औरंगाबाद शहरातील २४ हजार मालमत्तांचा झाला सर्व्हे; राजकीय साथ मिळाल्यास मनपास ३०० कोटी मिळणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 01:54 PM2018-07-09T13:54:01+5:302018-07-09T13:55:20+5:30

शहरातील मालमत्ता सर्वेक्षणावर १० ते १२ कोटी रुपये खर्च करण्याऐवजी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मनपा आणि आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांकडून दीड महिन्यापूर्वी मालमत्ता सर्वेक्षण सुरू केले.

Aurangabad city has surplus assets of 24 thousand; If get political support then Municipality will get Rs 300 crore | औरंगाबाद शहरातील २४ हजार मालमत्तांचा झाला सर्व्हे; राजकीय साथ मिळाल्यास मनपास ३०० कोटी मिळणार 

औरंगाबाद शहरातील २४ हजार मालमत्तांचा झाला सर्व्हे; राजकीय साथ मिळाल्यास मनपास ३०० कोटी मिळणार 

googlenewsNext
ठळक मुद्दे५ जून ते ७ जुलैपर्यंत शहरातील तब्बल २४ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.सर्वेक्षण झालेल्या मालमत्तांना नवीन कर लावण्याचे आव्हान मनपासमोर राहणार आहे.

औरंगाबाद : शहरातील मालमत्ता सर्वेक्षणावर १० ते १२ कोटी रुपये खर्च करण्याऐवजी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मनपा आणि आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांकडून दीड महिन्यापूर्वी मालमत्ता सर्वेक्षण सुरू केले. ५ जून ते ७ जुलैपर्यंत शहरातील तब्बल २४ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षण झालेल्या मालमत्तांना नवीन कर लावण्याचे आव्हान मनपासमोर राहणार आहे. राजकीय मंडळींनी या प्रक्रियेला साथ दिल्यास मालमत्ता करातून मनपाला दरवर्षी तब्बल ३०० कोटी रुपये प्राप्त होऊ शकतात.

मागील तीन दशकांत मनपाने मालमत्तांचे सर्वेक्षणच केलेले नाही. नगर परिषदेने, महापालिकेने जुन्या घराला लावलेला कर आजही सुरू आहे. या घराच्या जागेवर आज टोलेजंग इमारत उभी आहे. या नवीन इमारतीला महापालिकेने करच लावलेला नाही. त्यामुळे दरवर्षी प्रशासनाने मालमत्ता कर वसुलीसाठी कितीही प्रयत्न केले तर ८० कोटींपेक्षा एक रुपयाही जास्त वसूल होत नाही. यंदा राजकीय मंडळींनी मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ३५० कोटी दिले आहे. आतापर्यंत ३० कोटी रुपये वसूल झाले आहेत. मालमत्ता कर महापालिकेचा मोठा आर्थिक कणा आहे. हा कणाच पूर्णपणे मोडकळीस आलेला आहे. त्यामुळे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शंभर टक्के  सर्वेक्षणाचा निर्णय घेतला.

३२ दिवसांत २४ हजार ५०२ मालमत्तांचे सर्वेक्षण

५ जूनपासून कंत्राटी आणि मनपाच्या २६९ कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली. यासाठी वार्डनिहाय पथक तयार करण्यात आले आहे. पथक घरोघरी जाऊन मालमत्तांची मोजणी करीत आहे. प्रत्येक पथकाला दररोज २० मालमत्तांची मोजणी करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. 
मालमत्ताधारकांकडून घेण्यात आलेल्या कागदपत्रांचे त्याच दिवशी स्कॅनिंग केले जात आहे. सुरुवातीला रमजान महिना असल्याने ७ हजार ८१० मालमत्तांची मोजणी झाली. त्यानंतरच्या पंधरा दिवसांत पथकांनी जोमाने काम केल्याचे दिसून येत आहे. ५ जुलैपर्यंत १२ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतरच्या दोनच दिवसांत साडेचार हजार मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले. ३२ दिवसांत २४ हजार ५०२ मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. रोजची आकडेवारी आयुक्तांकडून तपासली जात आहे. आयुक्तांचा या मोहिमेवर वॉच असल्याने पथके जबाबदारीने काम करीत आहेत. 

पुन्हा सर्वेक्षणाची वेळच नको
इमारतीत फेरबदल, पाणीपट्टीसाठी पुन्हा सर्वेक्षणाची वेळ यायला नको म्हणून याच सर्वेक्षणात महापालिका मालमत्ताधारकांकडे कोणकोणत्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत, याचीही माहिती घेत आहेत. नळ एक आहे का दोन, बांधकामात बदल झालेला आहे का? अशा मालमत्तांची वेगळी नोंद केली जात आहे. बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र घेतलेले आहे का? याचीही नोंद सर्वेक्षणाच्या अर्जात घेतली जात आहे. 

सर्वेक्षणाचे प्रभागनिहाय आकडे
  प्रभाग-१  : २,५३२
  प्रभाग-२  : २,७३०
  प्रभाग-३  : १,४३८
  प्रभाग-४  : २,७६०
  प्रभाग-५  : २,६८६
  प्रभाग-६  : ३,२९३
  प्रभाग-७  : ३,६०९
  प्रभाग-८  : ३,०२३
  प्रभाग-९  : २,४३१
  एकूण     : २४,५०२

Web Title: Aurangabad city has surplus assets of 24 thousand; If get political support then Municipality will get Rs 300 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.