औरंगाबादच्या १९ लाख मतदारांच्या बोटावर लागणार ९३ लिटर शाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 05:10 PM2019-04-16T17:10:10+5:302019-04-16T17:11:41+5:30

शाईच्या ३ लाख बाटल्या महाराष्ट्रात आणण्यात आल्या आहेत.

93 liters ink will be required for the 19 lakh voters in Aurangabad | औरंगाबादच्या १९ लाख मतदारांच्या बोटावर लागणार ९३ लिटर शाई 

औरंगाबादच्या १९ लाख मतदारांच्या बोटावर लागणार ९३ लिटर शाई 

googlenewsNext

- प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे. मतदान केल्याची खूण म्हणून मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर (बोटावर) शाई लावण्यात येते. अशा शाईच्या ३ लाख बाटल्या महाराष्ट्रात आणण्यात आल्या आहेत. त्यातील ९२९२ बाटल्या औरंगाबाद मतदारसंघासाठी पाठविण्यात आल्या आहेत. येथील १८ लाख ८४ हजार ८६५ मतदारांच्या तर्जनीवर मिळून ९३ लिटर शाईचा वापर करण्यात येणार आहे.

जसजशी मतदानाची २३ एप्रिल तारीख जवळ येत आहे. तसतसे जिल्हा प्रशासनाचा निवडणूक विभाग वेगवान होत आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असणारे बहुतांश साहित्य प्रशासनाला प्राप्त झाले आहे. या असंख्य साहित्यापैकी महत्त्वाची म्हणजे शाई होय. मतदान केल्यानंतर मतदाराच्या तर्जनीवर निळी शाई लावण्यात येते. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात १८ लाख ८४ हजार ८६५ मतदार आहेत. तसेच ३०३७ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक बुथवर दोन शाईच्या बाटल्या ठेवण्यात येणार आहेत. एका बाटलीमध्ये १० मिली निळी शाई असते. या एका बाटलीमधून किमान ३५० मतदारांच्या तर्जनीवर निळ्या शाईचे निशाण लावण्यात येईल. अधिकाऱ्यांनी सांगितले की, २००४ च्या निवडणुकीवेळी मतदान करणाऱ्या मतदाराच्या बोटावर केवळ एक ठिपका निळ्या शाईचा लावण्यात येत होता. मात्र, २००६ मध्ये निवडणूक आयोगाने ठिपक्याऐवजी सरळ रेषा आखण्याचे निर्देश दिले. त्यामुळे शाई जास्त लागत आहे.

तर्जनीवर शाई 
मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. जर तर्जनीवर आधीच शाई लागलेली असेल तर त्या मतदाराला मतदान करू दिले जात नाही.

म्हैसूरची शाई
संपूर्ण देशात मतदानाच्या वेळी म्हैसूरची शाई वापरण्यात येते. येथील एका वॉर्निश कंपनीमध्ये ती तयार होते. या कंपनीपासून जगातील २५ देशांना निवडणूक शाईचा पुरवठा केला जातो. ही शाई तर्जनीवर लावल्यानंतर अजिबात पुसता येत नाही, अशी ख्याती या शाईची आहे. देशात सर्वप्रथम १९६२ च्या लोकसभा निवडणुकीत शाईचा वापर करण्यात आला होता.

Web Title: 93 liters ink will be required for the 19 lakh voters in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.