फेसबुक, व्हॉटस् अॅपवर आक्षेपार्ह मजकूर शहरात दोन ठिकाणी दगडफेक
By Admin | Published: June 8, 2014 01:09 AM2014-06-08T01:09:31+5:302014-06-08T01:15:11+5:30
औरंगाबाद : ‘व्हॉटस् अॅप’ आणि ‘फेसबुक’ च्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण करणारा मजकूर पोस्ट केल्यानंतर शहरात दोन ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या.
औरंगाबाद : ‘व्हॉटस् अॅप’ आणि ‘फेसबुक’ च्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण करणारा मजकूर पोस्ट केल्यानंतर शहरात दोन ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात पोलीसांना कडक बंदोबस्त लावला आहे.
गारखेडा परिसरातील शंभूनगर परिसरात दोन दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री १०० ते १२५ जणांच्या संतप्त समूहाने या परिसरात दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरामुळे ६ वाहनांचे नुकसान झाले, तर एक जण जखमी झाला.
एका गटाने दिलेल्या तक्रारीनुसार जवाहरनगर पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले असून, पहाटेपासून धरपकड मोहीम राबविली आहे. या परिसरात काल रात्रीपासूनच पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असली तरी आज शनिवारी सायंकाळी १०-१५ जणांच्या टोळक्याने विभागीय क्रीडा संकुल परिसरातील दुकाने बंद करण्यासाठी व्यापाऱ्यांना बळजबरी केली. हा प्रकार सुरू असताना परिसरात अफवांचे पेव फुटले. या परिसरात दगडफेक सुरू असल्याचा निनावी फोन पोलीस नियंत्रण कक्षाला गेला. नियंत्रण कक्षाकडून जवाहरनगर पोलिसांना तात्काळ घटनास्थळी धाव घेण्याची सूचना मिळाली. त्यानुसार पोलिसांचा मोठा फौजफाटा क्रीडा संकुल चौकात दाखल झाला. तेव्हा ती निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले.
फेसबुकवर महापुरुषाची विटबंना
फेसबुक या सोशल साईटवर पंजाब येथील एका जणाने महापुरुषाचे आक्षेपार्ह चित्र व मजकूर अपलोड केल्याने शनिवारी रात्री वातावरण तापले. राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप शिरसाठ व त्यांच्या कार्यकर्त्यांनी क्रांतीचौक ठाण्यात धाव घेऊन सदरील समाजकंटकाविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी तक्रार दाखल केली. पोलिसांनी वेळीच दक्षता घेऊन परिसरात बंदोबस्त वाढविला. दरम्यान, जवाहर कॉलनी परिसरातील काही तरुण घोषणाबाजी करीत आकाशवाणी चौकात आले. तेथे त्यांनी काही वाहनांवर दगडफेक केली. या घटनेमुळे जालना रोडवर काही वेळ तणाव निर्माण झाला होता. तरुणांचा हा फौजफाटा नंतर कैलासनगर, रेंगटीपुरा भागात जावून घोषणाबाजी करीत होता. तेथे पोलीस पोहोचेपर्यंत तरुण पसार झाले होते. शहरात तणाव वाढत असल्याने वेगवेगळ्या वसाहतींमध्ये ५० ठिकाणी फिक्स पॉर्इंट लावण्यात आले. आयुक्तालयातील स्ट्रायकिंग फोर्सही तैनात करण्यात आल्याची माहिती उपायुक्त अरविंद चावरिया यांनी दिली.