मागोवा २०१७ : अनोख्या उपक्रमांमुळे औरंगाबादमध्ये गुन्हेगारी आटोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 04:58 PM2017-12-25T16:58:45+5:302017-12-25T17:26:32+5:30

२०१७ हे वर्ष औरंगाबाद शहरवासीय आणि ग्रामीण जनतेसाठी अत्यंत सुखद गेले. विशेष पोलीस अधिकारी, सीसीटीव्ही कॅमेरे आणि खबर्‍यांचे नेटवर्क वाढविल्याने शहरातील गुुन्हेगारांना वेसण घालणे पोलिसांना शक्य झाले. परिणामी घरफोडी, लुटमारी, मंगळसूत्र चोरीच्या घटनांमध्ये कमालीची घट झाली.

Magova 2017: Crime Control in Aurangabad due to its unique activities | मागोवा २०१७ : अनोख्या उपक्रमांमुळे औरंगाबादमध्ये गुन्हेगारी आटोक्यात

मागोवा २०१७ : अनोख्या उपक्रमांमुळे औरंगाबादमध्ये गुन्हेगारी आटोक्यात

googlenewsNext
ठळक मुद्देतंत्रज्ञानाच्या मदतीने शहरातील गुन्हेगारांवर पोलिसांचा बसला धाकतडीपारी, एमपीडीएसारख्या कारवायांनी गुन्हेगारांचे मोडले कंबरडेमंगळसूत्र चोरी, घरफोडी, लुटमारीच्या घटनांमध्ये प्रथमच घट

- बापू सोळुंके 

औरंगाबाद : २०१७ हे वर्ष औरंगाबाद शहरवासीय आणि ग्रामीण जनतेसाठी अत्यंत सुखद गेले. विशेष पोलीस अधिकारी, सीसीटीव्ही कॅमेरे आणि खबर्‍यांचे नेटवर्क वाढविल्याने शहरातील गुुन्हेगारांना वेसण घालणे पोलिसांना शक्य झाले. परिणामी घरफोडी, लुटमारी, मंगळसूत्र चोरीच्या घटनांमध्ये कमालीची घट झाली. आयुक्तालयाच्या इतिहासात प्रथमच गुन्हेगारीचा आलेख घसरला. असे असले तरी शहरातील वाहन चोरीचे गुन्हे रोखण्यात पोलीस यंत्रणा कमी पडली. वाहतूक शाखेने तब्बल पावणे दोन लाख नागरिकांवर बेशिस्तीच्या केसेस केल्या. त्याचा कोणताही परिणाम वाहनचालकांवर होताना दिसत नाही.

दोन ते तीन वर्षांपूर्वी शहरात मंगळसूत्र चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. चोरट्यांच्या दहशतीमुळे  घराबाहेर पडताना महिला सोन्याचे अलंकार घालत नसत. प्रत्येक कॉलनीत पोस्टर बॉईज मोठ्या संख्येने वाढले होते. चौका-चौकात पोस्टर लावून शक्तिप्रदर्शन करण्याच्या नावाखाली गुंडागर्दी करणार्‍या गुन्हेगारी स्वरूपाच्या लोकांना तडीपार करण्याचा सपाटा शहर पोलिसांनी सुरू केला. याचा परिणाम गुंडगिरी करणार्‍यांवर झाला. एक तर अनेकांनी शहर सोडले किंवा भूमिगत होऊन गुन्हेगारी सोडली. परिणामी सामान्यांचे जीवन सुकर झाले. मोबाईलआधारित जीपीएस यंत्रणेचा अवलंब शहर पोलिसांनी केल्यापासून पोलिसांना गस्त चुकविता येत नाही. पोलिसांची गस्त बरोबर झाली अथवा नाही, यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी नजर ठेवून असतात. परिणामी रात्री घडणार्‍या घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यांत घट झाली. 

नागरिक झाले विशेष पोलीस अधिकारी
पोलीस आणि जनता यांच्यातील दरी कमी करण्यासाठी सामान्य नागरिकांना विशेष पोलीस अधिकारीपदी (एसपीओ) नेमणूक देण्यात आली. गणेशोत्सव, ईद यासारख्या मोठ्या बंदोबस्तासाठी एसपीओंची पोलिसांना मदत झाली. परिणामी पोलिसांवरील कामाचा ताण कमी झाला. 

हवालदार थापा खात्यातून बडतर्फ
चलनातून बाद एक कोटीच्या नोटा बदलून आणण्यासाठी जाणार्‍या पाच जणांना पकडल्यानंतर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई न करता नोटा पळविल्याच्या आरोपाखाली पोलीस हवालदार वीरबहादूर गुरुंग ऊर्फ थापा याला तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस दलातून बडतर्फ  केले. 

१७ एप्रिल
रोजी राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना सुभेदारी येथे मारहाण केल्याच्या आरोपाखाली भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ यांच्यासह एकूण पाच जणांवर पोलिसांनी कारवाई केली.

२८ एप्रिल 
अमितेशकुमार मुंबईला गेले, यशस्वी यादव आले
आपल्या कार्यशैलीने शहरवासीयांच्या गळ्यातील ताईत बनलेले पोलीस आयुक्त  अमितेश कुमार यांची बदली मुंबईत वाहतूक सहआयुक्तपदी झाली आणि ठाणे येथून आलेले यशस्वी यादव हे आयुक्तपदी रुजू झाले. यासोबतच पोलीस उपायुक्त वसंत परदेशी, संदीप आटोळे यांच्याही बदल्या झाल्या आणि  विनायक ढाक णे, डॉ. दीपाली धाटे-घाडगे हे दोन नवे अधिकारी शहर पोलीस दलाला एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मिळाले.

