जीवनदाता बनण्याचा आलेख वाढता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:57 PM2019-06-13T23:57:44+5:302019-06-13T23:59:51+5:30

रक्तदान म्हणजे जीवनदान. अपघात असो की मोठी शस्त्रक्रिया अथवा अन्य काही आजाराप्रसंगी रुग्णांना रक्त लागतेच. गेली अनेक वर्षे अज्ञान, गैरसमजुतीमुळे रक्तदानाचे प्रमाण अंत्यत कमी होते. मात्र, जनजागृतीमुळे गेल्या काही वर्षांत कोणतीही अपेक्षा न ठेवता रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची संख्या वाढत आहे. परिणामी, अनेकांचा जीव वाचत आहे.

Growth of Life Cover | जीवनदाता बनण्याचा आलेख वाढता

जीवनदाता बनण्याचा आलेख वाढता

googlenewsNext
ठळक मुद्देजागतिक रक्तदाता दिन : तरुणाई आघाडीवर, रक्तदानामुळे मिळतेय रुग्णांना जीवदान

संतोष हिरेमठ
औरंगाबाद : रक्तदान म्हणजे जीवनदान. अपघात असो की मोठी शस्त्रक्रिया अथवा अन्य काही आजाराप्रसंगी रुग्णांना रक्त लागतेच. गेली अनेक वर्षे अज्ञान, गैरसमजुतीमुळे रक्तदानाचे प्रमाण अंत्यत कमी होते. मात्र, जनजागृतीमुळे गेल्या काही वर्षांत कोणतीही अपेक्षा न ठेवता रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची संख्या वाढत आहे. परिणामी, अनेकांचा जीव वाचत आहे.
शहराची लोकसंख्या १३ लाखांवर गेली आहे. गोरगरिबांचे आधारवड म्हणून ओळखल्या जाणाºया घाटी रुग्णालयात दररोज मराठवाड्यासह लगतच्या भागातून उपचारासाठी रुग्ण दाखल होतात. शहरात खाजगी रुग्णालयांचेही जाळे मोठे आहे. येथेही उपचारासाठी दाखल होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. उपचारादरम्यान अनेक रुग्णांना रक्ताची गरज असते. शहरात आजघडीला आठ रक्तपेढ्या आहेत. रक्तपेढ्यांमधून वर्षभरात ४५ ते ५० हजार बॅग रक्तसंकलन होते. शहरातील लोकसंख्येच्या काही टक्के रक्तदानाचे प्रमाण आहे. मात्र, त्यामध्ये दरवर्षी वाढ होत असल्याचे दिलासा देणारे चित्र आहे. रक्तदानाचे मूल्य ओळखून स्वेच्छा रक्तदानाविषयी समाजात जनजागृती वाढत आहे. त्यामुळे रक्तदान करणाºयांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये तरुणाई आघाडीवर आहे. शहरातील रक्तदात्यांपैकी ५० टक्के रक्तदाते हे वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान करतात.
पुणे-मुंबईला ज्या प्रमाणात स्वेच्छा रक्तदान होते, त्या तुलनेत शहरात रक्तदान होत नसल्याची ओरड केली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत वाढदिवसाच्या दिवशी स्वत:हून रक्तदान करण्याकडे ओढा वाढत आहे. कोणताही गाजावाजा न करता रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले जाते. त्याबरोबर विविध संस्था, संघटनांकडून नियमितपणे रक्तदान शिबिरे घेतली जात आहेत. त्यामध्ये नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.
रक्तदानाचे प्रमाण वाढत असले, तरी मे, जून महिन्यांत दरवर्षी रक्ताच्या तुटवड्याला सामोरे जावे लागते. गरजू रुग्णांसाठी रक्तदान करण्याचे आवाहन करण्याची वेळ रक्तपेढ्यांवर ओढावते. अशा वेळीही दाते रक्तदानासाठी धावून येतात. गोरगरीब रुग्णांसाठी घाटीतील विभाग रक्तपेढी महत्त्वाची भूमिका निभावत आहे. याठिकाणी दरवर्षी १५ हजारांवर दात्यांकडून रक्तदान केले जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तसंकलनासाठी डॉ. अनिल जोशी, डॉ. सुरेश गवई, डॉ. शुभज्योती पोरे, विभागीय रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी हनुमान रुळे, सुनीता बनकर आदींकडून प्रयत्न केले जातात.
एका दात्यामुळे तीन रुग्णांना जीवदान
प्रत्येक निरोगी माणसाच्या शरीरात ५ ते ६ लिटर रक्त असते. गरजेपेक्षा ५०० मि.लि. जास्तीचे रक्त यकृत आणि पाणथरीमध्ये साठविलेले असते. रक्तदानाच्या वेळी ३५० मि.लि. रक्त घेतले जाते. ते रक्त ४८ तासांत भरून निघते. लालरक्तपेशी, प्लेटलेट, रक्तातील द्रव भाग आदी वेगवेगळे केले जातात. त्यामुळे एका रक्तदात्यामुळे किमान तीन रुग्णांना फायदा होतो.
नागरिकांत जागृती
रक्तदात्यांमध्ये वाढ होत आहे. १५ हजारांवर रक्त पिशव्यांचे दरवर्षी संकलन होते. मे आणि जूनचा पहिला, दुसºया आठवड्यातच फक्त रक्ताचा तुटवडा असतो. नागरिकांमध्ये जनजागृती होत आहे. सामाजिक संस्था रक्तदान शिबिरे घेतात. त्यातून रक्तदानाचे प्रमाण वाढत आहे.
- डॉ. शुभज्योती पोरे, सहायक प्राध्यापक, विकृतीशास्त्र विभाग, घाटी
२७ हजार दात्यांचे रक्तदान
हळूहळू फरक पडत आहे. रक्तदानाचे दरवर्षी प्रमाण वाढत आहे. रक्तदात्याने रक्तदान केल्यानंतर त्याचे वेगवेगळे घटक केले जातात. त्याचा रुग्णांना मोठा फायदा होतो. रक्तपेढीत गेल्या वर्षी २७ हजार दात्यांनी रक्तदान केले. यावर्षी आतापर्यंत १२ हजार दात्यांनी रक्तदान केले आहे.
- डॉ. मंजूषा कुलकर्णी, वैद्यकीय संचालक, दत्ताजी भाले रक्तपेढी


घाटीतील विभागीय रक्तपेढीतील स्थिती
वर्ष रक्तदाते
२०१७ १४,४८२
२०१८ १५,२४४
२०१९ (१२ जूनपर्यंत) ६,७३०

Web Title: Growth of Life Cover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.