रास्त भाव दुकानात शिधापत्रिका मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 12:40 AM2017-10-06T00:40:55+5:302017-10-06T00:40:55+5:30
येथील काही रास्त भाव दुकानदरांकडून सणासुदीच्या तोंडावरही लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप केले जात नाही. त्यामुळे त्यांचा हा गैरव्यहार थांबवून संबंधितांना शिधापत्रिका वितरित करण्याची मागणी पालिकेतील काँग्रेसचे गटनेते शेख निहालभैय्या यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील काही रास्त भाव दुकानदरांकडून सणासुदीच्या तोंडावरही लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप केले जात नाही. त्यामुळे त्यांचा हा गैरव्यहार थांबवून संबंधितांना शिधापत्रिका वितरित करण्याची मागणी पालिकेतील काँग्रेसचे गटनेते शेख निहालभैय्या यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी अनिल भंडारी व जिल्हा पुरवठा अधिकारी लतिफ पठाण यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले की, वारंवार मागणी केल्यानंतर शिधापत्रिका वाटप तर सुरू केले. मात्र १0 टक्केही शिधापत्रिका वाटप झाल्या नसल्याचा आरोप निवेदनात केला आहे. त्यातच शिधापत्रिकेसाठी शासकीय शुल्कापेक्षा जास्तीचे शुल्क घेतले जात आहे. ३00 ते ५00 रुपयांपर्यंत रक्कम घेतली जात आहे. अन्नसुरक्षा, शेतकरी आदी योजनांसाठी तर तीन हजारांपेक्षा जास्त रक्कम लागते, असाही आरोप केला. एस.एस. ठोंबरे व अन्य एक दुकानदार शिधापत्रिकाही देत नाही अन् धान्यही देत नसल्याची तक्रार केली.
यावर जिल्हाधिकारी भंडारी यांनी समितीद्वारे तपासणी करण्याचा आदेश देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. यावेळी विविध भागातील नागरिकांचीही त्यांच्यासमवेत उपस्थिती होती.