अमरावती जिल्ह्यात १४ व्या शतकातील महिमापूरची देखणी पायविहीर दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:43 PM2018-06-22T12:43:35+5:302018-06-22T12:43:44+5:30

आश्चर्याने तोंडात बोटे जावीत अशी स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना असलेली, औरस-चौरस भव्य ऐतिहासिक पायविहीर दर्यापूर तालुक्यातील महिमापूर या इवल्याशा गावात १४ व्या शतकापासून आजही दिमाखात उभी आहे.

14th Century well neglected at Mahimpur In the Amravati district | अमरावती जिल्ह्यात १४ व्या शतकातील महिमापूरची देखणी पायविहीर दुर्लक्षित

अमरावती जिल्ह्यात १४ व्या शतकातील महिमापूरची देखणी पायविहीर दुर्लक्षित

googlenewsNext
ठळक मुद्देस्थापत्यकलेचा अप्रतिम नमुनाराज्याच्या संरक्षित स्मारकांच्या यादीत स्थान

गणेश देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: आश्चर्याने तोंडात बोटे जावीत अशी स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना असलेली, औरस-चौरस भव्य ऐतिहासिक पायविहीर दर्यापूर तालुक्यातील महिमापूर या इवल्याशा गावात १४ व्या शतकापासून आजही दिमाखात उभी आहे. तथापि, महाराष्ट्र राज्याची संपत्ती आणि अमरावती जिल्ह्याचे वैभव असलेल्या या विहिरीकडे शासनाने सातत्याने केलेले दुर्लक्षही विहिरीइतकेच आश्चर्यकारक आहे.

अशी आहे रचना
संपूर्ण बांधकाम दगडाचे. आकार चौकोनी. खोली ८० फूट. रुंदी ४० मीटर बाय २५ मीटर. विहिरीत उतरण्यासाठी ८५ प्रशस्त पायऱ्या. पायऱ्यांच्या मार्गावर किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमान कमानी. प्रवेशद्वारावर दगडात कोरलेली दोन लक्षवेधी पुष्पे. पायऱ्यांमध्ये क्षणिक विसाव्यासाठी टप्पे. आत शिरल्यावर विहिरीच्या चारही बाजूंनी फिरता येईल, बसता येईल अशी व्यवस्था. बांधकाम संपल्यावर तळाशी चहुबाजूंनी ओट्यासमान रचना. आतमध्ये दोन कोरीव ध्यानस्थ मूर्ती.

विहिरीचा इतिहास

१४४६ ते १५९० या १४४ वर्षांच्या कालखंडात बहामणी साम्राज्याच्या पाच पातशाही होत्या. अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदीलशाही, हैदराबादची कुतूबशाही, बिदरची बरीदशाही आणि अचलपूरची इमादशाही, अशा त्या पाच पातशाही होत. अचलपूरच्या इमादशाहीचे संस्थापक फते इमाद उल मुल्क हे होते. फते इमाद उल मुल्क यांनी आरंभीच्या काळात भरमसाठ बांधकामे केलीत. ठळक बांधकामात चिखलदऱ्यातील दोन मशिदी, गाविलगड किल्ल्याचा परकोट, परतवाड्यातील हौद कटोरा ही उदाहरणे देता येतील. महिमापूरची विहीरही त्याच काळातील, असल्याचा निष्कर्ष इतिहास संशोधक अनिरुद्ध पाटील यांनी ठामपणे व्यक्त केला.

या रचना कालौघात नष्ट
जमिनीपासून तीन-चार फूट उंचीपासून विहिरीच्या तळापर्यंतचे बांधकाम आजघडीला बघता येत असले तरी त्याशिवाय कालौघात नष्ट झालेली इतर अनेक वैशिष्ट्ये या विहिरीत होती, हे 'लोकमत'च्या शोधमोहिमेतून पुढे आले. पूर्वी या विहिरीवर दोन मजल्यांचे बांधकाम होते. पाहणाऱ्याला ही विहीर असल्याचे लक्षातच येणार नाही, अशी त्या बांधकामाची रचना होती. ते प्रमुख वैशिष्ट्यही होते. वरील दोन मजले पडल्यामुळे आता विहिरीच्या आतील बांधकाम वरून बघता येते. या विहिरीच्या आत आजदेखील कपाऱ्यांसमान भासणारी गूढ रचना आहे. कपारींचे गूढ काय, याबाबत जाणकारांमध्ये खल होत राहतो. 'लोकमत'च्या माहितीनुसार, कपारी म्हणजे मुळात विहिरीत वास्तव्य करण्यासाठीचे कक्ष होते. वास्तव्यासाठी आवश्यक ती रचना त्या कक्षांमध्ये उभारण्यात आली होती. ती नष्ट झाल्यामुळे शिल्लक बांधकाम कपाऱ्यांप्रमाणे दिसते.

विकासासाठी पाठपुरावा - रमेश बुंदिले
महिमापूरची विहीर हे राज्याचे वैभव आहे. विहिरीच्या विकासासाठी अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे आणि पर्यटनमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार केला. माझ्या निधीतून अमरावती, निरुळगंगामाई, महिमापूर आणि पुढे दर्यापूरच्या मुख्य मार्गाला जोडणारा रस्ता मंजूर करवून घेतला. त्यावरील पूलही मंजूर झाला. या स्थळाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांशीही पत्रव्यवहार करणार आहे, अशी माहिती दर्यापूरचे आमदार रमेश बुंदिले यांनी दिली

विकासासाठी प्रयत्न करणार - नितीन गोंडाणे
महिमापूरबाबत मीदेखील ऐकले आहे. पर्यटनस्थळाच्या 'क' दर्जाबाबत माहिती नव्हती. माहिती घेऊन अधिकाधि

क निधी देण्याचे आणि पर्यटक आकर्षित होतील असा विकास करण्यासाठी प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी दिली.

Web Title: 14th Century well neglected at Mahimpur In the Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार