कार्ड’ नसल्याने पावलोपावली येत आहेत अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:22 AM2018-08-11T00:22:53+5:302018-08-11T00:23:55+5:30

आधार कार्डसाठी प्राधीकरणाकडे वारंवार नोंदणी करूनही आधार कार्ड जनरेट होत नसल्याने पैठण येथील तरूणाचे जीवन जगणे अवघड झाले आहे.

 Pavalpawali is not dependent on the basis of 'Aadhaar' | ८ वर्षांत १० वेळा नोंदणी करूनही 'आधार' मिळेना; ‘कार्ड’ नसल्याने पावलोपावली येत आहेत अडचणी

८ वर्षांत १० वेळा नोंदणी करूनही 'आधार' मिळेना; ‘कार्ड’ नसल्याने पावलोपावली येत आहेत अडचणी

googlenewsNext
ठळक मुद्दे ८ वर्षांत १० वेळा नोंदणी करूनही तरीही कार्ड मिळेनाबारावीच्या परीक्षेला मुकला; बँकेकडूनही नकार

- संजय जाधव
औरंगाबाद  : आधार कार्डसाठी प्राधीकरणाकडे वारंवार नोंदणी करूनही आधार कार्ड जनरेट होत नसल्याने पैठण येथील तरूणाचे जीवन जगणे अवघड झाले आहे. २०११ पासून गेल्या आठ वर्षात तब्बल १० वेळा आधारकार्डसाठी या तरूणाने नोंदणी केली, परंतु अद्याप त्याचे आधारकार्ड त्याला मिळालेले नाही.

पैठण शहरातील कावसान भागातील २४ वर्षीय लक्ष्मण रामराव माने याने २०११ मध्ये २८ जुलै रोजी आधारसाठी नोंदणी केली होती, परंतु कार्ड मिळाले नाही. याबाबत संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला असता त्यांनी परत नोंदणी करा, असा माने यांना सल्ला दिला. यानंतर परत नोंदणी केली. त्याचेही कार्ड आले नाही, अशी नोंदणीची प्रक्रिया माने यांना १० वेळा करावी लागली. परंतु आधारकार्ड काही जनरेट झाले नाही. या १० वेळेच्या नोंदणीच्या पावत्या माने यांनी जपून ठेवल्या आहेत.

आधार कस्टमर केअरची उडवाउडवीची उत्तरे
आधार कार्ड मिळत नसल्याने लक्ष्मण माने यांनी आधार कस्टमर केअरच्या टोल फ्री १८००३००१९४७ या क्रमांकावर कॉल करून संपर्क साधला असता त्यांनी परत नोंदणी करा, हाच एकमेव सल्ला दिला. आॅनलाइन नोंदणी करताना मात्र आधार नोंदणी पावती यानंतर रिजेक्ट होत होती. याबाबत कल्पना दिली असता त्यांनी आम्ही यापेक्षा जास्त काही करू शकत नाही, असे उत्तर दिले.

भारत सरकारने नागरिकांना दिलेले अधिकृत ओळखपत्र म्हणजे आधारकार्ड होय. भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरणामार्फत नागरिकांना आधार कार्ड दिले जाते. नागरिकाची ओळख व पत्ता या कार्डद्वारे अधिकृतपणे मान्य केला जातो. भारतीय टपाल खाते व यूआईडीएआई या वेबसाईटवरून आधार कार्ड डाऊनलोड करता येते. बायोमेट्रिक ओळखपत्र देणारी आधार ही जगातील सर्वात मोठी प्रणाली आहे, असे मानले गेले आहे. आधारकार्ड हे जीवनभराची ओळख असून बँक, मोबाईल कनेक्शन, सरकारी, निमसरकारी सेवा व योजनांसह जवळपास सर्वच व्यवहारासाठी हे कार्ड असणे आता गरजेचे झाले आहे.ओळख पटविण्यासाठी आता कुठेही आधारकार्ड मागितले जाते. पासपोर्ट, जनधन बँक खाते, गॅस सबसिडी, आयकर भरणा, रेल्वे, विमान तिकिट, शाळेत प्रवेश, वाहन चालविण्याचा परवाना, विविध परिक्षा, विवाह नोंदणी, सीमकार्ड खरेदी, जमीन खरेदी विक्री, लॉज करून राहणे, आदी कामासाठी आधारकार्ड गरजेचे झाले आहे.

बारावीच्या परीक्षेला मुकला; बँकेकडूनही नकार
हे कार्ड नसल्याने लक्ष्मण माने यांना इयत्ता बारावीचे परीक्षा शुल्क भरता आले नाही व परीक्षेला मुकावे लागले. एकाही राष्ट्रीयीकृत बँकेने लक्ष्मण माने यांचे बँकेत खाते उघडले नाही. महाराष्ट्र बँक शाखा पैठण या बँकेतील खाते आधार लिंक न केल्याने बँकेने खाते बंद केले. माने यांना एकाही कंपनीने सीमकार्ड न दिल्याने त्यांना सध्या दुसऱ्याचे सीमकार्ड वापरावे लागत आहे.

गर्भवती पत्नीची नोंदणीही होईना
लक्ष्मण माने याचा पैठण शहरात फोटो स्टुडिओ असून आधारकार्ड नसल्याने दुकानाचा परवाना दुसºयाच्या नावावर करावा लागला. लक्ष्मण माने यांना विवाह नोंदणीसाठी आधारकार्ड नसल्याने अडचण आली होती, मात्र मतदान कार्डामुळे विवाह करता आला. लक्ष्मण माने यांची पत्नी गर्भवती असून याबाबतची नोंदणी आधार कार्ड नसल्याने शासकीय रूग्णालयात करून घेतली नाही. गॅस कनेक्शन मिळाले नाही. रेल्वेचे तिकीट मिळत नाही. नोकरीसाठी विविध परिक्षा देता आल्या नाहीत. देवस्थानच्या ठिकाणी भक्त निवासात रूम मिळत नाही. या शिवाय जिथे जिथे आधारकार्ड लागते तिथे वंचित राहावे लागले आहे.

प्रवेश रद्द होणार 

सध्या लक्ष्मण माने यांनी सेंट्रल इन्स्टिट्यूूट आॅफ प्लास्टिक इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी या संस्थेत प्रवेश घेतला आहे. मात्र आधार कार्ड नसल्याने या संस्थेने प्रवेश रद्द करण्याबाबत लक्ष्मण माने यांना सूचित केले आहे.या सर्व प्रकाराने लक्ष्मच हादरला असून जगावे तरी कसे, हेच त्याला समजेनासे झाले आहे. मी माझी समस्या वर्तमानपत्रांद्वारे राज्यकर्त्यांसमोर मांडत आहे, याबाबत योग्य दखल घेऊन मला न्याय द्यावा, नुकसानभरपाई सरकारने द्यावी, अशी मागणी लक्ष्मण माने याने केली आहे.

जीवंत असूनही सर्वांना अस्तित्व अमान्य
आधारकार्ड नसल्याने जीवंत असूनही त्याचे अस्तित्व कुणीच मान्य करायला तयार नाही. शिक्षण, रोजगार, व्यवसाय आदी क्षेत्रात आधारकार्ड नसल्याने वेळोवेळी त्याला नकार मिळाला आहे. आधार कार्ड मिळतच नसल्याने हतबल झालेल्या या तरूणाची मनस्थिती ढासळली असून आधारकार्डविना जीवन कसे जगावे, असा यक्ष प्रश्न आता त्याच्यासमोर उभा राहिला आहे.

Web Title:  Pavalpawali is not dependent on the basis of 'Aadhaar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.