औरंगाबादमध्ये जालना रोडवर ई-रिक्षाला ब्रेक; पर्यटनस्थळी जाणार्या रस्त्यावरच वाहतुकीची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 04:02 PM2018-01-12T16:02:14+5:302018-01-12T16:04:21+5:30
शहरातील जालना रोडसह अनेक रस्त्यांवर ई-रिक्षा धावण्याला ब्रेक लागला आहे. ई-रिक्षांच्या वेगमर्यादेमुळे राष्ट्रीय महामार्ग आणि शहरातील उड्डाणपुलावर प्रवासी वाहतुकीस परवानगी नाकारण्यात आली आहे. पर्यटनस्थळी ये-जा करणार्या काही मोजक्या रस्त्यांवरच ई-रिक्षाला वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे.
औरंगाबाद : शहरातील जालना रोडसह अनेक रस्त्यांवर ई-रिक्षा धावण्याला ब्रेक लागला आहे. ई-रिक्षांच्या वेगमर्यादेमुळे राष्ट्रीय महामार्ग आणि शहरातील उड्डाणपुलावर प्रवासी वाहतुकीस परवानगी नाकारण्यात आली आहे. पर्यटनस्थळी ये-जा करणार्या काही मोजक्या रस्त्यांवरच ई-रिक्षाला वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे.
अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली १८ डिसेंबर रोजी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक पार पडली होती. या बैठकीतील इतिवृत्त आणि घेण्यात आलेल्या निर्णयाविषयी बुधवारी (दि. १०) प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रमेशचंद्र खराडे उपस्थित होते. शहरात ई-रिक्षांची विक्री सुरू झाली; परंतु आरटीओ कार्यालयात ई-रिक्षांची नोंदणी होत नव्हती. पाच महिन्यांपासून रिक्षांच्या नोंदणीची प्रतीक्षा केली जात होती. दरम्यानच्या कालावधीत अनेकांनी इंधनावर चालणारी रिक्षा खरेदीवर भर दिला. अखेर आरटीओ कार्यालयात ई-रिक्षांची नोंदणी सुरू झाली; परंतु त्यानंतर वाहतुकीचे मार्ग ठरत नसल्याने ई-रिक्षा प्रश्न ‘जैसे थे’ राहिला. आतापर्यंत केवळ ५ रिक्षांचीच कार्यालयात नोंद झाली. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत काही मार्गांवर वाहतुकीची परवानगी देण्यात आली. शहरातील वाढती वाहन संख्या, लोकसंख्या, वाहतुकीची कोंडी, अडथळे, अरुं द रस्ते याचा विचार करून काही मार्गांवर या रिक्षांना परवानगी देण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
नवीन रिक्षांची अट शिथिल
अनधिकृत रिक्षा आणि टॅक्सींना यापुढे दंड भरून नवे परवाने (परमिट) दिले जातील, अशी घोषणा २२ सप्टेंबरला करण्यात आली; परंतु औरंगाबाद आरटीओ कार्यालयाने जुन्या रिक्षांवर परवाने चढवलेच नाहीत. प्रादेशिक परिवहन समितीच्या पूर्वीच्या निर्णयाची अडचण सांगण्यात येत होती. ही परिस्थिती लक्षात घेता ३१ मार्च २०१८ पर्यंत परवान्यावर नवीन रिक्षांची नोंद करण्याची अट शिथिल करण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली.
या मार्गावर ई-रिक्षा वाहतुकीची परवानगी
- रेल्वेस्टेशन ते बीबीका मकबरा
- मध्यवर्ती बसस्थानक ते पाणचक्की
- रेल्वेस्टेशन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद लेणी.
- रेल्वेस्टेशन ते टीव्ही सेंटर व्हाया कर्णपुरा, छावणी, घाटी, आमखास मैदान, सुभेदारी विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, गणेश कॉलनी, सलीम अली उद्यान.
- पैठण बसस्थानक ते जायकवाडी प्रकल्प- संत एकनाथ मंदिर-संत ज्ञानेश्वर उद्यान.
- खुलताबाद बसस्थानक ते घृष्णेश्वर मंदिर- वेरूळ लेणी.
इतर काही महत्त्वाचे निर्णय
- रिक्षा, टॅक्सीमध्ये परवानाधारक, चालकाची माहिती प्रदर्शित करणे बंधनकारक.
- आरटीओ कार्यालय रिक्षा, टॅक्सींसाठी क्यूआर क ोड स्टिकर तयार करणार.
- विमानतळावर कुलकॅबच्या परमिटसाठी कार्यालयाची अट शिथिल.