औरंगाबादच्या कचराकोंडीवर चर्चा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:28 AM2018-07-21T00:28:19+5:302018-07-21T00:29:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी झालेल्या कचराकांडानंतर आणि कचराकोंडीवरून शहराची प्रतिष्ठा गेल्यानंतरही हा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने ...

Discussed at the garbage dump at Aurangabad | औरंगाबादच्या कचराकोंडीवर चर्चा ठप्प

औरंगाबादच्या कचराकोंडीवर चर्चा ठप्प

googlenewsNext
ठळक मुद्देप्रश्न सोडविण्याबाबत सेना-भाजपची चुप्पी : विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त जबाबदार असल्याचा ठपका; शिवसेनेचा ‘एकला चलो रे’चा मार्ग; ...तर भाजपला अवघड जाईल-महापौरांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी झालेल्या कचराकांडानंतर आणि कचराकोंडीवरून शहराची प्रतिष्ठा गेल्यानंतरही हा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने शनिवारी शिवसेना आणि भाजपकडून एकही कृती किंवा वक्तव्य समोर आलेले नाही. याउलट दोन्ही पक्ष ‘घाणेरड्या’ राजकारणात आपली बाजूृ कशी ‘सेफ’ राहील याची काळजी घेत असल्याचे दिसले. निव्वळ आरोप प्रत्यारोप होताना दिसले. कचराकोंडी फोडण्यासंदर्भात कोणतीच चर्चा झाली नाही किंवा पाऊल उचलले गेले नाही. शिवसेनेने तर कचरा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी स्पष्टपणे झटकल्याचे दिसते. पक्षाचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी कचरा प्रश्नाची जबाबदारी विभागीय समितीवर असल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी आपले अपयश लपविण्यासाठी आंदोलनाला वेगळेच वळण देत गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला. याचवेळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी कचºयाच्या जबाबदारीतून भाजप अंग काढून घेऊ शकत नाही, असे सांगितले. उद्यापासून (शनिवार) महापालिकेत ‘एकला चलो रे’ धोरण अवलंबले जाईल, असा इशारा देत भाजपवर तोफ डागली. शुक्रवारी शिवसेनेविरुध्द आक्रमक झालेल्या भाजपने शनिवारी आपल्या वतीने कोणतीच प्रतिक्रिया न देता कचराप्रश्नी आपल्याला काही देणे-घेणे नसल्याचे दाखवून दिले. कचºयाच्या मुद्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये आगामी काळात संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
आंदोलनाचे घोसाळकरांकडून जोरदार समर्थन
शहरातील कचरा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी आज शिवसेनेने स्पष्टपणे झटकल्याचे दिसले. शनिवारी दुपारी सेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी महापौैर दालनात पत्रकार परिषद घेतली.
यावेळी त्यांनी सेनेच्या आंदोलनाचे जोरदार समर्थन केले. ते म्हणाले की, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना कचरा प्रश्नात आपली जबाबदारी अजिबात झटकता येणार नाही. आपले अपयश झाकण्यासाठी शिवसेनेला टार्गेट करणे अतिशय चुकीचे आहे. अधिकाºयांनी आपल्या मर्यादेत राहून काम करावे, राजकीय व्यक्तीप्रमाणे उचलली जीभ अन् लावली टाळ्याला याप्रमाणे करू नये. शहरातील कचराकोंडीला शासनाने नेमलेली कचरा संनियंत्रण समितीच जबाबदार असल्याचा आरोप सेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी केला. महापालिकेत मित्रपक्ष असलेल्या भाजपनेही आरोप करण्यापेक्षा खांद्याला खांदा लावून काम करावे, असा सल्ला त्यांनी दिला.
शहरातील कचरा कन्नड तालुक्यातील पिशोर येथे नेला जात असताना तो ‘आदेश’ देऊन थांबविण्यात आला. हा आदेश कोणी दिला, हे चव्हाट्यावर येताच शिवसेना बरीच बॅकफूटवर आली आहे. कचरा प्रश्न अंगलट येताच सेनेने गुरुवारी जिल्हा कचेरीच्या आवारात कचरा आणून टाकला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सेनेच्या पदाधिकाºयांवर राष्टÑध्वजाचा अवमान केल्याचे गुन्हे नोंद केले.
गुन्हे मागे घेण्याची मागणी
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करताना लावलेली चुकीची कलमे काढून टाकावीत, अशी मागणी करणारे निवेदन पक्षाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी पोलीस आयुक्तांना दिले. या शिष्टमंडळात संपर्क नेते विनोद घोसाळकर, महापौर नंदकुमार घोडेले, मनपा स्थायी समिती सभापती राजू वैद्य, माजी आ. प्रदीप जैस्वाल, सभागृहनेता विकास जैन, नगरसेवक राजेंद्र जंजाळ, नगरसेविका सीमा खरात यांच्यासह महिला पदाधिकाºयांची उपस्थिती होती.
पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी शिष्टमंडळाला कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. मात्र, या प्रकरणी पारदर्शकपणे कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या गुन्ह्याचा तपास संबंधित ठाण्याचे अधिकारी करीत असून, त्यांना योग्य त्या सूचना दिल्या जातील, असेही ते म्हणाले.
भाजपवर घोडेलेंचा हल्लाबोल
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विविध राजकीय पक्षांकडून कचरा प्रश्नावर महापालिकेवर हल्लाबोल चढविण्यात येत आहे. कचरा प्रश्न सोडविण्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे. येणाºया काही दिवसांमध्ये हा प्रश्न कायमस्वरूपी सुटणारच आहे. महापालिकेतील मित्रपक्ष भाजप जबाबदारी झटकू शकत नाही. उद्यापासून आम्हीसुद्धा सत्ताधारी म्हणून ‘एकला चलो रे’ धोरण अवलंबले, तर भाजपला खूप अवघड जाईल, असा इशारा महापौर नंदकुमार घोडेले यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. महापालिकेच्या सत्तेत गेल्या २७ वर्षांपासून भाजपची भागीदारी आहे. महापालिकेच्या यश-अपयशामध्ये भाजपचाही तेवढाच वाटा आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Web Title: Discussed at the garbage dump at Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.