-अखेर भाऊसाहेबांना सन्मान; प्रतिमा ठेवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 10:02 PM2017-12-18T22:02:20+5:302017-12-18T22:03:36+5:30
राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाºया शिक्षणाची वारी' कार्यक्रमाचा सोमवारी सायंकाळी समारोप झाला.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या शिक्षणाची वारी' कार्यक्रमाचा सोमवारी सायंकाळी समारोप झाला. मात्र, सोमवारी सकाळीच कार्यक्रमस्थळी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची प्रतिमा लावून पूजन करण्यात आले. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते.
अमरावती, नागपूर विभागातील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाची सुलभ पद्धत अवगत व्हावी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीस चालना मिळावी, या उद्देशाने पुणे शिक्षण मंडळातर्फे 'शिक्षणाची वारी' उपक्रम राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मंत्रालयातून कार्यक्रमाचे नियोजन चार भागात झाले. पहिला कार्यक्रम लातूर येथे राबविण्यात आला. दुसरा अमरावती येथे, तर तिसरी वारी रत्नागिरीला ११, १२ व १३ जानेवारी रोजी, तर चौथी शिक्षणाची वारी नाशिक येथे फेब्रुवारीमध्ये होणार आहे. या वारीला विदर्भातील ११ जिल्ह्यातील ९०० शिक्षकांनी भेटी देण्याचे प्रयोजन केले होते. त्यामध्ये शनिवारी नागपूर विभागातील शिक्षक, रविवारी यवतमाळ, अमरावती व अकोला आणि सोमवारी वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील शिक्षकांना भेटी देण्याचे सुचविले होते. परंतु तीन दिवसांत १२ हजार शिक्षक व पालकांनी या वारीला भेट दिल्याची माहिती अधिव्याख्याता प्रादेशिक विद्या प्राधिकरणचे सहा. समन्वयक प्रवीण राठोड यांनी दिली.
विद्यार्जनाकरिता नवीन ऊर्जा प्राप्त झाली
राज्य शासनाने आयोजित केलेल्या 'शिक्षणाची वारी' कार्यक्रमात सहभागी झालेल्या शिक्षकांकडून विविध शैक्षणिक क्लृप्त्या, संकल्पना आत्मसात करता आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यार्जनास नवीन ऊर्जा मिळाली. या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना निश्चितच लाभ होईल, असा विश्वास विहिगाव येथील उर्दू शाळेचे मुख्याध्यापक मिर्झा यांनी व्यक्त केला.
अवघ्या तीन महिन्यांत विद्यार्थी वाचू लागेल
जिल्ह्यातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्यापही वाचता येत नसल्याचे वरिष्ठांच्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या उपक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या सुलभ वाचन पद्धतीमुळे शंभर टक्के विद्यार्थी अवघ्या तीन महिन्यांत नीट वाचू शकेल, असा विश्वास 'शिक्षणाची वारी'चे सनियंत्रक, शिक्षण उपसंचालक सी.आर. राठोड, समन्वयक, डायटचे प्राचार्य रवींद्र आंबेकर यांनी व्यक्त केला.