अमरावतीत मासिक पाळीसंदर्भात विद्यार्थिनींमध्ये जनजागृती, मार्गदर्शन वर्गाचं आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 04:11 PM2017-12-16T16:11:16+5:302017-12-16T16:12:19+5:30
मुली मोठ्या होत असताना त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. विशेषत: मासिक पाळीच्या दिवसांत मुली लाजेपोटी चार दिवस शाळेत येत नाहीत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते.
अमरावती- मुली मोठ्या होत असताना त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. विशेषत: मासिक पाळीच्या दिवसांत मुली लाजेपोटी चार दिवस शाळेत येत नाहीत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. तसेच आपल्या बाह्य अवयवात होणारा बदल पाहून घाबरून न जाता मनात येणाऱ्या प्रश्नांचे उत्तर आपल्या आईला, बहिणीला किंवा आपल्या शिक्षिकेंना विचारावे. मासिक पाळी येणे ही स्त्रीत्वाची निशाणी आहे. ती नैसर्गिक गोष्ट आहे, असे प्रतिपादन मुख्याध्यापिका ज्योत्स्ना शेटे यांनी केले.
भातकुली पंचायत समितीच्या पूर्व माध्यमिक शाळा दाढी येथे विद्यार्थिनींसाठी ‘मासिक पाळीत घ्यावयाची काळजी’ यावर उद्बोधन वर्ग घेण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मार्गदर्शन करीत होत्या. ज्योत्स्ना शेटे म्हणाल्या, मुलींचा जन्म फक्त चूल व मूल यापुरताच मर्यादित नाही. तुम्हाला खूप शिकून आपल्या पायावर उभे राहायचे आहे. तेव्हा शारीरिक मजबुतीसोबत मानसिक ताकद किती आवश्यक आहे, तेही समजावून घेतले पाहिजे. स्वत:चे रक्षण वाईट प्रवृत्तीपासून कसे करावे, याबद्दलही ज्योत्स्ना शेटे यांनी माहिती दिली.
याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका ज्योती गायकी, पुष्पलता वसुकर, सुरेखा अटाळकर यांनी मुलींनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे ते समजावून सांगितले. उपस्थितांचे आभार ज्योती गायकी यांनी मानले.
शिक्षिका म्हणाल्या, आम्ही तुमच्या मैत्रिणीच
यावेळी मुलींना सॅनेटरी नॅपकीनचे वाटप करून त्याचा वापर कसा केला पाहिजे, ते समजावून सांगितले. ज्योती गायकी, अटाळकर यांनी शारीरिक व मानसिक बदल याची माहिती चर्चेद्वारे समाजवून दिली. आम्ही तुमच्या मैत्रिणी आहोत, असे शिक्षिकांनी सांगताच मुलींना आनंद झाला. अन् अनेक समस्यांची माहिती जाणून घेतली. त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात आले. यामुळे मुलींच्या मनावर असलेले दडपण कमी झाल्याचे समाधान झळकत होते.