३८ लाख लिटरने वाढणार वडाळी तलावाचा जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 01:23 AM2019-06-16T01:23:39+5:302019-06-16T01:24:11+5:30

ब्रिटिश काळात अमरावती व बडनेराच्या पाणीपुरवठ्यासाठी १९४२ मध्ये बांधण्यात आलेला व शहराचे वैभव असलेला वडाळी तलाव यंदा कोरडा पडला. ही धोक्याची घंटा गृहीत धरून महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी जलजागृतीसाठी नियोजन आखले व अवघ्या दहा दिवसांत वडाळी तलावातीन १२ हजार ६०० चौरस मीटर गाळ लोकसहभागातून काढण्यात आला.

Wadali lake water storage will increase by 38 lakh liters | ३८ लाख लिटरने वाढणार वडाळी तलावाचा जलसाठा

३८ लाख लिटरने वाढणार वडाळी तलावाचा जलसाठा

Next
ठळक मुद्देमहापालिका आयुक्तांचे ‘साथी हात बढाना’ । सामूहिक प्रयत्न, लोकसहभागातून जलजागृती

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ब्रिटिश काळात अमरावती व बडनेराच्या पाणीपुरवठ्यासाठी १९४२ मध्ये बांधण्यात आलेला व शहराचे वैभव असलेला वडाळी तलाव यंदा कोरडा पडला. ही धोक्याची घंटा गृहीत धरून महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी जलजागृतीसाठी नियोजन आखले व अवघ्या दहा दिवसांत वडाळी तलावातीन १२ हजार ६०० चौरस मीटर गाळ लोकसहभागातून काढण्यात आला. यामुळे किमान ३७ लाख ८० हजार लिटरने जलसाठा वाढणार आहे. शासनाचा कुठलाही निधी न वापरता जलजागृतीमधून आयुक्तांनी ही किमया साधली.
वडाळीला गतवैभव प्राप्त व्हावे, याकामी आयुक्त निपाणे यांनी पुढाकार घेऊन महापालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने दोन दिवस सामूहिक श्रमदान ही कल्पना साकारली. याला अमरावतीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. बघता बघता श्रमदानाची ही लोकचळवळ बनली व फक्त दहा दिवसांत १ हजार ७ ट्रक गाळ तलावातून काढण्यात आला. यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख, महापौर सुनील नरवणे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह सर्व पदाधिकारी, नगरसेवक व सामाजिक संघटना, डॉक्टर मंडळी आदी या लोकचळवळीत हिरीरीने सहभाग नोंदविला. राज्य राखीव पोलीस दलाचे अधिकारी, जवानदेखील यामध्ये सहभागी झाले. आयुक्तांच्या आवाहनावरून महापालिका कंत्राटदार असोसिएशन, क्रेडाई, एमआयडीसी असोसिएशन, महानेट, नीलेश चौरसिया, विजय खंडेलवार, रूपचंद खंडेलवाल आदींनी जेसीबी, ट्रक उपलब्ध करून दिले. शहरातील दोन हजारांवर नागरिक स्वयंस्फूर्तीने या उपक्रमात सहभागी झालेत.
महापालिकेच्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयाच्या घरी शोषखड्डा व रेन वॉटर हार्वेस्टिंग असले पाहिजे, यासाठी आयुक्त आग्रही आहेत. सर्वप्रथम त्यांनीच स्वत:च्या शासकीय निवासस्थानी ही यंत्रणा उभारली. सद्यास्थितीत महापालिकेच्या २३ अधिकारी व २२४ कर्मचाऱ्यांकडे जलपुनर्भरणासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले. याशिवाय महापालिकेची आठ कार्यालये, उद्याने, महापालिकेची मैदाने, रस्त्यांच्या कडेला, कंत्राटदारांमार्फत, महापालिका क्षेत्रात क्रेर्डामार्फत सदनिका, महापालिकेच्या शाळा, दवाखाने व सर्व आरओ प्लांट आदी ८०० हून अधिक ठिकाणी पाण्याचे पुनर्भरण होणार आहे.
विशेष म्हणजे, उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्यासह सर्वच अधिकाºयांनीदेखील या कामासाठी पुढाकार घेतला.

असा वाढणार जलस्तर
दहा दिवसांत १३ जेसीबीच्या साहाय्याने १२,६०० चौरस मीटर जागेतून ३७८० घनमीटर म्हणजेच ४०,६७३ घनफूट गाळ काढण्यात आला व हा गाळ २५ ट्रकच्या साहाय्याने नेण्यात आला. १००७ ट्रक गाळ फक्त दहा दिवसांत काढण्यात आला. यामुळे ३७,८०,००० लिटर पाणीसाठा वाढण्याची अपेक्षा आहे. तलावाच्या दोन किमी परिसरातील पाणीपातळी वाढणार आहे. महापालिकेचा निधी खर्च न करता लोकसहभागातून हे साध्य झाल्याचे आयुक्त संजय निपाणे म्हणाले.

सन १९४२ मध्ये वडाळी तलावाची निर्मिती
ब्रिटिश काळात सन १९४२ मध्ये या तलावाची निर्मिती अमरावती व बडनेराच्या जलापूर्तीसाठी करण्यात आली. वडाळीचे पाणीसंरक्षण क्षेत्र ११ चौरस किमी व पाणीसाठा आठ चौरस किमी आहे. त्यावेळी तलावाची खोली ही ३० फूट होती. १९७४ मध्ये तलावाचे सौदर्यीकरण करण्यात आले. यामध्ये गार्डन बोटिंग, परदेशी व देशी पक्ष्यांसाठी विसावा केंद्र, टॉय ट्रेन आदींची निर्मिती करण्यात आल्याने वडाळी तलाव शहराचे आकर्षणाचे केंद्र बनले. १९९४ पासून अमरावती शहरास मजीप्रामार्फत ऊर्ध्व वर्धा धरणातून पाणीपुरवठा सुरू झाल्याने शहराचा महत्त्वाचा जलस्रोत असलेला वडाळी तलाव दुर्लक्षित झाला होता.

Web Title: Wadali lake water storage will increase by 38 lakh liters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी