बँकेकडून कर्ज काढून देण्याच्या नावाखाली फसवणुक करणारा औरंगाबादेत अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 05:37 PM2018-02-19T17:37:25+5:302018-02-19T17:38:21+5:30
व्यवसायासाठी कर्ज काढून देण्याचे अमिष दाखवून सामान्यांची फसवणूक करणार्या एकास गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली.
औरंगाबाद : व्यवसायासाठी कर्ज काढून देण्याचे अमिष दाखवून सामान्यांची फसवणूक करणार्या एकास गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली. आरोपींविरोधात अनेक लोकांनी गुन्हेशाखेकडे तक्रार नोंदविल्या आहेत .
कैलास जयवंतराव शिंदे (३८,रा. तळपिंप्री,ता. गंगापूर) असे आरोपीचे नाव आहे. गुन्हेशाखेच्या पोलिसांनी सांगितले की,आरोपी हा गेल्या काही महिन्यापासून सामान्यांना कर्जाचे अमिष दाखवून त्यांच्याकडून लोन प्रोसेसिंग फीस आणि अन्य विविध कारणे सांगून पैसे उकळतो आणि अचानक गायब होतो, अशी माहिती खबर्याने दिली.
तक्रारदार राजू रामचंद्र परदेशी (रा. गुलमोहर कॉलनी) यांना चार महिन्यापूर्वी शिंदे भेटला. यावेळी त्याने तो विविध बँकांचे काम करतो. कर्ज काढून देतो, असे सांगितले. त्यासाठी प्रोसेसिंग फीस लागते, ती दिली तर तुम्हाला मोठे दुकान टाकता येईल असे सांगून कर्ज काढून देण्याची ग्वाही दिली. यानंतर त्याने त्याने त्यांचे शॉप अॅक्ट लायसन्स काढून दिले. यासोबतच एसबीआय बँकेत खाते उघडून देत आधारकार्ड, पॅन कार्डची झेरॉक्स आणि कर्जाच्या प्रोसेसिंग फीसकरीता ३० हजार रुपये घेतले. त्यानंतर तो पंधरा दिवस गायब झाला. काही दिवसाने राजू यांनी आरोपीशी संपर्क साधला असता तुमची फाईल बँकेत टाकली आहे, असे सांगितले. यामुळे राजू यांचा आरोपीवर विश्वास बसला.
यासोबतच त्यांनी त्यांच्या मामाचा मुलगा प्रेमलक्ष्मण परदेशी यांनाही दुकान टाकण्यासाठी कर्जाची गरज असल्याचे सांगितल्याने आरोपीने त्यांना पाच लाख रुपये कर्ज देण्याची प्रोसेसिंग फीस म्हणून १५ हजार रुपये उकळले. तर त्यांचा मित्र नितीन परमार यांनाही हार्डवेअरच्या दुकानासाठी पाच लाख रुपये कर्जाची गरज असल्याचे सांगितले. नितीन यांचीही कर्जाची फाईल बँकेत टाकल्याचे सांगून आणखी १५ हजार रुपये घेतले. डिसेंबर अखरेपर्यंत कर्ज मंजूर न झाल्याने राजू यांनी आरोपीकडे कर्जाविषयी विचारणा केली असता कर्ज मंजूर होण्यास वेळ लागेल, आज हाईल, उद्या होईल असे तो सांगू लागला. त्यानंतर त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांच्या नावाची कर्जफाईल बँकेत नसल्याचे समजले. यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याची तक्रार पोलिसांकडे केली.
यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात, पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल वाघ, कर्मचारी मनोज चव्हाण, संतोष सूर्यवंशी, शेख हकीम आणि सय्यद आश्रफ यांनी त्याला बालाजीनगर परिसरात ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी तक्रारदार त्याच्यासमोर उभा केले तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली.