पारधी सामाजातील मुलांना शिक्षणाद्वारे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस अधीक्षकांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 11:29 PM2019-07-06T23:29:04+5:302019-07-06T23:29:18+5:30
इंग्रजांनी गुन्हेगारी जमात म्हणून शिक्का मारलेल्या पारधी वसाहतींकडे आजही गुन्हेगारांची वसाहत म्हणून पाहिले जाते. पोलीस या वसाहतींवर केवळ धाड मारण्यासाठी आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी जातात, असा अनुभव आहे. औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी मात्र या वसाहतींना सुधारणेचे दरवाजे खुले करून तेथे पालात राहणाऱ्या मुलांना त्यांनी शाळेत घातले. त्या मुलांना शालेय साहित्य प्रदान करून शिक्षणच तुम्हाला तारू शकते, हे पटवून दिले. पोलीस आणि शासकीय यंत्रणेवर त्यांचा विश्वास बसावा, याकरिता त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना एकत्र आणून त्यांचे प्रश्न समजावून घेतले.
बापू सोळुंके
औरंगाबाद : इंग्रजांनी गुन्हेगारी जमात म्हणून शिक्का मारलेल्या पारधी वसाहतींकडे आजही गुन्हेगारांची वसाहत म्हणून पाहिले जाते. पोलीस या वसाहतींवर केवळ धाड मारण्यासाठी आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी जातात, असा अनुभव आहे. औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी मात्र या वसाहतींना सुधारणेचे दरवाजे खुले करून तेथे पालात राहणाऱ्या मुलांना त्यांनी शाळेत घातले. त्या मुलांना शालेय साहित्य प्रदान करून शिक्षणच तुम्हाला तारू शकते, हे पटवून दिले. पोलीस आणि शासकीय यंत्रणेवर त्यांचा विश्वास बसावा, याकरिता त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना एकत्र आणून त्यांचे प्रश्न समजावून घेतले.
औरंगाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणी पारधी वसाहती आहेत. इंग्रज देश सोडून गेले. मात्र, पारधी समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र बदलला नाही. आजही कोठे दरोडा पडला, मोठ्या चोºया अथवा एखादा मोठा गुन्हा घडल्यास पोलिसांकडून पारधी वसाहतींवर धाडी टाकल्या जातात. पारधी वसाहतीमधील संशयितांची धरपकड करून त्यांना जेलमध्ये डांबले जाते. यामुळे पारधी वसाहतींकडे पोलीस आल्यास तेथील पुरुषांसह लहान, मोठे तरुण मुले लपून बसतात, नाही तर पळून जातात. गुन्हा केला नसला, तरी संशयित म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते आणि त्यांचा पीसीआर काढला जातो. परिणामी, पोलीस आणि पारधी समाज यांच्यात कायम छत्तीसचा आकडा राहिला आहे. गुन्हा केला नसतानाही पोलीस पकडतात, म्हणून या समाजातील तरुण गुन्हेगारीकडे वळल्याचेही दिसतात.
पारधी समाजातील मोजक्या लोकांकडे अल्प शेती आहे. उत्पन्नाचे साधन नसल्याने या समाजातील पुरुष मंडळी एक तर मजुरी करतात नाही तर चोºया, दरोडे टाकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शिक्षणापासून कोसोदूर असलेल्या या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. मात्र, या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. परिणामी, आजही कोणत्याही पारधी वसाहतीमध्ये सर्व वयोगटातील लहान मुले उनाडक्या करताना दिसतात. नाही तर शहरात सिग्नलवर भीक मागताना आढळतात. शिक्षणामुळे त्यांच्या आयुष्यात बदल होऊ शकतो, याबाबत ठाम विश्वास असलेल्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी नुकताच पारधी समाजाचा एक मेळावा घेतला. एवढेच नव्हे तर गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाºया पारधी वसाहतीमधील १५ मुलांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेशित केले.