२१ जून
पकडलेले भंगाराचे ट्रक सोडून देण्यासाठी तब्बल ८ लाख रुपयांची मागणी करून दीड लाख रुपयांची तडजोड करणार्‍या एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यातील  सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत आणि पोलीस उपनिरीक्षक ताहेर शेख यांना पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी तडकाफडकी निलंबित केले. या कारवाईमुळे पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली होती.

५ जुलै
वीज चोरीची कीट ग्राहकांना विक्री करणार्‍या रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. याप्रकरणी चीनमधून आयात के लेल्या रिमोट आणि इलेक्ट्रो मॅग्नेटिक बॅट्ची विक्री करणार्‍यासह खरेदीदार ३० ग्राहकांना पोलिसांनी अटक केली.    

२९ जुलै
तस्लिमा नसरीन यांना परत पाठविण्याची नामुष्की...
जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेण्यांना भेटी देण्यासाठी तीन दिवसांच्या दौर्‍यावर २९ जुलैच्या रात्री औरंगाबादेत आलेल्या वादग्रस्त बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांना सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी प्रवेश नाकारला.  परिणामी चिकलठाणा विमानतळावरून तस्लिमा यांना परत जावे लागल्याने देशपातळीवर औरंगाबाद पोलिसांची नाचक्की झाली.  

१६ ऑगस्ट 
‘साई इंजिनिअरिंग कॉलेजचा परीक्षा घोटाळ्याचा पर्दाफाश
सुरेवाडी येथील नगरसेवक  सीताराम सुरे यांच्या घरी अभियांत्रिकीचे पेपर सोडविणार्‍या २६ विद्यार्थ्यांसह साई अभियांत्रिकी कॉलेजच्या प्राध्यापकांना गुन्हे शाखा पोलिसांनी छापा मारून पकडले. १६ आॅगस्ट रोजी रात्री झालेल्या या कारवाईने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. 

७ डिसेंबर 
शहरातील प्रोझोन मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पोलिसांनी गुरुवार ७ डिसेंबर रोजी रात्री पदार्फाश केला. दोन वेगवेगळ्या स्पा सेंटरवर एकाच वेळी मारलेल्या धाडीत तीन ग्राहक, मॅनेजरसह दहा जणांना अटक केली आणि थायलंडहून आणण्यात आलेल्या १२ मुलींची मुक्तता केली. 

शहरात नोव्हेंबरअखेरपर्यंत घडलेल्या गुन्ह्यांच्या घटना

खुनाच्या घटना- २४
दरोडे- ७
जबरी चोरी- १४१
घरफोडी- १५२
चोरीच्या घटना- १४९३
सरकारी कर्मचार्‍यांवरील हल्ले- ७८
विनयभंग-  १५५
बलात्कार- ७०
वाहनचोरी- ६३७
मंगळसूत्र चोरी २९
हाणामारीच्या घटना- ६१२

ग्रामीण पोलीस कारवाईत अग्रेसर
ग्रामीण पोलीस दलाने विविध प्रकारचे किचकट आणि गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणून आम्हीही कारवाईत मागे नाहीत, हे दाखवून दिले. वाळू तस्करांविरोधात गतवर्षीच्या तुलनेत तिप्पट कारवाई केली. पोलीस अधीक्षक डॉ. आरतीसिंह येथे रुजू झाल्यापासून त्यांनी विविध पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. गावठी दारू विक्रेते, गांजा तस्कर, वाळू तस्कर, जुगार अड्डेचालक यांच्याविरोधात त्यांनी धडक मोहीम उघडली. महिलासंबंधी गुन्हेही घटल्याचे पोलीस अधीक्षक डॉ.आरतीसिंह यांनी सांगितले. गतवर्षी विनयभंगाच्या १९४ घटना घडल्या होत्या. यावर्षी यात ३४ ने घट झाली, तर बलात्काराच्या घटनांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत २ ने वाढ होऊन त्या ५७ झाल्या. 

३ जुलै : करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जालना रोडवरील हॉटेल व्यावसायिक ज्योती नायरच्या हत्येचा छडा लावण्यात ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. हत्येनंतर शिर्डी येथे एका शेतात काम करणार्‍या मारेकरी लहू शामराव राठोड याला पोलिसांनी शोधून काढले.

१४ जुलै : सोयगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथील १५ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्यानंतर नराधमांनी तिची हत्या केली. दुसर्‍या दिवशी तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी या घटनेची दखल घेत मारेकर्‍यांना पकडून त्यांना जेलमध्ये डांबले. 

१८ सप्टेंबर :  एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक करणार्‍या आंतरराज्यीय रॅकेटचा ग्रामीण गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी सायबर क्राईम सेलच्या मदतीने ही कामगिरी केली.

३ नोव्हेंबर : ट्रॅक्टर भाड्याने घेऊन परस्पर विक्री करणार्‍या रॅकेटला ग्रामीण गुन्हे शाखेने पकडले. 
 

Web Title: Magova 2017: Crime Control in Aurangabad due to its unique activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.