धक्कादायक; भूजलपातळीत १८ फुटांपर्यंत तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 10:09 PM2019-02-17T22:09:20+5:302019-02-17T22:10:37+5:30

भूजल पुनर्भरण होण्याच्या काळात पावसात खंड राहिल्याने पाण्याच उपसा झाला. परिणामी जिल्ह्यातील पाण्याची पातळी मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत यंदा १८ फुटांपर्यंत घटली आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यात सर्वाधिक ५.९८ मीटरने भूजलात घट झाली.

Shocking Groundwater deficit of 18 feet | धक्कादायक; भूजलपातळीत १८ फुटांपर्यंत तूट

धक्कादायक; भूजलपातळीत १८ फुटांपर्यंत तूट

Next
ठळक मुद्देसर्वच तालुके माघारले : अचलपुरात सर्वाधिक सहा मीटर, चांदूरबाजार तालुक्यात ४.१७ मीटरने तूट

गजानन मोहोड।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भूजल पुनर्भरण होण्याच्या काळात पावसात खंड राहिल्याने पाण्याच उपसा झाला. परिणामी जिल्ह्यातील पाण्याची पातळी मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत यंदा १८ फुटांपर्यंत घटली आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यात सर्वाधिक ५.९८ मीटरने भूजलात घट झाली. सलग तीन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी होत असल्याने भूजलात मोठ्या प्रमाणात तूट अपेक्षित आहे. मात्र, या तीन वर्षांत जवळपास १२ हजारांवर जलयुक्तची कामे झालीत. परिणामी भूजलातील घट काही प्रमाणात रोखली गेल्याचे वास्तवदेखील नाकारता येत नाही.
पावसाळ्यात सरासरीपेक्षा २६ टक्क्यांनी पाऊस कमी झाल्याचे परिणाम जाणवायला लागले आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने सर्वच तालुक्यातील १७० निरीक्षण विहिरींतील पाण्याच्या स्थिर पातळीचे जानेवारीअखेर केलेल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार, सर्वच तालुक्यांमध्ये भूजलात घट झाल्याची बाब स्पष्ट झालेली आहे. भूजल पातळीमधील तूट दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यातील ८० गावांना मार्चपर्यंत, तर एप्रिल ते जून २०१८ या कालावधीत ११ तालुक्यांतील १२९ गावांत भीषण पाणीटंचाई राहणार राहण्याची शक्यता आहे.
जिल्ह्याचा ७५ टक्के भूभाग बसॉल्ट खडकाचा व २५ टक्के पूर्णा नदीच्या गाळाने व्यापला असल्याने सरासरी १० ते १२ मीटरपर्यंतची खोली भूजल पुर्नभरणास योग्य आहे. यंदा सरासरी २६ टक्क्यांनी पाऊस कमी झाल्याने अपेक्षित पुनर्भरण झालेले नाही. लघुपाणलोट क्षेत्रातील (रनआॅफ झोन) निरीक्षण विहिरींतील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ मधील आठ (१) च्या तरतुदीनुसार या गावांमध्ये पिण्याचे पाण्याचे स्रोत संरक्षित करण्यासाठी कार्यवाही होणे आवश्यक असल्याचा अहवाल यापूर्वीच भूजल विभागाने जिल्हा प्रशासनाला दिलेला आहे.
चिखलदरा, धारणी तालुक्यांतील गावे डोंगराळ भागात आहेत. येथे भूस्तर जलग्रहण क्षमता कमी असल्याने भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. वरूड व मोर्शी तालुक्याचा भाग अतिविकसित पाणलोट क्षेत्रात असल्याने व येथे बारमाही सिंचन जास्त प्रमाणात असल्याने विहिरी व विंधन विहिरीद्वारे भूजलाचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. भूजलसाठा झपाट्याने कमी होत असल्याने जिल्हा प्रशासनाला उपशावर निर्बंध आणावे लागणार असल्याचे वास्तव आहे.
जलयुक्तचा परिणाम; गतवर्षीच्या तुलनेत ०.३७ ने तूट
सन २०१७ मध्ये जिल्ह्यात ८१४.१९ मिमी पाऊस झालेला होता. त्याच्या तुलनेत सन २०१८ मध्ये ५४६.३० मिमी पाऊस झाला. म्हणजेच जिल्ह्यात २०१७ च्या तुलनेत २६८.१८ मिमी पाऊस कमी झालेला आहे. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे जानेवारी २०१७ अखेर नोंदविलेल्या निरीक्षणानुसार जिल्ह्यात सरासरी ८.५३ मीटरवर भूजल पातळी होती. त्याच्या तुलनेत यंदा जानेवारीअखेर ८.९ मीटरवर सरासरी भूजल पातळी आहे. यामध्ये केवळ ०.३७ मीटरचा फरक असल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा भूजलात फारसी तूट झालेली नाही. उलट गतवर्षीच्या तुलनेत पाऊस अतिशय कमी झाला आहे. भूवैज्ञानिक उल्हास बंड यांच्या माहितीनुसार, जलयुक्तच्या कामांमुळे जिल्ह्यात पुनर्भरण होत आहे. त्यामुळे यंदा अधिक तूट नाही, तर पातळी स्थिर आहे.
पाणलोट क्षेत्रात नव्या विहिरीस मनाई
वरूड व मोर्शी हे तालुके अतिविकसित पाणलोट क्षेत्रात आहेत. या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उपसा होत असल्याने, येथील भूजल उपशावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. या पाणलोट क्षेत्रात नवीन विहीर खोदण्यास महाराष्ट्र भूजल (विकास आणि व्यवस्थापन) अधिनियम २००८ मधील ८(१) तरतुदीनुसार बंदी घालणे आवश्यक असल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविलेला आहे.

भूजलाचे पुनर्भरण होण्याच्या काळात पावसाचा प्रदीर्घ खंड राहिला व शेतीपिकांसाठी पाण्याचा उपसा झाल्याने भूजलपातळीत कमी आली. सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी झाला असतानाही जलयुक्तच्या कामांमुळे भूजलात गतवर्षीच्या तुलनेत स्थिरता आहे.
-उल्हास बंड
भूवैज्ञानिक, जीएसडीए

Web Title: Shocking Groundwater deficit of 18 feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.