मराठवाडा साहित्य परिषदेचे विशेष वाङ्मय पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 09:58 PM2018-02-24T21:58:16+5:302018-02-24T21:59:48+5:30
मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे यशवंतराव चव्हाण व नटवर्य लोटू पाटील यांच्या नावे दिल्या जाणार्या विशेष वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, ज्येष्ठ साहित्यिक व ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार, रंगकर्मी डॉ. दिलीप घारे आणि प्रा. यशवंत देशमुख यंदाचे मानकरी ठरले आहेत.
औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे यशवंतराव चव्हाण व नटवर्य लोटू पाटील यांच्या नावे दिल्या जाणार्या विशेष वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, ज्येष्ठ साहित्यिक व ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार, रंगकर्मी डॉ. दिलीप घारे आणि प्रा. यशवंत देशमुख यंदाचे मानकरी ठरले आहेत.
यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान होईल, अशी माहिती ‘मसाप’चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली. मराठीतील चरित्र, आत्मचरित्र किंवा राजकीय स्वरूपाचे लेखन करणार्या साहित्यिकास यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार देण्यात येतो. प्रा. द्वादशीवार यांनी कविता, कादंबरी, ललित निबंध, राजकीय लेख, व्यक्तीचित्रे अशा विविध वाङ्मय प्रकारांत विपूल आणि सकस लेखन केलेले आहे. १९६२ पासून ते पत्रकारितेच्या क्षेत्रात असून, गेली २१ वर्षे ते ‘लोकमत’मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहेत. ते मराठी साहित्य महामंडळाचे पाच वर्षे आणि विदर्भ साहित्य संघाचे सहा वर्षे अध्यक्ष होते.
दीर्घकाळ रंगभूमीची सेवा करणारे रंगकर्मी अभिनेते व दिग्दर्शक डॉ. दिलीप घारे आणि प्रा. यशवंत देशमुख या दोघांना नटवर्य लोटू पाटील नाट्यपुरस्कार विभागून देण्यात येणार आहे. मराठवाड्यातील नाट्यविश्वाला नवे रूप देण्याबरोबरच रसिकांमध्ये नवअभिरुची निर्माण करण्यामध्ये दोघांचे मोठे योगदान आहे. त्यांनी ‘अंधयुग’, ‘अंमलदार’, ‘दुसरा सामना’, ‘सूर राहू दे’, ‘अश्वमेध’, महानिर्वाण, गुड बाय डॉक्टर इ. नाटके आणि गाजराची पुंगी, गाढवाचं लग्न, अंधेर नगरी ही वगनाट्ये केली आहेत. अकरा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मसापच्या सभागृहात १२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती कार्यवाह डॉ. दादा गोरे यांनी दिली.